दडी मारलेल्या पावसाचे येत्या तीन ते चार दिवसांत जोरदार पुनरागमन होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मुंबई- पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतक-यांसाठी हवामान खात्याने आनंदाची बातमी दिली असून येत्या तीन ते चार दिवसांत जोरदार पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तविली आहे. पावसाला अनुकूल वातावरणात बदल होत असून त्याचे परिणाम १२ जूलै नंतर दिसतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
चार वर्षाच्या दुष्काळानंतर गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. या वर्षीही पावसाने जून महिन्यांत चांगली सुरुवात केली. पेरणीला पुरेसा नसला तरी पुढे पाऊस पडेल या आशेवर शेतक-याने पेरण्या उरकून घेतल्या. मात्र विदर्भ आणि मराठवाडय़ावर पुन्हा पावसाने अवकृपा केली आहे. पेरलेली बियाणे उगवले, कोंब वर आले, मात्र जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने ते कोंब जाग्यावर सुकून जात आहेत. तर तूर आणि सोयाबिनच्या बियाणाला जास्त ओल लागत असल्याने अनेक ठिकाणी उगवलेच नाही.
त्यामुळे शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. दुबार पेरणीसाठी तर पुरेसा पाऊस व्हावा नाहीत, तर पुन्हा मागच्या चार वर्षासारखे दुष्काळाला सामोरे जाण्याची भिती वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने दिलासा दायक भाकित वर्तविले आहे.
शेतकरी चिंतेत असतानाच आता वातावरणात बदल होत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांत उष्णतेचे प्रमाण वाढले असून पारा ३१ अंशापर्यंत गेला होता. अशी उष्णता वाढली की पावसासाठी अनुकूल वातावरण होते. तशी परिस्थिती निर्माण झाली असून येत्या दोन ते तीन दिवसांत पुन्हा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
व्हेरी गुड