जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला रस्ते दुरुस्तीसाठी दिला जाणार निधी या वर्षीपासून ग्रामविकास विभागाकडून वर्ग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
अलिबाग – जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला रस्ते दुरुस्तीसाठी दिला जाणार निधी या वर्षीपासून ग्रामविकास विभागाकडून वर्ग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष सरत आले तरी रायगड जिल्हा परिषदेला हा निधी मिळाला नसल्याने रस्त्यांची अनेक कामे खोळंबली आहेत. मागील काही वर्षे रस्त्यांची दुरुस्तीच न झाल्याने जिल्हा परिषदेच्या मालकीच्या अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मागील दुरुस्तीच्या कामांची बिलेही अद्याप काढण्यात न आल्याने ठेकेदार ओरड करत आहेत.
रायगड जिल्हा परिषदेप्रमाणेच इतर जिल्हा परिषदांची अवस्थाही अशीच आहे. प्रथमच बांधकाम विभागाचा निधी ग्रामविकास विभागाकडून वर्ग केला जात असल्याने हा खोळंबा झाला असल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे. या वर्षी सुमारे १४०० कोटी रुपयांचा निधी या कामांसाठी ग्रामविकास विभागामार्फत दिला जाणार होता, मात्र हा निधी पोहोचलाच नसल्याचे म्हणणे रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित पाटील यांचे आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत सुमारे ४ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत.
साधारण तीन वर्षानी यातील ४० टक्के रस्त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. मात्र निधीअभावी यातील अनेक रस्ते वर्षानुवर्षे दुरुस्त झालेले नाहीत. दरवर्षी कमीत कमी ४० टक्के रस्ते दुरुस्त करण्याचे ठरवल्यास वर्षाला अडीचशे कोटी रुपयांची गरज रायगड जिल्हा परिषदेला असते, मात्र या कामांसाठी केवळ ४ ते ५ कोटींवर निधी दिला जात नसल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.
ग्रामविकास विभागाने निधीच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून मागवला आहे. १० ते १२ कोटींच्या वर्क ऑडर तयार आहेत, मात्र निधी अद्याप वितरीत केलेला नाही. ५ लाखांवरील कामे करण्यासाठी ई-टेंडरिंग प्रक्रियेचा अवलंब करण्यात येतो. या प्रक्रियेला किमान दीड महिन्याचा कालावधी लागतो. त्यात आर्थिक वर्ष संपण्यास काही अवधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत शेवटच्या दिवसात निधी आलाच तर त्याचा विनियोग कसा करायचा, असा प्रश्न जिल्हा परिषदेच्या ठेकेदारांना पाडला आहे.
गाव क्षेत्रपाल आमलेवाडी ता पोलादपुर जि रायगड
या गवात क्षेत्रपाल ते क्षेत्रपाल आमलेवाडी रस्ता दीड किलो मीटर आहे एक किलो मिटर रस्ताचे काम डबरीकरन झाले आहे आनि
आर्धा किलो मीटर रस्ता चे काम बाकि आहे व मोरयानचे काम बाकि आहे. हे करू दयावे
ही नम्र विनंती,