मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ आणि टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर २०१२ रोजी मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये माननीय शिवसेनाप्रमुखांच्या निधनानिमित्त शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्योगमंत्री नारायण राणे व सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी जागवलेल्या बाळासाहेबांच्या हृद्य आठवणी…
उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्याचा हा कार्यक्रम आपण आयोजित केला त्याबद्दल धन्यवाद देतो. अर्थात, धन्यवाद देत असलो तरी साहेबांवर श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर यावी, हा मी अत्यंत दुर्दैवी क्षण मानतो. माननीय बाळासाहेबांबद्दल, त्यांच्याशी निगडित अनुभवांबद्दल, त्यांचा सहवास आणि त्यांनी केलेलं कौतुक याबद्दल अनेक पत्रकारांनी ब-याच गोष्टी सांगितल्या. ज्यांना बाळासाहेबांचा जास्त सहवास, सान्निध्य मिळालं त्यांनी जास्त खोलात जाऊन माहिती सांगितली.
माझ्याबद्दल बोलायचं झालं तर वयाच्या १६व्या वर्षी मी शिवसैनिक झालो. फॉर्ममध्ये ‘१८ वय’ नोंदवून दोन रुपये देऊन सभासद झालो. त्यावेळी मुंबईत सभा व्हायच्या त्या मुख्यत्वे शिवाजी पार्कात. चेंबूरवरून येईपर्यंत सभेला पोहोचायला उशीर व्हायचा आणि शिवाजी पार्कच्या कुठल्या तरी टोकाला जागा मिळायची. त्यावेळी साहेबांचं खूप लांबून दर्शन व्हायचं. तेव्हापासूनचा मी शिवसैनिक. माझ्या जीवनामध्ये मला अनेक पदं मिळाली. शिवसैनिकाचा शाखाप्रमुख झालो, मग नगरसेवक, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता या पदावर पोहोचेपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांचा स्वभाव, त्यांची निर्णयक्षमता, त्यांच्या मनाचा मोठेपणा याचा अनुभव मला मिळाला.माझ्याप्रमाणे भुजबळसाहेबांनाही त्यांचा हा सहवास लाभला असेल. मी बेस्टचा चेअरमन झाल्यावर त्यांच्याजवळ जाण्याचा योग मला आला. तेव्हा भुजबळ सभागृहाचे नेते होते. तिथपासून ते विरोधी पक्षनेता होईपर्यंत म्हणजे २००५ पर्यंत मी त्यांना अतिशय जवळून पाहिलं. मी सांगितलेली पदं त्यांच्याकडूनच मला मिळाली. फार अभिमान वाटायचा की, एका खूप मोठय़ा व्यक्तीबरोबर आपण बोलत आहोत. एक खूप मोठी व्यक्ती आपली गुरू आहे, मार्गदर्शक आहे. त्यांनी केलेलं मार्गदर्शन अनुभवताना समाधान मिळायचं. मुंबई, ठाणे, वसईपासून ते कल्याणपर्यंत कुठेही सभा असली तरी त्या काळात मी ती कधीच चुकवली नाही. साहेबांचे विचार, मराठी माणसाबद्दल, हिंदुत्वाबद्दल अन् साहेबांचा तेव्हाचा तो आवेश.. त्यांची भाषणं ऐकल्यानंतर रक्त सळसळायचं आणि वाटायचं की साहेब जे बोलत आहेत ते सत्य आहे, त्याचं अनुकरण करायचंय. साहेबांनी मराठी माणूस आणि मराठी तरुणांना मार्गदर्शन केलं, त्यांना प्रेरणा दिली आणि म्हणूनच माझ्यासारखे अनेक तरुण आज महाराष्ट्राच्या राजकारणात पाय रोवून आहेत.मी अशाप्रकारे भावना व्यक्त करतो, पण पत्रकारांनी त्याचंही विश्लेषण केलं. प्रश्नचिन्ह टाकलं. त्याबद्दल मला काहीही म्हणायचं नाही, काही बोलायचं नाही. तो माझा भूतकाळ आहे. त्या भूतकाळाबद्दलच्या गोष्टी ख-या आहेत, घडलेल्या आहेत. त्या सांगणं म्हणजे कुठल्या तरी राजकीय प्रसिद्धीसाठी माध्यमांचा उपयोग करतो, असा त्याचा अर्थ होत नाही. साहेब आले नसते तर नारायण राणे कुठे असता, शिवसेना झाली नसती तर नारायण राणे कुठे असता, असा प्रश्न विचारला तर मी म्हणेन की, कुठेच नसता!
मराठी माणसांच्या न्याय्यहक्कांसाठी शिवसेना स्थापन झाली. ‘शिवसेना’ हे घोषवाक्य ऐकून, साहेबांच्या विचारांनी, त्या आवेशाने आपल्याकडे ओढलं, म्हणूनच सैनिक झालो, असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आपल्या मित्रांनी अनेक उदाहरणं सांगितली. मला असं वाटतं की, साहेबांकडे कुठलंही राजकीय पद नव्हतं, शासकीय पद नव्हतं, असं असतानाही या देशातच नाही तर संपूर्ण जगात साहेबांचा नावलौकिक होता. याला कारणीभूत त्यांची महानता. मला एक आश्चर्य अजूनही वाटतं. मधला काही काळ वगळता ते सत्तेत नव्हते, कोणत्याही पदावर नव्हते. पण शिवसेनेच्या जन्मापासून त्यांच्याकडे असलेला राजेशाही रुबाब मी पाहत होतो. कालपरवा त्यांचं निधन होईपर्यंत तोच रुबाब, तीच राजेशाही, तोच थाट. तेच लोकांचं आकर्षण कायम होतं. आजारपणात सगळे त्यांना भेटायला येत होते. राष्ट्रपती असो, मुख्यमंत्री असो, मंत्री असोत, विविध पक्षांचे बडे नेते असोत. केवढी ही कीर्ती! केवढा हा मान! केवढा हा सन्मान! हे सर्व त्यांनी स्वत:च्या कर्तृत्वानं मिळवलं होतं. कारण साहेब राजकारणी नव्हते. हे मी अनुभवलं आहे.साहेबांच्या मायेबद्दल काय बोलावं! अनेक उदाहरणं मी जवळून पाहिलीत. त्यांच्याकडे कुणी गरीब आल्यास रिकाम्या हातानं गेल्याचं उदाहरण नाही. कुणी रुग्ण आला तर उपचाराचे पैसे मिळाल्याशिवाय बाहेर गेला नाही. त्यांच्याकडे नसले तर म्हणायचे, ‘नारायण, जरा याची व्यवस्था कर. त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळवून दे. तो बरा व्हायला पाहिजे, ठणठणीत व्हायला पाहिजे.’ आपल्या स्वभावाने त्यांनी विविध क्षेत्रांतली, मग ते कला क्षेत्र असो, पत्रकारिता असो, चित्रपट असो, साहित्य असो, सगळीकडे मित्र जोडले. असं कोणतं क्षेत्र नाही जिथे साहेबांचा मित्र नाही. साहित्यिक असो, अर्थतज्ज्ञ असो, सगळ्या क्षेत्रात त्यांचे मित्र. आणि सगळ्यांना साहेब हवेहवेसे वाटायचे. साहेबांबद्दल प्रत्येकाला वाटायचं की, साहेब आपले मित्र असावेत. त्यांच्याशी आपण कधीतरी बोलावं, त्यांच्याबरोबर एखादा फोटो काढावा, असं आकर्षण त्यांनी आपल्या कर्तृत्व आणि गुणांनी तयार केलं.
१९८७ मध्ये मी बेस्टचा चेअरमन झाल्यानंतर मला त्यांचा सहवास, सान्निध्य मिळालं. तेव्हा त्यांच्या अनेक गोष्टी जवळून पाहिल्या. एक असाच किस्सा होता एका सैनिकाचा. त्याने नवीन घर घेतलं होतं. हातात निमंत्रणपत्रिका देत तो साहेबांना म्हणाला, ‘साहेब, तुम्ही गरीबाच्या घरी पाय लावा.’ साहेब चिडले आणि म्हणाले, ‘तू गरीब आहेस, तर माझे पाय लावायला का सांगतोस. अरे मनाची श्रीमंती ठेवा. तू गरीब आहेस म्हणून तुला कोणी देणार नाही, पण मनाची श्रीमंती ठेवलीस तर उद्या श्रीमंत होशील.’ ते मला सांगायचे, ‘नारायण, विधायक दृष्टीने काम करत राहायचं, हीच तुमच्या श्रीमंतीची खरी शान.’मला मिळालेली सगळी पदं वाद होऊनच मिळाली. मुख्यमंत्रीपदाच्या वेळची गोष्ट सांगतो. त्यावेळी एका पत्रकारानं मी लंडनला असताना फोनवर बोलून भलतंच छापलं. वाईट वाटतं. मी काय बोललो, मी कुठल्या भावनेनं बोललो? काहीतरी कदर करा. अशा वेळी तरी ट्विस्ट करू नका.
तेव्हा सर मुख्यमंत्री होते. पेपरमध्ये छापून यायचं की, जोशी जाणार, राणे येणार. आपल्याला एखादं पद हवं, असं सांगण्याची शिवसेनेत पद्धतच नाही. साहेब, एका दिवशी मला म्हणाले, ‘नारायण, तुला मी मुख्यमंत्री करणार.’ मी म्हणालो, ‘साहेब गेल्या वर्षभरापासून ऐकतोय हे.’ ते म्हणाले, ‘तुला सांगितलं ना, बघ मी करतो.’ एकदा रात्रीचे १२ वाजून गेले असताना त्यांनी मला बोलावलं आणि म्हणाले, ‘नारायण, तुला मुख्यमंत्री केलं तर तू चालवशील का?’ मी माझ्या शैलीत उत्तर दिलं, ‘साहेब, मी चालवेन नाही तर पळवेन.’ ‘ठीक आहे’ म्हणाले. दुस-या दिवशी साहेबांनी आशीष कुलकर्णीना सरांना पत्र द्यायला सांगितलं, ‘राजीनामा घेऊन भेटायला या.’ आणि त्याच दिवशी शिवसेना भवनला त्यांनी आमदारांची मिटिंग लावली. सर त्यावेळी लोणावळ्याला गेले होते. ते आले आणि त्यांनी राजीनामा दिला. साहेब सभेला आले. गेटमधून बाहेर पडले. आमदारांसमोर आले. सगळे अगदी गंभीर बसले होते. कोणी बोलत नव्हतं. साहेबांनी माइक घेतला आणि म्हणाले, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आपल्या पक्षाचे आहेत. त्यांना मी आत्ता राजीनामा द्यायला सांगितला आहे. थोडय़ाच क्षणात ते येतील.’ असे बोलून माइक ठेवला आणि ते निघून गेले.
आम्हाला कोणालाच कळेना की, आम्ही सर्व नेतेमंडळींनी काय करायचं? तिथे सुभाष देसाई उपस्थित होते. ते म्हणाले, ‘अहो विचारा राणेसाहेब, एक मुख्यमंत्री उतरला तर दुस-याचं नाव सुचवावं लागतं.’ मी म्हटलं, ‘मी नाही विचारणार.’ कारण मला माहीत होतं की, माझंच नाव सुचवलंय. तर मी कसा विचारणार? मी म्हणालो, ‘असं करा, मी तुम्हाला फोन लावून देतो, तुम्ही विचारा.’ देसाईंनी फोन लावला. ते साहेबांना म्हणाले, ‘कसं आहे की, एक मुख्यमंत्री उतरला तर दुस-याचं नाव सुचवावं लागतं.’ त्यावर साहेब म्हणाले, ‘अहो, मी तुम्हाला सांगितलं ना की, नारायण राणे म्हणून. नारायण राणे यांचं नाव जाहीर करून टाका.’ अशा प्रकारे मी मुख्यमंत्री झालो.
हे असं केवळ बाळासाहेब ठाकरेच करू शकतात. या लोकशाहीत असा मुख्यमंत्री कधीच होत नाही. हे तेच करू शकतात. कोणाला विचारलं नाही, चर्चा नाही, काही नाही.. केलं मुख्यमंत्री. पत्रकारांनी प्रतिक्रिया घेतल्या. आत्ताही तुम्ही प्रतिक्रिया घेता. चांगलं आहे. म्हणता, एवढं तुमचं चांगलं होतं तर बिनसलं कुठे? आता ते सांगत बसू काय याप्रसंगी? आता एवढंच म्हणेन की, हिंदू धर्माचे कट्टर समर्थक गेले.
मराठी माणूस आणि हिंदू यांच्या बाबतीत त्यांनी कधीच तडजोड केली नाही. या दोन्ही अस्मितांसाठी राजकारणातही त्यांनी हेराफेरी नाही केली. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपले हक्क, अधिकार आणि आपलं धोरण यात तडजोड नाही केली. साहेबांनी एकदा निर्णय दिला की, कोणीच बोलत नसे. मी म्हणतो तेच अंतिम. हेच त्यांनी शेवटपर्यंत केलं. त्यांनी कधीही आपला शब्द फिरवला नाही. हेच त्यांच्याबद्दल बोललं जातं आणि त्यांनी शेवटपर्यंत ते केलं. साहेबांनी दिलेला शब्द ते पूर्ण करायचे. बंदुकीतून निघालेली गोळी जशी निघते आणि समोरच्याचा वेध घेते तसे साहेबांनी दिलेले शब्द शंभर टक्के पाळले जात. शब्द पाळला नसल्याचं एकही उदाहरण नाही. माझंच उदाहरण पाहा ना. मला माहीत होतं की, साहेबांनी शब्द दिला आहे, ते मला मुख्यमंत्री करणारच आणि त्यांनी केलं. मी नशीबवान आहे. विधिमंडळात विरोधी पक्षनेता म्हणून सहा वर्ष काम केलं. माझ्या भाषणांची अनेक पुस्तकं निघाली. रंगशारदाला एका पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं. त्यात त्यांनी माझं कौतुक केलं. माझ्या जीवनाचे तेच खरे अॅसेट आहे, भांडवल आहे, असं मी समजतो. साहेबांचे शब्द हेच खरं माझं वैभव आहे. माझा बँक बॅलन्स किती, या मुद्दय़ात मी जात नाही. मी गरीब का श्रीमंत, हा मुद्दा नाही. साहेबांनी घडवलेले शिवसैनिक काय करू शकतात, हे त्यांनी आपल्या शैलीत, शब्दांत सांगितलं. हेच माझं भाग्य आहे, असं म्हणणा-यांपैकी मी आहे.
मी परवा असं म्हणालो की, ‘मी शिवसेना सोडल्यानंतर साहेब माझ्याशी दोन वेळा बोलले.’ त्याच्यावरपण शंका. शिशिर शिंदे त्यांचा एवढा प्रिय होता. पण त्याच्याशी नाही बोलले. आता साहेबांना कोण प्रिय होते, हे भुजबळ तुम्हाला सांगू शकतील किंवा जवळचे लोकच आम्ही काय होतो, ते सांगू शकतील. तो मुद्दा नाही. पण, मी आठवण सांगतो. खोटं काय सांगायचंय? मध्यंतरी उद्धवजींनी फोटोकॉपीचं पुस्तक प्रकाशित केलं. माझे पीएस राजेंद्र पाटील यांनी ते माझ्याकडे आणून दिलं. त्यांनी सांगितलं की, उद्धवजींचं पुस्तक आलं आहे. त्यावर पत्र आहे. तुमच्याकडून प्रतिक्रिया मागितली आहे. मी ती लिहिली आणि सांगितलं की पाठव. ते पाठवल्यानंतर साहेबांचा मला फोन आला की, तू उद्धवबद्दल अतिशय छान लिहिलं आहेस. त्यात मी राजकारणाचा काहीही उल्लेख केला नव्हता. त्यांनी जे फोटो काढले होते ते सुंदर होते. फोटोग्राफर म्हणून त्यांच्या कामाचं मी कौतुक केलं.
नंतर मी अशीच कधीतरी राजकीय टीका केली होती आणि कणकवलीला गेलो. कणकवलीला असताना तिथे साहेबांचा फोन आला. मला खरंच ध्यानीमनी नव्हतं. माझ्या पीएसकडून फोन घेतला आणि म्हणालो, ‘साहेब, जय महाराष्ट्र.’ ते म्हणाले, ‘नारायण, उद्धवबद्दल मनात वैर ठेवू नको. राजकारण तुम्ही जरूर खेळा, पण वैर धरू नका.’ बाकीचा मजकूर मी सांगत नाही. पण, यावर तुम्ही विश्लेषण करता. तुम्ही म्हणता ना, भावना सांगा. मी माझ्या भावना सांगतो. तुम्हाला जर विश्लेषण करायचेच असेल तर काही काळ जाऊ द्या. या आणि आम्हाला वैयक्तिकरीत्या विचारा की, हे तुम्ही सांगताय हे खरं कशावरून आहे? आम्ही सांगू ना! आम्हाला साहेबांबद्दल भावना, आठवणी सांगून राजकीय फायदा काहीच उठवायचा नाही. उलट राजकारणाचा फायदा जेवढा आम्हाला द्यायचा तो साहेबांनी दिला आहे.
साहेबांच्या समाधानी वृत्तीचा कुणीच उल्लेख केला नाही. साहेब फार समाधानी राहायचे. आपल्याला काही कमी आहे, असं कधीच दाखवायचे नाहीत.
आपल्याकडे सर्वात चांगल्या गोष्टी आहेत आणि प्रत्येकाने समाधानाने जगलं पाहिजे, असं ते नेहमी सांगायचे. सगळ्यांवरच विश्वास ठेवणं, सगळ्यांनाच प्रेम देणं, हेच साहेब करत आले. साहेबांचं जीवन हे वाहत्या झ-यासारखं होतं.. निर्मळ, शुद्ध अशा पाण्यासारखं. त्यांनी जीवनात नेहमीच प्रेम, आदर, सन्मान, विचार दिले. मार्गदर्शन केलं. म्हणूनच सगळा महाराष्ट्र, हिंदुस्थान साहेब गेल्यामुळे हळहळतो आहे. साहेबांनी माझ्यावर टीका केली आहे म्हणून जायचं नाही, असा विचार कुणीच केला नाही. प्रत्येक जण साहेबांना भेटायला गेला. आजही अनेकांनी विचार मांडले. असे होते साहेब. आता ते आपल्यात नाहीत, याचं सर्वानाच दु:ख आहे. तुम्ही सर्वानी ज्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल खरंच मी तुमचा अतिशय ऋणी आहे. आणि म्हणून आज जाता जाता एकच सांगतो, मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे की, शिवसेना हा माझा भूतकाळ आहे आणि काँग्रेस माझा भविष्यकाळ आहे. प्रश्न नकोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.
AAMHALA SARV SHIVSENIK PUNHA SHIVSENET HAVE AAHE SAHEBANCHYA MANATLE SWARAJYA PUNHA MAHARASHTRAT AANAYCHE AAHE, ATKE PAAR ZENDE LAVAYCHE AAHE ANI TYA SATHI TUMCHIHI MADDAT HAVI AAHE RANE SAHEB PARAT YA AAPLYA GHARI DARWAJE UGHADECH AAHET TUMHALA, ANI MANE SUDHA