तलफ भागवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तंबाखूची ‘मळी’ भरणा-यांविरोधात सरकारी पातळीवर कठोर पावले उचलण्यात येणार आहेत.
मुंबई – तलफ भागवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तंबाखूची ‘मळी’ भरणा-यांविरोधात सरकारी पातळीवर कठोर पावले उचलण्यात येणार आहेत. त्याशिवाय तंबाखू, गुटखा, पान मसाला, सिगारेट विक्रीवर बंदी आणण्याबद्दल राज्य सरकार विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. जागतिक कर्करोगविरोधी दिनानिमित्त टाटा मेमोरियल रुग्णालयातर्फे बुधवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तंबाखू आणि तत्सम पदार्थाच्या सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
कर्करोगाचे जे प्रमाण २० वर्षापूर्वी होते तेच आजही आहे. त्यामुळे याबाबत जनजागृतीची गरज असल्याचे ते म्हणाले. शैक्षणिक संस्थेच्या परिसरात आज मोठय़ा प्रमाणावर तंबाखू, पान मसाल्याची विक्री होते. ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर तंबाखू व पान मसाला यांचे सेवन होत आहे. त्यामुळे गृहविभाग, शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने राज्य सरकार लवकरच तंबाखू व पान मसाला विक्रीवर बंदी आणणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्रात तंबाखू उद्योगावर जे लोक अवलंबून आहेत अशा लोकांना सर्वप्रथम पर्यायी उद्योगाकडे वळवणे आवश्यक आहे. पंजाब सरकारने तंबाखूवर मोठय़ा प्रमाणावर कर लावले आहेत. याचा तेथे काय परिणाम होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ते स्पष्ट झाल्यावर पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातही तंबाखूवर मोठय़ा प्रमाणावर कर लावण्याचा विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.
टाटा रुग्णालयाला अधिकाअधिक सुविधा
टाटा मेमोरियल रुग्णालय हे महाराष्ट्रातील एकमेव कर्करोग रुग्णालय आहे. त्यामुळे कर्करोगावर उपचारासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्याचेही रुग्ण मुंबईत येतात. कर्करोगाचे निदान लवकर होण्यासाठी टाटा रुग्णालय राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे टाटा रुग्णालयास राज्य सरकारकडून जास्तीत जास्त सुविधा पुरवण्यात येतील असेही मुख्यमंत्री म्हणाले.
तंबाखुचा विडा मळताना खुपच कमी लोक आहेत की जे आजुबाजुच्या लोकांच्या बद्दल (आरोग्य, अॅलर्जी) तमा बाळगतात.