नारायण राणे यांचे मराठवाडय़ातील जनतेला वचन, शिवसेना,भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीने विश्वास गमावल्याने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना
औरंगाबाद – महाराष्ट्रामध्ये सध्या कार्यरत असणारे शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे चार प्रमुख पक्ष राज्यातील जनतेला सुखा-समाधानाचे दिवस देऊ शकले नाहीत. या चारही पक्षांकडून राज्यातील जनतेची घोर निराशा झालेली आहे. म्हणून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आण्यासाठी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा’ला जन्म दिला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा’चे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी रविवारी सायंकाळी केले. ‘तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला विकास देतो’, असा विश्वासही राणे यांनी मराठवाडय़ातील जनतेला दिला.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची भव्य सभा औरंगाबाद येथील प्रसिद्ध रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण मैदान कार्यकर्त्यांनी फुलून गेले होते. नारायण राणे यांचे मैदानात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी झाली. तेव्हा जमलेल्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे ‘राणे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, हमारा नेता कैसा हो, राणे साहेब जैसा हो’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेले. मराठवाडय़ातील पहिल्याच सभेला इतका उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल जमलेल्या जनतेचे आभार व्यक्त करून राणे म्हणाले की, मराठवाडय़ात गेल्या काही दिवसांत वेगवेगळय़ांचे पक्षांचे आंदोलन सुरू आहेत. ३१ जानेवारी रोजी येथे या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची सभा झाली, त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप झाला, तर सत्तेतमध्ये राहून सरकार विरोधात सतत बोलणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही सभा झाली. इतक्या सभा झाल्यानंतर येथील जनतेने खरे तर पेटून उठायला पाहिजे होते. मात्र तसे झाले नाही. कदाचित ते लोक आपल्या सभांमधून जे बोलले त्याच्यावर येथील जनतेचा विश्वास उरला नाही, म्हणून जनता पेटून उठली नाही. यावरून एकच स्पष्ट झालेले आहे की, महाराष्ट्रात सध्या कार्यरत असलेले शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष या राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. त्यांनी राज्यातील जनतेचा विश्वास गमावलेला आहे, म्हणून मला ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा’ला जन्म द्यावा लागला असे नारायण राणे म्हणाले.
प्रस्थापित पक्षांकडून लोकांची झालेली निराशा भरून काढण्यासाठी मी पक्षाला जन्म दिला आहे. पहिली सभा कोल्हापूर येथे घेतली आणि आता दुसरी सभा मराठवाडय़ात घेत आहे. कालपासून मला अनेक शिष्टमंडळ भेटायला येत आहेत. आपले प्रश्न मांडत आहेत. रस्ते नीट नाही, दळवळणाची साधने नाहीत, पिण्यासाठी, शेतीसाठी उद्योगासाठी पाणी नसल्यामुळे या भागातले कारखाने बंद पडत आहेत. तरुणांना रोजगार मिळत नाही. म्हणूनच हा भाग मागसलेला राहिला आहे. आज जगातील इतर राष्ट्रांनी प्रगती केली. अमेरिकेचे दरडोई उत्पन्न ३६ लाख रुपये आहे. ब्रिटनचे दरडोई उत्पन्न २५ लाख आहे, लंडनचे २४ लाख आहे. तर आपल्या देशाचे दर डोई उत्पन्न १ लाख ११ हजार इतके आहे. त्याबद्दल मराठवाडय़ाचे दरडोई उत्पन्न ५० ते ५२ हजाराच्या पुढे नाही. चार वर्षे मुख्यमंत्री राहिलेल अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न केवळ ५२ हजार आहे. इतक्या कमी उत्पन्नात लोकांनी आपले घर संसार कसे चालवायचे? मला मुख्यमंत्री म्हणून अत्यंत कमी कालावधी मिळाला. परंतु या कालावधीत मी सरकार पळविले. अनेक धाडसी निर्णय घेतले. कोकणातील जनतेसाठी अनेक योजना आणल्या, उद्योग सुरू केले. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न सव्वा लाखाच्या पुढे घेऊन गेलो. ते मराठवाडय़ात घडले नाही. म्हणूनच मराठवाडय़ात आत्महत्या होत आहेत. महाराष्ट्रातील जनतेने ४ मुख्यमंत्री मराठवाडय़ाचे दिले. १४ वर्षे मराठवाडय़ाकडे मुख्यमंत्री पद होते, तरीही प्रश्न सुटलेले नाहीत, म्हणून येथील जनतेची घोर निराशा झालेली आहे, असेही राणे म्हणाले.
पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार!
औरंगाबाद – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर शनिवारपासून मराठवाडय़ाच्या दौ-यावर आलो आहे. तेव्हापासून अनेक शिष्टमंडळे भेटायला येत आहेत. मराठवाडय़ाचे प्रश्न मांडत आहेत. मराठवाडा सर्वच क्षेत्रात मागास राहिलेला आहे. त्यातही पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. मुंबईला गेल्यानंतर मराठवाडय़ाचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून हा प्रश्न सुटेपर्यंत आपण प्रयत्न करणार आहोत, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी औरंगाबाद येथील हॉटेल ताज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच आपण पक्ष काढलेला असून यापुढे प्रत्येक निवडणूक आपल्या पक्षातर्फे लढविली जाईल, असेही राणे म्हणाले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने औरंगाबाद येथे जाहीर सभेसाठी राणे यांचे शनिवारी आगमन झाले. सभेला जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. पक्ष स्थापनेमागील भूमिका स्पष्ट करताना राणे म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा हे चार प्रमुख पक्ष आहे. यापेक्षा काही वेगळे काम करून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करून, दिलेला शब्द पाळून विश्वास संपादन करण्यासाठी माझा पक्ष काम करणार आहे. भारतीय राज्य घटनेतील तरतुदींना अनुसरून सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेऊन सर्वधर्म समभाव या न्यायाने मी काम करणार आहे. राजकाणारतील ५० वर्षाचा अनुभव असल्याचा मी उपयोग करून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझा पक्ष काम करील, अशी ग्वाहीही नारायण राणे यांनी यावेळी दिली.
मराठवाडय़ाचे अनेक प्रश्न आहेत. हा भाग खूप मागासलेला आहे. या भागाला १४ वर्षे मुख्यंमत्रीपद मिळाले. अनेक नेते होऊन गेले, मात्र इथले प्रश्न संपले नाहीत. आजही मराठवाडय़ाचे दरडोई उत्पन्न हे ५२ हजारांच्या खाली आहे. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकारण करायला गेलो, तेव्हा तिथे परिस्थिती अशीच होती. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न १ लाख ४० हजार रुपये आहे. मराठवाडय़ाचा पाणी प्रश्न गंभीर असल्याचे अनेकांनी सांगितले. मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रातला सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा आहे, जो टँकरमुक्त आहे. हे आपोआप झाले नाही. मी तेथील सर्व परिस्थितीचा विचार केला. तेथे अनेक छोटेमोठे उद्योग सुरू केले.
कोकणात फळबागा मोठय़ा प्रमाणात आहेत. फळ प्रक्रिया उद्योग सुरू केले. गारमेंट सुरू केले. आज तिथला माणूस सुखी झाला आहे. मराठवाडय़ात गारमेंट उद्योग का सुरू होऊ शकले नाहीत, याचाही विचार झाला पाहिजे. म्हणून पक्षाची स्थापना केल्या नंतर महाराष्ट्राच्या सर्व भागात फिरून तेथील प्रश्न जाणून घेत आहे. ते सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. मराठवाडय़ातील रोजगार, शेतीचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न कालपासून लोकांनी सांगितले. ते सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचेही नारायण राणे म्हणाले.
धनंजय मुंडे लहान आहेत..
भारतीय जनता पार्टीने नारायण राणे यांचा स्वाभिमान जपला नाही. त्यामुळे सभा घेऊन काही होणार नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना राणे म्हणाले की, धनंजय मुंडे खूप लहान आहेत. त्यांच्या बोलण्याला महत्त्व द्यावे असे मला वाटत नाही. त्यांनी यापुढे त्यांचे वय लक्षात घेऊन माझ्यावर बोलण्याचे टाळावे, अन्यथा मला सुरू करावे लागेल, असा इशारा नारायण राणे दिला. माझा स्वाभिमान जपण्यासाठी मी समर्थ आहे, धनंजय मुंडे यांनी त्याची चिंता करू नये, असेही राणे म्हणाले.
कुणी बरोबर घेत नसल्यामुळे शिवसेनेचा स्वबळाचा नारा
यापुढच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्याबद्दल आपल्याला काय वाटते, असे पत्रकारांनी विचारले असता राणे म्हणाले की, कुणी बरोबर घेत नसेल तर स्वबळावरच लढावे लागेल ना. दुसरा काय पर्याय आहे? अमित शहा यांनी त्यांच्या खासदारांची समजूत काढण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे, एक प्रकारची प्रोसिजर आहे. उद्या आम्ही त्यांना बरोबर घेत होतो, पण हिंदू मतांची विभागणी करण्यासाठी ते वेगळे झाले. हिंदू मतांना आकर्षित करण्यासाठी समजूत काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली, असे राणे म्हणाले.
मंत्रिमंडळ प्रवेश अधिवेशनापूर्वी होईल
नेहमीप्रमाणे पत्रकारांनी नारायण राणे यांना मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत विचारले असता राणे म्हणाले की, मला चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्याचे आश्वासन दिले होते. मी वाट पाहतो आहे. गेल्याच आठवडय़ात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तेव्हा आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि तुम्ही विधिमंडळात मंत्री म्हणून आमच्यासोबत असाल, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यामुळे अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात प्रवेश होईल, असे वाटते. शिवसेनेचा तुमच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला विरोध आहे, असे विचारले असता राणे म्हणाले की, शिवसेना आपल्याला घाबरत असल्यामुळे विरोध करते. पण मी सांगतो, शिवसेनेने सत्ता सोडली तरी भाजपाचे सरकार पडणार नाही.
Amacha swabhimani neta narayan rade ( dada ) mi vaibhavwaditala saheban shivay kokancha vikas hovu shakat nahi he mi kay virodhak suddha kabul kartat aso aai jagdamba dadana udang ayushya devo hi prarthana
छान, नक्कीच साथ देणार…