सीमा शुल्क विभागाचा डोळा चुकवून सोने-चांदीची तस्करी करता यावी, यासाठी तस्कर नवनवे फंडे वापरताना दिसत आहेत.
मुंबई – सीमा शुल्क विभागाचा डोळा चुकवून सोने-चांदीची तस्करी करता यावी, यासाठी तस्कर नवनवे फंडे वापरताना दिसत आहेत. यात सोन्याच्या दागिन्यांना चांदीचा मुलामा, तर कधी सोन्याच्या तारांना चौकोनी किंवा आयताकृती आकार देऊन ब्रिफकेसच्या पट्टीत लपवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय संगणकाचे सुटेभाग, फ्राइंग पॅन इत्यादी वस्तूंमध्येही सोने लवपून आणण्यात येत आहे. मागील काही कारवाईंत तस्करांचे असेच काही नवे फंडे समोर आले होते.
मागील एका कारवाईत सीमा शुल्क विभागाच्या अधिका-यांनी सुजल कसारकर, भाविका सुर्ती व जोहल अली इस्माईल हर्नेकर या तीन भारतीय प्रवाशांना ताब्यात घेतले होते. या तिघांनी सोन्याच्या तारा ब्रिफकेसच्या कडेच्या भागात लपवून हा भाग धाग्याने शिवला होता. याशिवाय सोन्याच्या बांगड्या व सोनसाखळीला चांदीचा मुलामा देऊन कर चुकवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र सीमा शुल्क विभागाच्या नजरेतून त्यांच्या या क्लृप्त्या सुटल्या नाहीत. त्यांच्याकडून १९७१ ग्रॅम वजनाचे ४९ लाख रुपयांचे सोने हस्तगत करण्यात आले होते. हे तिघेही दुबई-शारजाहून मुंबईत येत होते.
याआधी मोहम्मद शबाबन मिथाल या प्रवाशालाही ५८० ग्रॅम सोन्यासह (किंमत १४ लाख रुपये) मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली होती.
त्याने ट्रॉली बॅगच्या आतील कडेत सोन्याच्या तारा लवपल्या होत्या. त्याच दिवशी इड्डू कुन्ही नायर या प्रवाशानेही अशाच प्रकारे बॅगेच्या आतील बाजूला सोन्याच्या तारा लपवून आणल्या होत्या. त्याच्याकडूनही सीमा शुल्क विभागाने २४ लाख रुपयांचे सोने हस्तगत केले होते. याशिवाय संगणकाचे सुटे भाग व फ्राइंग पॅनमध्येही सोने लपवून आणत असताना सीमा शुल्क विभागाने दोन प्रवाशांना नुकतीच अटक केली होती.
तस्करांच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी गुप्त माहितीसह एखाद्या प्रवाशाचे निरीक्षण महत्त्वाचे आहे. गेल्या काही महिन्यांत मुंबई विमानतळावर येणा-या प्रवाशांच्या रूपरेखेवर आम्ही विशेष लक्ष ठेऊन आहोत. संशयित हालचाल, देहयष्टी, कोणत्या देशातून प्रवासी आला आहे, याकडे विशेष लक्ष देऊन त्या दृष्टीने तपासणीत वाढ केली आहे. त्यामुळे सोने तस्करीतील अधिकाधिक व्यक्तींना पकडण्यात आम्हाला यश आल्याचे एका अधिका-याने सांगितले.
गल्फ मध्ये नोकरी करणाऱ्या bandhu भगिनींना विनंती ,कृपया कोणत्याही सामानातून लपवून छपवून,सोने घेवून जाउ नकाच ,
कस्टम मध्ये पकडले जालं, नुकसान आणि मनस्ताप सहन करावा लागेल , जय महाराष्ट्र !!!