रायगड जिल्ह्यात एकीकडे नवरात्रौत्सवाची तयारी सुरू असतानाच तयार झालेल्या भात कापणीला देखील सुरुवात झाली आहे.
अलिबाग- रायगड जिल्ह्यात एकीकडे नवरात्रौत्सवाची तयारी सुरू असतानाच तयार झालेल्या भात कापणीला देखील सुरुवात झाली आहे. यावर्षी पाऊस पुरेसा झाला नसला तरी शेतीसाठी तो पूरक ठरला आहे. जूनमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे हळव्या भातपीकांची लावणी योग्य वेळेत झाली. त्यामुळे हळवी पिके तयार झाली आहेत. मात्र गरवी आणि निमगरवी पिके अजूनही दाणा भरण्याच्या अवस्थेत आहेत. मागील आठवडय़ात झालेल्या परतीच्या पावसाने या गरव्या पिकांना चांगला फायदा झाला. जया, रत्ना यासारखी लवकर होणारी पिके तयार झाली असून अशा पिकांची कापणी सुरू झाली आहे.
या वर्षी रायगड जिल्ह्यात १ लाख १४ हजार हेक्टरवर भातशेती करण्यात आली आहे. ३१ लाख ८४ हजार क्विंटल भाताचे उत्पादन अपेक्षीत आहे. चांगले उत्पादन यावे यासाठी शेतक-यांना सुधारित बियाणे देण्यात आली आहेत. एकात्मिक कीड व्यवस्थापन योजनेतून कीडरोग नियंत्रणासाठी आठवडय़ातून चारदिवस शेतीचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी ४८ निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. काही भागात भातपिकावर कीड रोगाचा फैलाव झाला आहे. असे असले तरी शेतीचे फार नुकसान झालेली नाही.
कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील नागरिकांना व मच्छिमार, सोसायटय़ांना धोक्याचा इशारा देण्यात आला होता.
मात्र हा अंदाज खोटा ठरला असून जिल्ह्यात कडकडीत ऊन पडले आहे. त्यामुळे शेतक-यांनी सुटकेचा नि:श्वास टाकत कापणीच्या कामाला सुरुवात केली आहे. ही कामे सुरू झाल्याने डोंगरदरीत राहणा-या आदिवासींना रोजगार उपलब्ध झाला आहे. भाताचे भारे बांधण्यासाठी लागणारे बंध तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम आणखी किमान महिनाभर चालेल. दिवाळीपूर्वी कामे आटोपतील असा अंदाज आहे.
सुंदर असा लेख आहे