मुंबई-गोवा महामार्गाच्या कशेडी ते लांजादरम्यानच्या १३५ किमी लांबीच्या चौपदरीकरणाचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला.
रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गाच्या कशेडी ते लांजादरम्यानच्या १३५ किमी लांबीच्या चौपदरीकरणाचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. केंद्रीय मंत्री अनंत गीते तसेच भाजपा-सेनेचे मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळय़ास माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते नारायण राणे हे खास निमंत्रित विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या भूमिपूजन सोहळय़ास भाजप-सेनेचे मंत्री, खासदार, आमदार आणि अन्य पदाधिका-यांची उपस्थिती होती. मात्र, संपूर्ण सोहळय़ावर प्रभाव राहिला तो नारायण राणे यांचा. या सोहळय़ात नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांना विकासाच्या प्रश्नावर लक्ष केले. मुख्यमंत्री केवळ घोषणा करतात, प्रत्यक्षात काहीच करत नाहीत, निधीही मिळत नाही, अशा शब्दात त्यांना सुनावले.
तर केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी अल्पावधीतच महामार्गाच्या चौपदरीकणाला चालना दिली. तसेच महामार्गावरील पुलांच्या रुंदीकरणाचे कामेही पूर्णत्वास आले आहेत, याबाबत धन्यवाद देत गडकरी यांच्याकडून कोकण विकासासाठी भरघोस आश्वासने मिळवली. कोकणातील महामार्गाच्या चौपदरीकरणाचा शुभारंभ हा शासकीय कार्यक्रम होता; मात्र या कार्यक्रमासाठी गडकरी यांनी नारायण राणे यांना खास निमंत्रित केले होते. आपल्या भाषणाच्या प्रारंभीच गडकरी यांनी नारायण राणे यांचा उल्लेख ज्येष्ठ मित्र असा करून त्यांचा सन्मान केला. गडकरी यांनी आपल्या संपूर्ण भाषणात कोकण विकासाची आश्वासने दिली आणि कोटय़वधींचा निधी जाहीर केला. त्या-त्या प्रत्येक वेळी राणे साहेबांना संबोधून ते घोषणा करत होते. त्यामुळे त्यांचे भाषण राणे यांना आश्वासित करणारे होते. राणे यांनी उपस्थित केलेले मुद्दे तसेच त्यांनी केलेल्या कोकण विकासाच्या सर्वच मागण्या त्यांनी मान्य केल्या. केंद्रीय मंत्री गीते यांनीही नारायण राणे यांच्या भाषणाचे सूत्र पकडून आपले भाषण केले आणि विकासाचे मुद्दे मांडले. चौपदरीकरणाचे भूसंपादन योग्य पद्धतीने होत नाही. तसेच किती जमीन संपादित करणार, हे स्पष्ट करण्यात येत नसल्याने ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. याकडे नारायण राणे यांनी आपल्या भाषणात लक्ष वेधले होते. हे सूत्र पकडून गीते यांनीही भूसंपादनाचे काम योग्य पद्धतीने, योग्य प्रकाराने होत नसल्याचे स्पष्ट केले. ते योग्य प्रकारे व्हावे, अशी सूचना अधिका-यांना केली.
सत्ताधारी भाजप-सेनेचे नेते, मंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सोहळय़ात काँग्रेस नेते नारायण राणे काय बोलतात याकडेच उपस्थितांचे लक्ष लागले होते. पत्रकार कक्षात तर राणेच आजचे बातमीचे शीर्षक देणार अशी चर्चा होती. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी भाषणाच्या सुरुवातीपासूनच अक्षरक्ष: चौकार, षटकार सेना-भाजपच्या, युती सरकारच्या काळात विकासाची अनेक कामे रेंगाळली आहेत, याकडे त्यांनी सडेतोडपणे लक्ष वेधले. कोकणच्या विकासाचे कामात आम्हाला राजकारण आणायचे नाही, आम्ही विकासाचे भुकेलेलो आहोत. महाराष्ट्रातील प्रगत ह्यिलंच्या तोडीस तोड किंबहुना त्यांच्याएवढे दरडोई उत्पन्न कोकणातील माणसाचे होईल, या दृष्टीने काँग्रेस सरकारच्या काळात मी प्रयत्न केले होते, असे सांगून राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष केले. राणे यांच्या भाषणापूर्वी अन्यत्र कार्यक्रमाला जायचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री भाषण करून गेले होते. मुख्यमंत्र्यांना भरपूर काम असल्याने ते लवकर गेले. ते शाश्वत विकासावर बोलतात. प्रत्यक्षात कोणतीही कृती होत नाही.
सिंधुदुर्गातील विमानतळाचे काम का रखडले, कोकणातील रस्त्यांची दुरवस्था आहे. पाटबंधारे प्रकल्पांना निधीच दिलेला नाही. त्यामुळे सर्वच प्रकल्प ठप्प झाले आहेत. आरोग्य केंद्रे तसेच शाळागृहे यात पुरेसे डॉक्टर आणि शिक्षक नाहीत, याकडे नारायण राणे यांनी लक्ष वेधले.
नमस्कार, राणेसाहेब आपण कोकणी माणसासाठी व तमाम महाराष्ट्र जनतेसाठी अहोरात्र झटता. आपल्या दूरदृष्ठीमुळे आज महाराष्ट्र एक नंबर ला दरडोई उत्पादनात आहे. आपण पुन्हा मुखमंत्री व्हावे हि माझ्यासारखा तरुण कार्यकर्त्याच्या मनापासून इच्छा आहे. आपले प्रेम माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर राहावे .. माझे गाव भुईंज, ता.वाई हे आहे. मा. मदनदादा भोसले यांचा मी एक साधा व जीवा फार प्रेम करणारा कार्यकर्ता आहे……. जय महाराष्ट्र, जय कोकण, जय सातारा..!!