‘ना नाव ना फोटो कधी सपशेल चुकीचेच नाव’ अशा मतदार यादीतील घोळामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागून मुंबईसह राज्यात वाढत्या टक्केवारीला थोडासा ब्रेक लागला.
मुंबई – ‘ना नाव ना फोटो कधी सपशेल चुकीचेच नाव’ अशा मतदार यादीतील घोळामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागून मुंबईसह राज्यात वाढत्या टक्केवारीला थोडासा ब्रेक लागला.
[poll id=”630″]
पुण्यापाठोपाठ मुंबई आणि इतर मतदारसंघांमध्येही या घोळाचे गालबोट लागले असून अनेक राजकीय पक्ष याविरोधात निवडणूक आयोगासह न्यायालयातही धाव घेणार आहेत. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक तसेच औरंगाबादमध्येही याद्यांमधून नावे गायब झाल्याच्या शेकडो तक्रारींचा पाऊस दिवसभरात पडला.
एका बाजूला वाढलेल्या तापमानाचा पारा मतदारांना ताप देत होता, तर दुस-या बाजूला मतदारयादीतून नावेच गायब झाल्याने होणारा मन:स्तापही त्यांना सहन करावा लागला. मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांतील अनेक ठिकाणी मतदार आणि निवडणूक अधिका-यांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडले. तर, काही ठिकाणी पोलिसांना ताकदीचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
मुंबईतील सहाही मतदारसंघांमधून मतदार यादीतून नावे गायब झाल्याच्या तक्रारी सकाळच्या सत्रापासूनच सुरू झाल्या. नावे गहाळ झाल्याचा फटका अनेक कलाकारांसह मान्यवरांना बसला. अतुल कुलकर्णी, वंदना गुप्ते,
स्वप्नील जोशी, दिग्दर्शक रवी जाधव यांची नावेच यादीत नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. तर, एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांच्यासारख्या ज्येष्ठांनाही यंदा यादीतून नाव गायब झाल्याने मतदानाचा हक्क बजावता आला नाही. अनेक ठिकाणी तर संपूर्ण इमारतीतील रहिवाशांच्या नावांची यादीच गायब झाल्याचे प्रकारही घडले. दिवसभर या घोळाची चर्चा व्हॉट्स अॅप तसेच सोशल मीडियातून सुरू होती.
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील भारत नगर, टाटा कॉलनी, बेहरामपाडा यासारख्या भागात अनेक मतदारांनी नाराजीचे प्रदर्शन केले. यापूर्वी मतदान केले होते, मग यावेळी नाव गायब कसे झाले, असा सवाल मतदारांकडून विचारला जात होता. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील वडाळा येथील सुमारे २० हजार मतदारांची नावे गहाळ झाल्याने गोंधळ उडाला. चिडलेल्या मतदारांनी घोषणाबाजी सुरू केली आणि त्यांना रोखणाऱ्या पोलिसांनाच धक्काबुक्की झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अखेर लाठीहल्ला केला.
याबाबत वडाळा विधानसभा क्षेत्राच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांच्या ‘प्रहार’च्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्यांनी नावे वगळण्याची प्रक्रिया तीन टप्प्यात झाली असून वगळलेल्या मतदारांची यादी वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करून हरकती व सूचनाही मागवल्या होत्या, असे सांगितले. तसेच, त्यावेळी कोणीही वगळलेल्या नावांबाबतची योग्य ती माहिती दिली नाही. अखेर, पंचनामे करून ही नावे वगळली असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
अनेक सोसायटय़ांमध्ये मतदान केंद्र प्रमुख मतदारांची माहिती घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांना इमारतींमध्ये प्रवेश दिला जात नसे, अशाही तक्रारीही आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हे अधिकारी पाहणीसाठी गेले असता अनेक चाळी आणि इमारतींचा पुनर्विकास, एसआरए योजना सुरू असल्यामुळे संबंधित मतदार तिथे राहत नसल्याचेही आढळून आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मतदार याद्यांच्या सर्वाधिक गोंधळाची ठिकाणे
द. मुंबई – मलबार हिल, वरळी,
दक्षिण मध्य मुंबई – दादर, शिवाजी पार्क, सहकारनगर वडाळा, माहीम
उत्तर मध्य मुंबई – वांद्रे, बेहरामपाडा, भारतनगर, टाटा कॉलनी
उत्तर पश्चिम मुंबई – गोरेगाव, पहाडी भाग, नागरी निवारा, दिंडोशी, जोगेश्वरी
उत्तर मुंबई – बोरिवली, कांदिवली
(पू), चारकोप, मालवणी
माझ मतदान यादीत नाव आले नाही. मतदार यादी अगोदर तपासली पाहिजे होती. पण ! यापूर्वी ४ वेळा मतदान केल. त्यावेळी त्याची गरज भासली नाही. मतदानापूर्वी कार्ड मिळत होती. मी माझ घर बदल नाही. मतदान यादीतून नाव काढले नाही. यावेळी घरातील मयत व्यक्तींचे नाव आले. रूम विकून गेलेल्यांचे नाव आली. मग याचा अर्थ एकाच होतो कि मतदाना पूर्वीचा तपास किवा राजकीय कट असू शकतो.