महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना कोणतीही पूर्वसूचना न देता या महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षाव्यवस्थेत एकदम कपात केली आहे.
मुंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना कोणतीही पूर्वसूचना न देता या महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षाव्यवस्थेत एकदम कपात केली आहे. काही व्यक्तींना झेड सुरक्षा देण्यात आली होती. विशेष म्हणजे ही सुरक्षाव्यवस्था संबंधित व्यक्तींनी मागितली नव्हती.
पोलिसांकडे आलेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस यंत्रणेने ही सुरक्षा पुरविली होती. असे असताना अचानक सुरक्षेत कपात करण्यात आली असून, अनेक ठिकाणी ती काढून घेण्यात आली आहे. यासंबंधी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र पाठवले आहे.
»» उद्धव ठाकरेंना झेड सुरक्षा कायम..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री नारायण राणे यांची विशेष सुरक्षा व्यवस्था काढून घेतानाच पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, छगन भुजबळ, अशोक चव्हाण आणि आर. आर. पाटील अशा पाच माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाव्यवस्था अचानक काढून घेतल्या आहेत…
त्या सविस्तर पत्रात कोणत्या कारणाने मला सुरक्षा देण्यात आली होती त्याचा तपशील श्री नारायण राणे यांनी दिला असून, सुरक्षा काढल्यानंतर माझ्या जीवाला धोका झाल्यास त्याची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त जबाबदार राहतील, असे ठणकावून त्यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि
मुंबईचे पोलीस आयुक्त जबाबदार राहतील’.
श्री. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्र पुढीलप्रमाणे..
प्रिय श्री. देवेंद्र फडणवीस यांस,
स. न. वि. वि.
नवीन वर्ष २०१५च्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षानिमित्त आपण मला आधीच दिलेली भेट मिळाली. २८ डिसेंबर २०१४ रोजी कणकवली येथे दौ-यावर पोहोचल्यानंतर मला दिलेले पोलीस संरक्षण काढून घेण्यात आल्याचे मला समजले. संरक्षण काढून घेण्यात येत असल्याची पूर्वसूचना फोनवरून किंवा लेखी देण्यात आली नव्हती.
पोलिसांकडून मला स्वत:हून देण्यात आलेल्या संरक्षणाबाबतची पार्श्वभूमी आपल्या माहितीसाठी थोडक्यात नमूद करीत आहे. १९९१ या वर्षात मी विधानसभा सदस्य होतो. त्यावेळी पोलिसांनी पकडलेल्या मोमीन नावाच्या एका गुन्हेगाराने काही माहिती दिली. आय.एस.डी. फोनचे संभाषण पोलिसांनी टेप केले असताना त्या आधारे त्याला ताब्यात घेतले होते. त्याने अशी माहिती दिली की, तो दाऊद गँगसाठी काम करीत होता. १३ ते १६ जून १९९१ या कालावधीत मी माझ्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी स्वत: कार चालवत जात असताना माझ्यावर गोळीबार करण्याचा त्याचा कट होता. पोलिसांनी मला त्वरित संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मी पोलिसांचे संरक्षण घेण्यास नकार दिला होता. त्यावेळचे मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. राममूर्ती यांनी मी शिवसेना भवनात असताना तेथे उपस्थित असलेल्या आदरणीय शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांना फोन करून यासंबंधी माहिती दिली. मा. साहेबांनी मला तात्काळ संरक्षण घेण्याचा आदेश दिला आणि मी तो मान्य केला.
माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत मी कायदा सुव्यवस्था कठोरपणे हाताळली. मोक्कासारखा धाक निर्माण करणारा कायदा आणला. या काळात बरेच गँगस्टर्स पोलीस कारवाईत मारले गेले. याचा राग संघटित गुन्हेगारी कारवाया करणा-यांना होता व आहे. त्यावेळी छोटा शकील या कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याने मुंबईतील मिड-डे वर्तमानपत्राला मुलाखत देऊन नारायण राणे यांना संपविल्याशिवाय मी सुखाने झोपणार नाही, असे जाहीर वक्तव्य केले. यासंबंधीची सर्व माहिती पोलिसांकडे आहे. मी विरोधी पक्षनेता असताना अतिरेकी व गँगस्टर्सच्या नावानिशी विधानसभेत चर्चा घडवून आणून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास सरकारला भाग पाडले. याचाही राग गँगस्टर्सच्या मनात होता व आहे. शासनाने विरोधी पक्षनेता म्हणून मला दिलेल्या ‘बी-३’ या बंगल्यामध्ये माझी रस्त्यालगतच्या कार्यालयातील बसण्याची जागा दाखविणारे अंतर्गत नकाशे तसेच माझ्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर वाहनाचा वेग कमी होण्याची ठिकाणे दर्शविलेले नकाशे त्यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गँगस्टर्सकडे मिळाले होते.
मी सभेच्या ठिकाणी पोहोचताच बॉम्बस्फोटात माझी हत्या घडविण्याची योजना असल्यामुळे मी सभेला वेळेवर जाऊ नये, असा सल्ला मला पोलिसांनी दिला होता. २००५ मध्ये मी मंत्रीपदावर असताना महिला अतिरेक्यांकडून माझी हत्या घडविण्याचा कट आखण्यात आल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांनी स्वत:हून मंत्रालयातील माझ्या दालनाबाहेर वर्षभर महिला पोलिसांचे संरक्षण तैनात केले होते.
वर नमूद केलेली सर्व माहिती पोलिसांकडे उपलब्ध असताना व आंतरराष्ट्रीय दहशतवादी अजूनही मोकळे असताना माझ्या जीविताला आता धोका नाही हा निष्कर्ष कशाच्या आधारावर काढण्यात आला हे लक्षात येणे कठीण आहे. माझ्या जीविताला आता गँगस्टर्सकडून धोका नाही, असे सरकारचे म्हणणे असेल तर कृपया मला लेखी पत्राने तसे कळविण्यात यावे. यापुढे माझ्या जीविताला काही धोका झाल्यास त्यासाठी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त जबाबदार राहतील, असे प्रतिज्ञापत्र मी करीत आहे.
गेल्या ५० वर्षात महाराष्ट्रात अनेक नवीन सरकारे आली. यापैकी कोणत्याही सरकारने कोणत्याही राजकीय नेत्यांना पोलिसांनी दिलेले वैयक्तिक संरक्षण सुडाच्या भावनेने काढून घेतलेले नाही. मी आमदार, मंत्री, मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेता या नात्याने माझे कर्तव्य नेकीने पार पाडताना गँगस्टर्सविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे पोलिसांनी स्वत:हून संरक्षण पुरविले होते, कोणत्याही अंतर्गत वादातून नव्हे. सरकारची भूमिका अशीच राहिल्यास, भविष्यात कोणतेही लोकप्रतिनिधी विधिमंडळात व विधिमंडळाबाहेर गँगस्टर्स व दहशतवाद्यांविरोधात शब्दही उच्चारणार नाहीत. आपल्याला सुडाचे राजकारण करायचे असेल तर माझे संरक्षण जरूर काढावे, त्या माध्यमातून राज्यामध्ये उच्च दर्जाची कायदा व सुव्यवस्था ठेवता येईल.
आपला नम्र
नारायण राणे
राणे साहेब तुम्हाला काय झाल तर सगळ मंत्रालय पेटवू आणि यावेळी तेही मुख्यमंत्री आत असताना…