मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केलेल्या शिवसेना-भाजपापैकी मतदारांनी कुणालाही स्पष्ट बहुमत दिले नाही. शिवसेनेला ८४ जागा मिळाल्या तर भाजपाचा गाडा ८२ जागांवर अडला आहे.
मुंबई- मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केलेल्या शिवसेना-भाजपापैकी मतदारांनी कुणालाही स्पष्ट बहुमत दिले नाही. शिवसेनेला ८४ जागा मिळाल्या तर भाजपाचा गाडा ८२ जागांवर अडला आहे.
अगोदर एकमेकांवर तुटून पडलेल्या दोन्ही पक्षांच्या भाषा आता बदलू लागल्या आहेत. यावरून शिवसेना-भाजपाचे नेते लवकरच ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ करीत एकत्र येण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकांनीच तसा कौल दिला आहे, असे सांगून पुन्हा त्याचे खापर मतदारांवर फोडतील, अशी राजकीय चर्चा आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपाचाच आवाज राहिल्याप्रमाणे दोन्ही पक्षांना जवळपास सारख्या जागा मिळाल्या आहेत. भाजपा दोन जागांनी मागे असला तरी भाजपा पुरस्कृत चार उमेदवार आहेत, असा दावा करीत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी भाजपाच एक नंबरचा पक्ष असल्याचे सांगितले आहे.
काँग्रेस ३१ जागा मिळवून तिस-या क्रमांकावर, तर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन आकडी संख्याही गाठता आली नाही. राष्ट्रवादीला ९ जागा मिळाल्या. तर मागच्या वेळी मुंबईमध्ये मुसंडी मारणा-या मनसेला यावेळी केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. अपक्ष १४ नगरसेवक निवडून आले आहेत.
युतीमध्ये शिवसेनेची पंचवीस वर्षे सडली, असे सांगत स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा करीत असतानाच यापुढे कुणासोबतही युती करणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला आव्हान दिले होते. भारतीय जनता पार्टीनेही ही निवडणूक जिंकणारच असा पवित्रा घेतला होता. दोन्ही पक्षांनी स्वबळावर सत्ता मिळविण्याचे प्रयत्न केले. मात्र प्रत्यक्षात कुणालाही बहुमत मिळाले नाही.
शिवसेनेला ८४ जागा मिळाल्या तर भाजपा केवळ दोन जागांनी मागे आहे. आता या दोन्ही पक्षांना एकत्र येणे किंवा काँग्रेसची मदत घेतल्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही. दोन्हीपैकी कुणालाही काँग्रेस पाठिंबा देण्याची शक्यता नसल्याने शिवसेना-भाजपा या दोघांनाच पुन्हा एकत्र यावे लागणार आहे.
निवडणुकीचा पूर्ण निकाल येण्याच्या आधीच भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, ‘आता झाली एवढी कटुता पुरे झाली. भाजपा आणि शिवसेनेला मुंबईत एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. हे दोघे एकत्र येणार नाहीत तर काँग्रेससोबत एकत्र येणार का?’ असा सवाल करून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस मोठे आहेत. ते दोघेही क्षुल्लक मुद्दे बाजूला ठेवून राज्यासाठी एकत्र येतील, असे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
निकालाचा पहिला कौल थेट शिवसेनेच्या बाजूने दिसत होता. भाजपा अध्र्यापेक्षाही मागे पडल्याचे चित्र दुपापर्यंत दिसत होते. तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांचा उत्साह जोरात होता. ‘‘शिवसेनेचा सूर्य मावळणार नाही,’ असे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला डिवचले होते. त्यावेळी शिवसेना ९३ जागांवर आघाडीवर होती. तर भाजापचे घोडे ६७-६८ वरच अडकले होते. मात्र सायंकाळी वांद्रे ते दहिसर या पश्चिम पट्टयात ९० टक्के जागांवर भाजपाच्या बाजूने कौल आल्याने भाजपाच्या जागा एकदम तीसने वाढल्या.
आघाडीवर असलेले शिवसेनेचे तब्बल नऊ उमेदवार मागे पडले आणि शिवसेनेचा आकडा ८४ वर स्थिरावला. तर भाजपाने मुसंडी घेत थेट ८१ चा आकडा गाठला. शेवटचे भाजपाचे उमेदवार भारत शहा हे ईश्वर चिट्ठीवर निवडून आल्याने भाजपा ८२ वर स्थिरावला. नंतर ‘‘युतीमध्ये २५ वर्षे सडली.
आता कुणाबरोबरही युती करणार नाही, असे सांगणा-या उद्धव ठाकरे यांनाही युतीबद्दल विचारले असता थेट नकार दिला नाही. ‘घाई काय आहे? जरा धीर धरा.’ असे सांगत दोन्ही पक्षांची युती होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. म्हणजे पुन्हा कल्याण-डोंबिवली महापालिकेप्रमाणेच दोघांनी मिळून लोकांनाच वेडयात काढल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
शिवसेनेने काँग्रेस तसेच राष्ट्रवादी, मनसे व अपेक्षां बरोबर युती करून महापालिकेत सत्ता स्थापन करावी अन्यथा पुन्हा भाजप बरोबर गेल्यास शिवसेनेचा विनाश अटळ आहे. शिवसेनेला कोणीही वाचवू शकणार नाही.
सचिन पवार – सुभाष नगर, चेंबूर, मुंबई.
काँग्रेसला वाचवायचे असेल तर राणे साहेबाना मुंबई अध्यक्ष पद द्या. मग बघा.