गुजरातच्या मुद्दयावरून उठलेल्या वादळानंतर, हा राजकीय मुद्दा आहे, यात प्रांतवादाचा प्रश्नच येत नाही, असे सांगत ‘स्वाभिमान’चे अध्यक्ष नितेश राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मुंबई- गुजरातच्या मुद्दयावरून उठलेल्या वादळानंतर, हा राजकीय मुद्दा आहे, यात प्रांतवादाचा प्रश्नच येत नाही, असे सांगत ‘स्वाभिमान’चे अध्यक्ष नितेश राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गुजरातचे विकासाचे मॉडेल आणि मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे गुणगान गाणा-यांचा समाचार घेणारी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी ‘ट्विटर’वर व्यक्त केली होती. तब्बल १५ दिवसांपूर्वी केलेल्या या ट्विटची दखल घेत इंग्रजी माध्यमांनी याबाबतची सविस्तर मुलाखत प्रसिद्ध केली.
मुलाखतीत नितेश राणे यांनी, महाराष्ट्राच्या भूमीत राहून गुजरातच्या विकासाचे आणि मोदींचे कौतुक करणा-या गुजराती भाषकांना खडे बोल सुनावले. मोदींनी जर त्या राज्याचा विकास केला असेल, तर त्यांच्यावर विश्वास ठेवून येथील गुजराती भाषकांनी गुजरातमध्ये जावे, या विधानावरून मराठी आणि गुजराती असा प्रांतवाद रंगविण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून केला जात आहे. याचा समाचार शनिवारी पत्रकार परिषदेत घेत नितेश राणे यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. हा एक राजकीय मुद्दा आहे, प्रांतवाद नाही, असे सांगतच त्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली.
महाराष्ट्राच्या भूमीत राहणा-यांनी या राज्याबद्दल अभिमान बाळगायलाच हवा. परंतु मुंबई-महाराष्ट्रात राहून गुजरातच्या विकासाचे आणि तेथील मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे गुणगान जी गुजराती भाषक मंडळी गात आहेत, त्यांनी त्यांच्या राज्यात परत जावे, ही आपली भूमिका असून आजही आपण या मुद्दयावर कायम आहोत, असे नितेश राणेंनी या वेळी ठणकावून सांगितले.
महाराष्ट्र हे राज्य आजही उद्योगधंदे आणि पर्यटन आदी क्षेत्रांत पहिल्या क्रमांकावर असून गुजरात महाराष्ट्राच्या विकासाच्या तुलनेत खूप मागे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनीही गुजरातची टिमकी वाजवण्यापेक्षा महाराष्ट्र कशाप्रकारे विकासाच्या क्षेत्रात अग्रेसर आहे याचा विचार करावा, असा टोलाही नितेश राणे यांनी राज्यातील गुजरातप्रेमी नेत्यांना मारला.
गुजरातच्या मॉडेलची चर्चा रंगवली जात असली तरी हे केवळ नाटक आहे. त्यांचे सर्व दावे खोटे आहेत. गुजरातचा विकास झाला असता तर येथील गुजराती भाषक या ठिकाणी राहिला नसता. तो येथून जात नाही, याचाच अर्थ गुजरातचा विकास झालेला नाही. परंतु भाजप आणि काही गुजराती भाषक जाणीवपूर्वक हा प्रचार करून गुजरात मॉडेलचे वातावरण रंगवण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठी आणि गुजराती भाषकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा आपला प्रयत्न नाही. आपला रोष हा केवळ मोदी पुराण करणा-यांवर आहे, स्वाभिमानी गुजराती भाषकांविरोधात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील अनेक गुजराती भाषकांना महाराष्ट्राचा अभिमान आहे.
त्यांच्याबद्दल मलाही अभिमान आहे. माझा विरोध हा महाराष्ट्राला कमी लेखून गुजरातला अग्रेसर दाखविण्याचा जो खटाटोप काही गुजराती भाषकांकडून चालला आहे त्यांना आहे. या गुजरातींना मारहाण करा किंवा त्यांना हाकलून लावा, असे आपण कुठेच काही म्हटलेले नाही. भाजपने आजवर जातीयतेच्या नावानेच राजकारण केले आहे. त्यांचा पूर्वेतिहास तोच आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी जातीयता, प्रांतवाद हेच दिसते. याचा धागा पकडूनच ते मोठे झाले आहेत,अशी परखड टीका नितेश राणे यांनी केली.
मुंबईतील गुजराती समाजाबाबतचे नितेश राणे यांनी ट्विटरवर केलेले वक्तव्य तपासण्यात येईल व त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. – आर. आर. पाटील, गृहमंत्री
गुजराती भाषकांच्या टीकेचे काय?
ट्विटरवर केवळ मोदींचे अनाठायी कौतुक करणा-यांच्या विरोधात बोललो होतो. परंतु गुजराती भाषकांनी वैयक्तिक पातळीवर घसरत टीका करत, अपशब्द वापरले आहेत. ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची’, ‘मुंबईतून आम्ही गेल्यावर आमची चप्पल उचलणार कोण’ अशा प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. असे म्हणणा-या गुजराती मंडळींवर कारवाई कोण करणार? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.
अमिताभ ब्रँड अँबॅसेडर असूनही गुजरात मागेच
गुजरातने बिग बी अमिताभ बच्चन यांना राज्याचा बँड्र अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे. तरीही त्यांना पर्यटन आणि उद्योगधंद्यात प्रगती करता आलेली नाही. उलट महाराष्ट्र आजही उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात अग्रेसर आहे.
शोभा डेंचे विधान हे चार भिंतीतले
‘मुंबई ही सर्वाचीच आहे, यावर सर्वाचाच अधिकार आहे’, या लेखिका शोभा डे यांच्या विधानाबाबत नितेश राणे यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता ते उत्तरले, ‘हे पहाटेच्या वेळी लवकर उठून चार भिंतींच्या आत केलेले लिखाण आहे. ‘पेज थ्री’च्या पार्टीत झिंगणा-यांनी अधिकाराची भाषा करू नये. त्यांना जर हे सांगायचे असेल तर त्यांनी रस्त्यावर उतरून भूमिका मांडावी. आम्ही ‘स्वागत’ करायला तयारच आहोत.’
नितेशसाहेब जे बोलले ते योग्यच आहे,नको इतका गुजरातचा उदो-उदो चाललेला आहे?? जणू जगाच्या पाठीवर विकास घडतोय तो गुजरात मध्येच असा भ्रम पसरवला जात आहे.रोजगार देण्यामध्ये,मानवी विकास व आरोग्य सुविधा देण्यात महाराष्ट्र हे गुजरातपेक्षा आघाडीवर आहे,देशाची दिशा व दशा ठरविण्यात महाराष्ट्र कायमच आघाडीवर राहिला आहे