मराठा समाजाला मिळालेले हक्काचे आरक्षण हिरावले गेल्यामुळे कोपर्डी प्रकरणानंतर जे महामोर्चे निघत आहेत, त्यातून या असंतोषाचा, अस्वस्थतेचा अंगार प्रकट होत आहे, अशी स्पष्टोक्ती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी केली.
मुंबई- मराठा समाजात वारंवार वेगवेगळ्या माध्यमांतून होणा-या अन्यायाची अस्वस्थता आहे. विशेषत: मराठा समाजाला मिळालेले हक्काचे आरक्षण हिरावले गेले. त्यामुळे समाजाच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. कोपर्डी प्रकरणानंतर जे महामोर्चे निघत आहेत, त्यातून या असंतोषाचा, अस्वस्थतेचा अंगार प्रकट होत आहे, अशी स्पष्टोक्ती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी केली. मराठा समाजाच्या भावना सरकारने वेळीच समजून घेतल्या पाहिजे, असे ते म्हणाले.
कोपर्डी प्रकरणानंतर मराठा समाजाचे महामोर्चे निघत आहेत. यावर ‘आयबीएन लोकमत’ वाहिनीवर झालेल्या चर्चेत नारायण राणे यांनी अत्यंत समर्पक मुद्दे मांडून या मोर्चामधून व्यक्त होणा-या समाज भावनांचे विश्लेषण केले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर सर्वाधिक काळ मराठा समाजाच्या नेत्यांनी राज्य केले. राज्यातील अनेक सहकारी कारखाने मराठा नेत्यांच्या ताब्यात आहेत. असे असताना मराठा समाजावर अन्याय झाला कसे म्हणता येईल? या कुमार सप्तर्षी यांच्या सवालावर राणे म्हणाले की, महाराष्ट्रात एकूण ३४ टक्के मराठा समाज आहे. त्यातील केवळ काही बोटावर मोजण्याइतक्या लोकांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले. मी मुख्यमंत्री झालो, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण किंवा शरद पवार यांनी राज्य कारभार केला. आमची परिस्थिती चांगली आहे म्हणजे काय सर्व समाजाची तीच परिस्थिती आहे काय?
मराठा समाजाचे मुख्यमंत्री झालेले असले तरी त्यांनी केवळ आपल्या एकटय़ा समाजाचे हित पाहिले नाही, तर राज्यातील सर्व समाजाचे हित डोळय़ासमोर ठेऊन त्यांनी निर्णय घेतले. ज्यांनी ज्यांनी आरक्षण मागितले, त्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. इतर समाजांमध्ये मागासलेपण असल्यामुळे त्यांनी आरक्षण मागितलेले चालत असेल तर मग धनगर आणि मराठा समाजाने आरक्षण का मागू नये? असा बिनतोड सवालही त्यांनी केला.
मराठा आरक्षण समितीचा अध्यक्ष म्हणून कोणत्या आधारावर आरक्षणाची शिफारस केली हे सांगताना राणे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षणाची शिफारस मी काहीही न पाहता केलेली नाही. आरक्षण समितीचा अध्यक्ष म्हणून मी त्याचा सखोल अभ्यास केला आहे आणि हा अभ्यास मी मुंबईत बसून केला नाही. त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात फिरलो. मराठा समाजाच्या वेगवेगळय़ा संघटनांशी चर्चा केली. इतकेच नव्हे तर इतर समाजाच्या नेत्यांशीही चर्चा केली. तेव्हा माझ्या लक्षात आले की ग्रामीण भागातील मराठा समाज अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जगत आहे. या समाजाला आरक्षणाची गरज आहे, असे लक्षात आल्यानंतर त्यांचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी पाहाणी केली. राज्यातील साडेसतरा हजार कुटुंबाची माहिती गोळा करण्यात आली. त्यातून हा समाज शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्टय़ा कसा मागासलेला आहे, हे शास्त्रीय दृष्टय़ा सिद्ध केले आहे. मराठा समाजाला आरक्षणाची शिफारस करीत असताना कोणत्याही इतर समाजावर अन्याय केलेला नाही. किंवा इतर कुणाच्याही वाटय़ाचे आरक्षण कमी केलेले नाही. घटनेतील तरतूदीप्रमाणे एखादा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टय़ा मागासलेला असेल तर त्याला आरक्षण देण्याची तरतूद आहे, त्या आधारावर आरक्षण देण्यात आले होते. त्याचा गरीब मराठा तरुणांना शिक्षण आणि नोकरीमध्ये लाभ होणार होता. मात्र राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर त्याबाबत योग्य मांडणी न केल्यामुळे मिळालेले आरक्षण हातचे गेले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी या सरकारचीच इच्छा नाही, अशी भावना मराठा तरुणांच्या मनात निर्माण झाल्याने प्रचंड असंतोष खदखदत होता. कोपर्डी येथे झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर निघणा-या मोर्चाच्या माध्यमातून हा असंतोषच व्यक्त होत आहे.
मराठा समाज जागृत झाला आहे म्हणूनच लाखालाखांचे मोर्चे निघत आहेत. इतके मोठे मोर्चे निघत असतील तर त्या मागची भावना सरकारने समजून घेतली पाहिजे, अशी जी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली आहे ती योग्यच आहे. ग्रामीण भागात अॅट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्याने त्यात काही सुधारणा झाल्या पाहिजेत, अशी मागणीही पवार यांनी केली आहे. त्याबाबतही विचार होण्याची आवश्यकता आहे. हा कायदा रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली नाही, तर त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये, यासाठी सुधारणा कराव्या असे म्हटलेले आहे. खरे तर दलित किंवा इतर समाजाच्या हितासाठी जे कायदे तयार झाले त्यासाठी मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी आणि नेत्यांनीच पुढाकार घेतला होता, याचाही विचार झाला पाहिजे, असेही राणे म्हणाले.
नारायण राणे यांची आज पत्रकार परिषद
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद गुरुवार, १ सप्टेंबर, २०१६ रोजी गांधीभवन येथे आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ४ वाजता ही पत्रकार परिषद होईल.
MARATHA SAMAJALA ARAKSHAN MILALECH PAHIJE ANYATHA SARVA ARAKSHANE RADDA ZALICH PAHIJE