कोकण रेल्वे मार्गावर वारंवार होणा-या अपघातानंतर रेल्वे मार्ग किती सुरक्षित असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रत्नागिरी- कोकण रेल्वे मार्गावर वारंवार होणा-या अपघातानंतर रेल्वे मार्ग किती सुरक्षित असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील काही कालावधीत झालेल्या अपघातांची संख्या विचारात घेतली तर कोकण रेल्वे मार्गाचा क्षमतेपेक्षा अधिक वापर केला जातोय का? या मार्गाच्या देखभालीसाठी योग्य वेळ मिळत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढलयं का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. मार्च २०१४ पासून कोकण रेल्वे मार्गावर सहा महिन्यात चार मोठे अपघात झाले. यातील तीन अपघात मालगाडय़ांचे असल्याने याची तीव्रता जाणवली नसली तरी, कोकण रेल्वे मार्गावरील वाढत्या अपघातांच्या प्रमाणामुळे निर्धोक असा हा मार्ग दिवसेंदिवस असुरक्षित होत असल्याचेच दिसून येत आहे.
कोकण रेल्वेचा वापर हा उत्तरेतील गाडय़ा कमी वेळात वेगाने दक्षिणेत नेण्याचा मार्ग असाच होतोय. अशातच कोकण रेल्वेला आर्थिकदृष्टय़ा फायद्यात आणण्यासाठी प्रवासी वाहतुकीपेक्षा मालगाडय़ांच्या वाहतुकीला प्राधान्य देण्यात येत आहे. कोकणात येणा-या रेल्वेपेक्षा दक्षिणेत जाणा-या रेल्वेंची संख्या कितीतरी अधिक आहेच पण त्यातूनच कोकण रेल्वेच आर्थिक गणित अवलंबून असलेल्या मालगाडय़ांची मोठय़ा प्रमाणावर वाहतूक करण्यात येते. या व्यस्त कार्यक्रमात कोकण रेल्वे मार्गाच्या डागडुजीकडे मात्र दुर्लक्षच झाल्याचे दिसून येत आहे. याच महत्वाच्या कारणांमुळे कोकण रेल्वे मार्गावर जानेवारी २०१४ पासून आत्तापर्यंत आठ महिन्यात तीन गंभीर अपघात झाले आहेत.
प्रहार कौल-
[poll id=”755″]
साधारणत: मालगाडीच्या एका बोगीत १४ टनापर्यंत माल असतो. असे ५० पेक्षा अधिक डबे एका मालगाडीला जोडले जातात. दिवसाला अनेक मालगाडय़ा कोकण रेल्वे मार्गावरून धावतात. अशा परिस्थीतीत रेल्वे मार्गाची देखभाल करणे आवश्यक असताना याकडे मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात येत आहे. रेल्वे मार्गावरील व्यस्त वाहतुकीमुळे देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे आणि हेच कारण कोकण रेल्वे मार्गावरील अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. बारा वर्षात कोकण रेल्वे मार्गावर अनेक अपघात झाले मात्र या चौकशीचे अहवाल कधीच समोर आले नाहीत. आधुनिक तंत्रज्ञानासाठी स्वत:चीच पाठ थोपटून घेणारी कोकण रेल्वे प्रत्येक अपघातानंतर तोंडघशी पडल्याचे दिसून येते. मे २०१३ पासून कोकण रेल्वे मार्गावर सहा अपघात झाले आणि वाहतूक बंद झाली मात्र, या ठिकाणी प्रत्येक वेळी अहवाल आणि दोषींवर कठोर कारवाई झाली नसल्याचे दिसून येत आहे.
६ मे २०१३ रोजी संगमेश्वरनजिक रुळाला तडे गेल्याने काही तास वाहतूक बंद झाली. ३ जुलै २०१३ ला आडवली रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळित झाली होती. २० जुलै २०१३ ला विलेवाडी-वैभववाडी येथे दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती. ६ ऑक्टोबर २०१३ रोजी खेडजवळ मांडवी एक्स्प्रेस इंजिन व डबा घसरल्याने वाहतूक बंद झाली होती. १६ मार्च २०१४ रोजी उक्शी बोगद्यात मालगाडीचे चार डबे घसरल्याने अपघात होऊन वाहतूक ठप्प झाली होती तर, ११ एप्रिल २०१४ रोजी आडवली निवसर येथे मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वे वाहतूक बंद झाली होती. यानंतर मे २०१४ रोजी कोकण रेल्वे मार्गावर दिवा-सावंतवाडी पॅसेंजर रोहा-नागोठणे मार्गावर घसरून सर्वात मोठा अपघात झाला. यात अनेक प्रवाशांचे प्राण गेले तर कित्येकजण जखमी झाले. मात्र, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या अपघातांमुळे कोकण रेल्वे मार्ग असुरक्षित होऊ लागल्याची भावना प्रवाशांमध्ये रूजू लागली आहे.
कोकण रेल्वेचे नाव बदलून ” पनवती रेल्वे ” नामंकरण करा , !!!