स्वतंत्र विदर्भाची मागणी करणा-या आणे यांच्या तोंडूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत, असा सणसणीत टोला डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शनिवारी येथे हाणला.
मुंबई- महाराष्ट्राचे तुकडे करणे म्हणजे मराठी भाषेचे तुकडे करण्यासारखे आहे. स्वतंत्र विदर्भाची मागणी करणा-या आणे यांच्या तोंडूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत, असा सणसणीत टोला मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शनिवारी येथे हाणला.
‘स्वाभिमान’ संघटनेने आयोजित केलेल्या हुतात्मा कुटुंबीय कृतज्ञता सत्कार सोहळय़ात अध्यक्ष पदावरून डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. आमदार नितेश राणे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ही अत्यंत अभिमानास्पद आणि वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात कोणतीच भूमिका घेत नाहीत, हा दुटप्पीपणा आहे. अखंड महाराष्ट्राचा जयजयकार करा, नाहीतर खूर्ची सोडा, असा इशाराही त्यांनी दिला. अखंड महाराष्ट्राच्या लढय़ासाठी नितेश राणे मी त्यांच्या पाठी राहीन, असेही त्यांनी घेषित केले.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा होऊन ५६ वर्षे उलटली तरी हुतात्म्यांसोबत त्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा साधा विचारही कुणाच्या मनात आला नाही. कुणालाही अक्कल आली नाही. पण नितेश राणे यांच्या कल्पकतेतून हुतात्म्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता दर्शवणा-या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले ही वाखणण्याजोगी बाब असल्याची भावना सबनीस यांनी व्यक्त केली. मुंबई शहर केवळ धनदांडग्यांच्या, भांडवलदारांच्या हाती न रहावे यासाठी कामगार वर्ग, शेतकरी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला होता. एस.एम.जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख आदी नेते चळवळीतील महत्त्वाचे नेतृत्त्व ठरले. आचार्य अत्रे यांनी त्यांच्या ‘मराठा’ दैनिकातून संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करत लेखणीने विरोधकांवर बोचरी टिका केली. शाहीरांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली, अशा भावना व्यक्त करत सबनीसांनी पुढे मुख्यमंत्र्यांच्या दुटप्पीपणाचा खरपूस समाचार घेतला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवणारे स्वतंत्र विदर्भाची मागणी करणा-यांविरोधात काहीच भूमिका घेत नाहीत हा दुटप्पीपणा आहे. अखंड महाराष्ट्रासाठी लढत विदर्भ, मराठवाडय़ासह समस्त महाराष्ट्रातील समस्या सोडवा अन्यथा खुर्ची सोडा, असा संताप सबनीस यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींविरोधात घोषणा केल्यानंतर सबनीस यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. मात्र यावेळी नितेश राणे यांनी वैयक्तीक भेट घेत दर्शवलेल्या पाठिंब्याचे सबनीस यांनी कौतुक केले. तसेच अखंड महाराष्ट्राच्या लढय़ासाठी नितेश राणे यांनी घेतलेल्या पुढाकाराला समर्थनीय आर्शीवादही दिले.
जय अखंड महाराष्ट्र !