भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे उद्धव ठाकरे नावडते आहेत. तर राज ठाकरे आवडते आहेत.
नवी दिल्ली- भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे उद्धव ठाकरे नावडते आहेत. तर राज ठाकरे आवडते आहेत. नावडते-आवडते अशी विभागणी खुद्द नितीन गडकरी यांनीच एका वाहिनीवर बोलताना केली. ‘राज मला जास्त जवळचे आहेत, त्यामुळे ते जास्त आवडतात’, असे गडकरी यांनीच एका वाहिनीवर बोलताना सांगितले.
गडकरी यांना थेट प्रश्न विचारला होता की, ‘ठाकरे बंधूंपैकी तुमचा आवडता-नावडता कोण?’ त्या प्रश्नावर गडकरी यांनी राज ठाकरे यांना जवळ केले असून, उद्धव ठाकरे यांना लांब ठेवले आहे.
‘जे खरं आहे, ते मी बोलतोय,’ असे स्पष्टपणे सांगून गडकरी यांनी उद्धव ठाकरे त्यांच्यातील अंतर गडकरी यांनीच आखून दिले. शिवसेना महाराष्ट्रातील सरकारात आहे आणि भाजपा सरकारात सामील असताना गडकरी यांनी शिवसेना आवडते, असेही सांगितले नाही आणि राज ठाकरे अधिक आवडतात, असेही सांगत ‘खरं ते खरं’ असे सांगून उद्धव यांना दूर लोटले आहे आणि राज ठाकरे यांना जवळ केले आहे.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेची युती तोडताना दिल्लीमध्ये ज्या हालचाली होत होत्या त्यात नितीन गडकरी यांचा आग्रह महाराष्ट्रात ‘मनसे’शी युती करावी, असा होता. निवडणुकीआगोदर ‘कृष्णकुंज’ येथे जाऊन नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेटही घेतली होती. आजही भाजपा आणि सेनेमध्ये सरकारमध्ये बसले असताना जे अंतर पडलेले आहे त्यात केंद्रीय नेतृत्वापैकी खुद्द नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा आणि महाराष्ट्राचे नितीन गडकरी हे तिघेही शिवसेनेच्या विरोधातच आहेत. गडकरी यांनी व्यक्तिगत पातळीवर आता ‘मनसे’च्या राज ठाकरे यांना पसंती दिली आहे.
मुंबईत फक्त मराठी तरुणांनाच रिक्षा परवाने देण्याची शिवसेनेचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या भूमिकेलाही नितीन गडकरी यांनी कडक विरोध केला आहे. गडकरी म्हणाले की, ‘फक्त मराठी माणसांनाच रिक्षा परवाने देण्याची भूमिका मला मान्य नाही. मुंबईत कष्ट करणा-या आणि रिक्षा चालवण्याची तयारी असणा-या कोणत्याही तरुणाला-मग तो मराठी असो की नसो, रिक्षाचा परवाना मिळालाच पाहिजे,’ असे माझे स्पष्ट मत आहे.
या चर्चेमध्ये गडकरी यांनी आणखी एक गुपित उघड केले आहे की, किंवा त्यांच्या मनातील इच्छा प्रत्यक्षात न आल्यामुळे आपण त्याग केला असल्याचे दाखवले आहे.
असा प्रश्न विचारला गेला होता की, ‘तुमचं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हुकलेले आहे आणि फडणवीस यांच्या पारडय़ात पंतप्रधानांनी दान टाकलेले आहे..’
यावर राजकीय टिपण्णी करून गडकरी यांनी उत्तर दिले आहे की, ‘फडणवीस यांचे नाव ठरवण्यापूर्वी पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याबाबत मला विचारले होते. त्यावेळी मी असे सांगितले होते की, ‘मी दिल्लीतच खूश आहे’.
काळा पैसा, महागाई याबाबत निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांचं काय याविषयीचे प्रश्न मात्र गडकरी यांनी गोलमाल उत्तरे देत बाजूला सारले.
अच्छे दिन हे सगळ्यांसाठीच समान नसतात. प्रत्येकाचे १०० टक्के समाधान होणे अशक्य आहे. प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात, अशी पळवाट त्यांनी काढली. महागाई, कांद्याचे भडकते भाव याबाबत त्यांनी मागणी आणि पुरवठा यांचेच गणित रेटले. कांदा कमी असला की भाव वाढतात, असे ते म्हणाले.
काळा पैसा एकदम आणता येत नाही. त्यासाठी वेगवेगळ्या देशांशी करार असतात, कायदेशीर प्रक्रिया असते. ही काही एका दिवसात होणारी प्रक्रिया नाही, असे ते म्हणाले.
मांसाहाराबद्दलही त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. कोणी काय खायला हवे यात सरकारने लक्ष घालायची गरज नाही या भूमिकेशी आपण सहमत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतंत्र विदर्भाबाबत जेव्हा परिस्थिती अनुकूल असेल तेव्हा आमचा पक्ष पुढाकार घेऊन योग्य निर्णय घेईल, असे त्यांनी संसदेतील संख्याबळाची सबब पुढे करत सांगितले. मला माझी पात्रता आणि वकुबापेक्षाही बरेच काही मिळाले आहे. आता पुन्हा पक्षाध्यक्षपद मिळाले तरीही ते स्वीकारणार नाही, असे आपण मनापासून सांगत आहोत, असेही गडकरी यांनी या मुलाखतीत सांगितले.
कोणाला कोणीही आवडो न आवडो !
गडकरी आमुचे आवडते नेते आहेत !!