गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल शाळेतल्या प्रद्युम्न ठाकूर या ७ वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह हरयाणा सरकार, सीबीआय आणि सीबीएसईला नोटीस जारी केली आहे.
नवी दिल्ली- गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल शाळेतल्या प्रद्युम्न ठाकूर या ७ वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह हरयाणा सरकार, सीबीआय आणि सीबीएसईला नोटीस जारी केली आहे. तर हरयाणा सरकारच्या आदेशानुसार शाळेचे समन्वयक जेईस थॉमस आणि रायन ग्रुपच्या उत्तर भारत विभागाचे प्रमुख फ्रान्सिस थॉमस यांना विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी जेजेए कायद्याच्या कलम ७५ अंतर्गत या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
हरियाणाचे शिक्षण मंत्री रामबिलास शर्मा यांनी रविवारी शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी व्यवस्थापनाची असते. मात्र, रायन शाळेचे व्यवस्थापन यात अपयशी ठरल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले होते.
तर दुसरीकडे रायन इंटरनॅशनल ग्रुपचे सीईओ रायन पिंटो यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जही दाखल केला आहे. रायन इंटरनॅशनल ग्रुपचे मुख्यालय मुंबईत आहे.
प्रद्युम्न ठाकूर हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा मनुष्यबळ विकास विभाग, हरयाणा सरकार, सीबीआय आणि सीबीएसईला नोटीस जारी केली आहे. कोर्टाने या सर्व पक्षकारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी ३ आठवड्यांची मुदत दिली आहे. प्रद्युम्नचे वडील वरुण ठाकूर यांनी प्रद्युम्नच्या हत्येसंदर्भात याचिका दाखल केली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तातडीची सुनावणी घेतली. न्या. दीपक मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सरन्यायाधीशांव्यतिरिक्त न्या. ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड यांचा या खंडपीठात समावेश आहे.
वरुण ठाकूर यांनी सांगितले, ‘माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. न्यायालयाने जी कार्यवाही केली त्यावर मी समाधानी आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मला फोन केला होता. हरयाणा सरकारकडूनही आम्हाला पाठिंबा मिळत आहे.’ वरुण ठाकूर यांच्या वकिलांनी सांगितल्यानुसार, ही नोटीस केवळ एका शाळेपुरती मर्यादित नाही. देशातल्या सर्व शाळांना ती लागू होते. शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची याचिका वरुण ठाकूर यांनी याचिकेत केली आहे. यासह प्रद्युम्नच्या हत्येची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे सोपवावा, अशी मागणीही ठाकूर यांनी केली आहे.
गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या शौचालयात ८ सप्टेंबर रोजी प्रद्युम्नचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. हत्येच्याच दिवशी स्कूल बस कंडक्टर अशोक कुमार याला प्रद्युम्नचा लैंगिक छळ करून हत्या केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. आरोपी कंडक्टर अशोक कुमारने हत्येची कबुली दिली आहे. परंतु या प्रकरणाचा अद्याप उलगडा झालेला नाही. तसेच प्रद्युम्नच्या आईचे म्हणणे आहे की प्रद्युम्नने शाळेत असे काहीतरी घडताना पाहिले आहे, जे पुढे येऊ नये म्हणून त्याला ठार करण्यात आले. ख-या दोषींना अटक न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा प्रद्युम्नच्या आईने दिला आहे.
[EPSB]
दरम्यान, उत्तर विभागात रायन इंटरनॅशलनच्या २३ शाळा आहेत. त्यापैकी दिल्ली एनसीआरमधील ११ शाळांचा समावेश आहे. प्रद्युम्नच्या हत्येनंतर मोठ्या प्रमाणावर पालकांनी ठिकठिकाणी निदर्शने केली आहे. यावेळी पालक आणि मीडियावर लाठीचार्ज केल्याप्रकरणी पोलिसांवरही कारवाई करण्यात आली. रायन इंटरनॅशनल स्कूल ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते, तेथील पोलिस इन-चार्जचे निलंबन केले आहे.
तसेच कोणताही वकील कोर्टात रायन स्कूलची बाजू लढवणार नाही, असा निर्णय बार असोसिएशनने घेतला आहे. यापूर्वी बार असोसिएशनने हत्येचा आरोपी अशोक कुमारचा खटला न लढण्याचा निर्णय घेतला होता.
रियान स्कूलमध्ये सधाचे व्यवस्थापन बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी. अन्यथा पुरावे नष्ट होतील.