शाळांमध्ये दूरदर्शन संचाची व्यवस्था करण्यापासून ते अगदी गणेशोत्सवाच्या धामधुमीत मुलांना शाळेत एकत्र गोळा करण्यापर्यंत शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
विरार – शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्याच्या सक्तीमुळे ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये दूरदर्शन संचाची व्यवस्था करण्यापासून ते अगदी गणेशोत्सवाच्या धामधुमीत मुलांना शाळेत एकत्र गोळा करण्यापर्यंत शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
मुंबईला लागून असलेल्या वसई तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांत मोदी गुरुजींचे भाषण ऐकण्यासाठी सकाळपासूनच शाळेत आणण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे काही तास अन्नपाण्याचाही घोट घेता आला नाही.
पंतप्रधानांचे भाषण ऐकायचेच, असे फर्मान केंद्र सरकारकडून सोडण्यात आल्यानंतर याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. तेव्हा अशी काही सक्ती नाही, अशी सारवासारव मनुष्यबळ खात्याने केली होती. मात्र तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणांकडून शाळांपर्यंत आदेश पोहोचले होते.
हेच आदेश मिळालेल्या वसई, नालासोपा-यातील सुमारे १२३ शाळांतील शिक्षकांची एकच धावपळ उडाली. मुख्याध्यापकांनी अगदी सकाळपासूनच विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्यास सांगितले. त्यामुळे भाषण कधी सुरू होईल, याची तासन्तास वाट पाहणा-या विद्यार्थ्यांच्या हालाला पारावार उरला नाही.
वसई तालुक्यातील अनेक शाळांत टीव्ही संच उपलब्ध नसल्याने शिक्षकांची धावपळ उडाली. शाळेशेजारील झोपडी-चाळीतील घरांत दाटीवाटीने बसून का होईना, पंतप्रधानांचे भाषण ऐकावे लागल्याने विद्यार्थी बेहाल झाले. अनेक मुलांना नेमका कार्यक्रम काय, याचीही कल्पना नव्हती. शाळेत गेलो नाहीतर शिक्षा होईल, या भीतीपोटी विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच शाळेची वाट धरल्याचे चित्र ठिकठिकाणी होते.
ज्या पद्धतीने भाषणाची सक्ती केली त्याचप्रमाणे आम्हाला सुविधा पुरवाव्यात. आमच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी नाराजी नालासोपारा परिसरातील विद्यार्थी व्यक्त करत होते. एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना त्याकडे सरकार लक्ष पुरवत नसल्याचा संतापही या वेळी उमटत होता.
परवड ठीक आहे . पण मोदींचे भाषण कसे झाले याची बातमी दिली असती तर बरे झाले असते. आपण असे काही न छापता फक्त विरोधी बातम्या छापत असतात त्यामुळे वर्तमान पत्राचा खप वाढत नाही . आणि लोक आपुलकीने वाचत नाहीत. पेपर हा निपक्षपाती असावा.