पावसाळापूर्व शहराच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे.
मुंबई- पावसाळापूर्व शहराच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. रस्त्यांवर मलमपट्टीसाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून मे महिन्यापूर्वी खड्डे बुजवण्यात येणार आहेत.
दरवर्षी पावसाळयात खड्डयांत हरवणा-या रस्त्यांमुळे सत्ताधा-यांच्या नावाने मुंबईकर भरपावसात शिमगा करतात. यंदा खड्डे बुजवण्याची काळजी आधीच घेत परिमंडळ निहाय कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे.
मात्र खड्डयांच्या नावाने करण्यात येणा-या या मलमपट्टीसाठी पालिकेची तिजोरी लुटणा-या कंत्राटदारांनी चक्क १२ ते ५९ टक्के कमीची बोली लावून काम मिळवण्याचा प्रयत्न चालवला आहे.
पश्चिम आणि पूर्व उपनगरातील प्रत्येकी दोन परिमंडळांत कंत्राटदारांनी ५० ते ५९ टक्के कमीची बोली लावून काम मिळवल्याने उपनगरातील खड्डयांच्या कामांवर विशेष लक्ष पुरवण्यात आले आहे.
महापालिकेतर्फे नियुक्त कंत्राटदारांची मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी नवीन कंत्राटदारांची निवड करण्याकरता निविदा मागवण्यात आल्या होत्या.
यात उपनगर परिमंडळांसाठी प्रत्येकी सात कोटी रुपये तर शहरातील दोन परिमंडळासाठी सात कोटी अशा अंदाजित रकमेसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. यात खराब रस्त्यांवरील भाग दुरुस्त करणे, खड्डे बुजवणे, सेवा सुविधांच्या वाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले चर बुजवणे, पेव्हर ब्लॉक बसवणे, रस्त्यांचे दुभाजकांची दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे.
मात्र, कंत्राटदारांनी यासाठी अंदाजित रकमेपेक्षा निम्म्या रकमेची बोली लावून कामे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. तब्बल २५.३२ कोटींचे कंत्राट दिल्याचे अतिरिक्त आयुक्त श्रीनिवास यांनी सांगितले.
रस्त्यांवरील खड्डे कसे बुजवणार याची खात्री पटत असून खड्डे बुजवलेल्या रस्त्याचा हमी कालावधी असल्यामुळे पावसाळयात तेथे खड्डा पडल्यास संबंधित कंत्राटदाराला एकही पैसा परत न घेता त्याची डागडुजी करावी लागणार आहे. त्यामुळे इतक्या कमी किमतीत कंत्राटदार कशाप्रकारे काम करू शकतात, असा सवाल अधिकारी करत आहेत.
रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी निवड केलेले कंत्राटदार आणि त्यांनी लावलेल्या बोली
परिमंडळ १ : २.९३ कोटी रु. कंत्राटदार-जेकेडी एंटरप्रायझेस (१३ टक्के कमी)
परिमंडळ २ : ४.०० कोटी रु. कंत्राटदार-न्यू इंडिया कन्स्ट्रक्शन (१५ टक्के कमी)
परिमंडळ ३ : ३.६२ कोटी रु. कंत्राटदार-कोनार्क स्ट्रक्चरल इंजि. (५१ टक्के कमी)
परिमंडळ ४ : ३.७५ कोटी रु. कंत्राटदार-व्हिएनसी इन्फ्रा प्रोजेक्ट (५० टक्के कमी)
परिमंडळ ५ : २.४६ कोटी रु. कंत्राटदार-राजेंद्र जी शहा (४८.९९ टक्के कमी)
परिमंडळ ६ : १.९९ कोटी रु. कंत्राटदार-एम.ई इन्फ्रा प्रोजेक्ट(५९.५० कोटी कमी)
परिमंडळ ७ : ६.५७ कोटी रु. कंत्राटदार इंद्रा कन्स्ट्रक्शन (१२ टक्के कमी)
दिलेल्या छायाचित्राचे जरा निरीक्षण करून पहा, त्या रस्त्यावर आजूबाजूस पाणी जाण्यास कोणताही मार्ग म्हणजे गटार किंवा त्या रस्त्यावरील पाणी जाण्यास कुठे नाला आहे का? ते पहा. जरी गटार असतील तरी ती गटारे पूर्ण पणे बंद असतील. पालिका पुन्हा त्या खड्डे पडलेल्या रस्त्यावर खडी डांबर आणून टाकतील, तात्पुरत्या स्वरुपात ते रस्ते चकाचक दिसतील, पण पावसाची वाट न बघता पालिकेनेच पाण्याचे ट्यान्कर आणून त्या रस्त्यावर पाणी सांडून बघा ती चकाचक रस्ते पुन्हा खड्ड्याने भरलेली दिसतील, याचे मूळ कारण पालिकेनेच शोधा म्हणजे पालिकेस जनतेचा पैसा कोणत्या कामासाठी लागतो? ते कळेल.