हिट अँड रन प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
मुंबई- हिट अँड रन प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘मी दारु प्यायलो नव्हतो, अपघाताच्या वेळी माझा ड्रायव्हर अशोक सिंह गाडी चालवत होता’, असे सलमान खान याने सुनावणीदरम्यान न्यायालयात सांगितल्याचे सरकारी वकीलांनी सांगितले.
२८ सप्टेंबर २००२ मधील हिट अँड रन प्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी अभिनेता सलमान खान शुक्रवारी दुपारी अलविरा व अर्पिता या दोन्ही बहिणींसह मुंबई सत्र न्यायालयात हजर होता. यावेळी आपल्यावर दाखल केलेला खटला चुकीचा असून आपल्याला या प्रकरणात गुंतवले जात असल्याचे मत त्याने मांडले.
त्यावेळी झालेल्या अपघातात डाव्या बाजूचा दरवाजा उघडत नसल्याने मी चालकाच्या बाजूने बाहेर पडलो, असे सलमान याने यावेळी साक्ष देताना सांगितले. तर सलमानचा अंगरक्षक रविंद्र पाटील याने मात्र तो गाडी चालवत होता, असे म्हटले होते. तो चालकाच्या मागच्या सीटवर बसला होता.
तसेच गाडीची चावी आपण सलमानकडे दिल्याचे पार्कींग अटेंडन्ट याने सांगितले आहे. यावर सलमानने आपल्याला काही आठवत नसल्याचे सांगितले.
अपघात झाला त्याआधी तो बारमध्ये गेला होता हे मान्य करतो, पण तेथे तो फक्त पाणी प्यायला, असे सांगतो. तर बारमधील खाणे आणि पिण्याचे बील मात्र आपले नसल्याचे त्याने सांगितले. तसेच डोळे लाल का होते, असे विचारले असता त्याने आपण अपघात झाल्यामुळे रात्रभर जागे होतो, असे उत्तर दिले.
लोकांच्या भीतीने आपण अपघात स्थळावरुन पळून गेल्याचे तो सांगतो. मी गाडी चालकाला पोलिसांना कळवण्यासाठी सांगितले. तसेच मी सुमारे १५ मिनिटे घटनास्थळी होतो. मात्र संतप्त लोकांचा जमाव वाढू लागल्याने आपल्या एका सहका-याने आपल्याला तेथून निघून जाण्यास सांगितले, असे त्याने सांगितले.
साक्षीदारांनी दिलेल्या माहितीबाबत त्याला विचारले असता त्याने प्रत्येक वेळी ते खोटे असल्याचे सांगितले. तसेच फूटपाथवर झोपलेली माणसे गाडीखाली चिरडल्याचे आपल्याला अंगरक्षकाने नंतर सांगितल्याचे त्याने सांगितले.
त्याआधी, सलमान खानने न्यायालयात दाखल झाल्यानंतर आधी सर्व प्रसारमाध्यमाच्या लोकांना बाहेर काढावे अशी न्यायाधिशांना विनंती केली. मात्र, सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी सलमानची विनंती फेटाळून लावली. प्रसारमाध्यमांनी फक्त बातम्या द्यावा पण त्यावर आपले स्वत:चे मत व्यक्त करू नये, त्यामुळे निकालाआधीच आरोपी म्हणून आपली प्रतिमा मलिन होते, असे सलमानने न्यायालयाला सांगितले. परंतू, प्रसारमाध्यमे आपली काहीही मते मांडू शकणार नाहीत. त्यामुळे याबाबत काही काळजी करण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने सलमानला सुनावले.
२००२ मध्ये सलमानने टोयोटा लँड क्रुजर गाडी भरधाव चालवत फूटपाथवरील पाच जणांना चिरडले होते. त्यामध्ये चौघे जण जबर जखमी झाले होते तर एकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी चालू आहे.
या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला १० वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तो आणखी एका हलगर्जीपणामुळे हत्या केल्याच्या प्रकरणात अडकला आहे. त्यात त्याला जास्तीत जास्त दोन वर्षाची शिक्षा होऊ शकते.
१९९८ मध्ये राजस्थानात ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता सलमान खान, सैफ अली खान आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे, नीलम आणि तब्बू यांनी काळवीटची शिकार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी १९९८ आणि २००७ मध्ये सलमानला जोधपूर तुरुंगात जावे लागले होते. या प्रकरणात सलमानला चार वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली असून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
भारत देशातील कायदे त्यांनी पाळायचे जे कायद्याला भितात.कायदे त्यांनी तोडायचे जे कायद्याला भीत नाहीत. म्हणून पोलिस अधिकारी, सरकारी अधिकारी, राजकारणी, कलाकार आदी मंडळी गुन्हेगार म्हणून आपल्यासमोर येत आहेत.