नरेंद्र मोदींसाठी एकवटलेल्या ‘बेपारी’ प्रवृत्ती विरोधात अग्रलेखातून झालेल्या जोरदार टीकेनंतर दुस-याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी पड खात मराठी-गुजराती भातृभावाची टेप लावली आहे.
मुंबई – मोदी आणि भाजपची शेपूट धरून चालणा-या शिवसेनेच्या ‘सामना’ मुखपत्रातून महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर नरेंद्र मोदींसाठी एकवटलेल्या ‘बेपारी’ प्रवृत्ती विरोधात अग्रलेखातून झालेल्या जोरदार टीकेनंतर दुस-याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी पड खात मराठी-गुजराती भातृभावाची टेप लावली आहे.
आपल्याच पक्षाच्या मुखपत्रातील भूमिकेच्या विरोधात आपण बोलत आहोत याचे भानही गुज्जुप्रेमाचे भरते आलेल्या उद्धव ठाकरे यांना राहिलेले नाही. खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही ‘बेपारी’ प्रवृत्तीच्या विरोधात नेहमी ठाम भूमिका मांडलेली असताना त्यांचा हवाला देत चुकीचा संदर्भ पक्षप्रमुखांच्या नावे काढलेल्या पत्रकात देण्यात आला आहे.
संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्यानंतरही मुंबईने सर्वभाषिकांना आधार दिला. विशेषत: गुजराती लोकांनी मुंबईत व्यापार-उद्योग वाढविले. मात्र मुंबईत, महाराष्ट्रात राहात असताना त्यांना या भूमीबद्दल कधी प्रेम वाटले नसल्याबद्दल ‘सामना’च्या अग्रलेखातून ‘बेपारी’ अशा शेलक्या शब्दात गुजराती समाजावर टीका केली होती.
इतकेच नव्हे तर नरेंद्र मोदींसाठी एकवटलेल्या या ‘बेपारी’ वृत्तीचाही चांगलाच समाचार घेतला होता. ‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र असल्याने त्यातून येणारे प्रत्येक विधान हे शिवसेनेची अधिकृत भूमिका समजली जाते. यामुळे अनेक वेळा वादग्रस्त विषय मांडल्यानंतरही शिवसेनाप्रमुखांनी आपली जबाबदारी कधी झटकली नव्हती. मात्र त्यांच्या निधनानंतर दीड वर्षाच्या आतच ‘सामना’तील भूमिका वेगळी आणि पक्षप्रमुखांची भूमिका वेगळी असे चित्र समोर आले आहे.
गुजराती समाजाविषयी ‘सामना’तून मांडलेल्या भूमिकेच्या विरोधात काढलेल्या पत्रकात, गुजराती-मराठी संबंधांत बिब्बा घालण्याचा प्रयत्न काही रिकामटेकडी मंडळी करीत असल्याचे विधान करीत उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’लाच दुत्कारले आहे. इतकेच नव्हे तर सदैव मराठीचा पुकारा करणा-या शिवसेना पक्षप्रमुखांनी थेट गुजराती-मराठी एकजुटीची ग्वाही दिली आहे.
ही एकजूट फूटणार नाही, तुटणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. गुजरातबरोबर झालेल्या संघर्षानंतरच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी ‘बेपारी’ प्रवृत्तीविरोधात भूमिका मांडली होती. मात्र, ‘मुंबईतील मराठी आणि गुजराती बांधव पूर्ण ताकदीने एकत्र आले तर देशात चमत्कार घडू शकेल’, असा त्यांच्या नावाने चुकीचा संदर्भ या पत्रकात देण्यात आला आहे.
अर्थात हे वाक्य शिवसेनाप्रमुख कधी म्हणाले याचा संदर्भ मात्र पत्रकात कुठेही नाही. एकंदरच गुजरातच्या मुद्दय़ावरून शिवसेना आणि शिवसेनेचे मुखपत्र असणा-या ‘सामना’मध्ये थेट परस्परविरोधी भूमिका पुढे आल्याने चर्चेला ऊत आला आहे. उद्धव ठाकरे यांचे हे गुज्जूप्रेम की शेळपटपणा अशी चर्चा संभ्रमित शिवसैनिकांत सुरू आहे.
Prahar valyanche pot dukhayala lagle.