अहमदनगर जिल्ह्यात पावलापावलावर मोक्याच्या ठिकाणी मटका-जुगार या अवैध धंद्यांना पेव फुटले आहे.
श्रीगोंदा- अहमदनगर जिल्ह्याला सौरभ त्रिपाठी यांच्या रूपाने नव्या दमाचे तरुण जिल्हा पोलीस अधीक्षक मिळाल्यानंतर अवैध धंद्यांना लगाम बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; मात्र ती तूर्तास तरी फोल ठरली आहे. जिल्ह्यात पावलापावलावर मोक्याच्या ठिकाणी मटका-जुगार या अवैध धंद्यांना पेव फुटले आहे.
या अवैध धंद्यांना चांगलीच बरकत आली आहे. कुणाचाही अंकुश नाही, कसलेही नियंत्रण नाही. त्यामुळे अवैध धंदेवाईकांचा वारू चौखूर उधळला आहे. अवैध मार्गाने मिळवलेल्या पैशांतून बॅनरबाजी, झटपट प्रसिद्धी, राजकीय पदांची झूल या जोरावर अवैध धंदेवाईकच शिरजोर होऊ लागले आहेत. अशा धंदेवाईकांना जरब बसेल आणि सर्वसामान्यांना विश्वास वाटेल, अशा मोठय़ा कारवाया जिल्ह्यात कुठेही दिसत नाहीत. अवैध दारू वाहतूक, मटका, जुगारासह अंमली पदार्थाचीही वाहतूक जिल्ह्यातून सुरू असावी, असा संशय आहे. अवैध दारूधंद्यांबाबत जिल्हा पोलिस व राज्य उत्पादन शुल्क संयुक्त कारवाई करेल, असे सांगितले जात होते; परंतु तशी कारवाई झालेलीच नाही. याउलट अवैध व्यावसायिकांनी तपासणी नाक्यांवर समन्वय साधलेला दिसतो. कुठल्या नाक्यावर न पकडली जाणारी दारू थेट श्रीगोंदा तालुक्यातील पोहोचते कशी? हे अद्याप न उलगडलेले कोडे आहे. जिल्ह्याच्या कानाकोप-यात होणारा अवैध दारूचा प्रवास लपलेला नाही. शहर वस्तीलगतही गोवा बनावटीची दारू लेबल बदलून काही बारमधून विकली जात आहे.
जुगार खेळणा-या काही टोळक्यांनी महिन्यात तीस दिवसांसाठी तीस वेगवेगळी स्थळे निवडली आहेत. बंद घरे, डोंगराचा आडोसा, काहीसा निर्जन परिसर अशा जागा निवडून प्रत्येक वेळी जागा बदलत जुगार खेळला जात आहे. प्रत्येक वेळी जागा बदलल्याने परिसरात त्याची फारशी चर्चा होत नाही आणि धंदाही सुरू राहतो, असे तंत्र अवलंबले जाते. पोलिस ठाण्यात जाण्यासाठी सर्वसामान्यांना छपन्न वेळा विचार करावा लागतो; परंतु अवैध धंदेवाईक उजळ माथ्याने पोलिस ठाण्यात जाताना दिसतात. लोकांच्याही ते अंगवळणी पडू लागले आहे. त्यामुळे तक्रार करण्यासाठी कुणी पुढे धजावत नाही. १० वर्षात कधी नव्हे एवढा मटका व्यवसाय सध्या तेजीत आहे. जिथे बघावे तिथे मटक्याच्या टप-या सुरू आहेत. सकाळीच आकडा कळवणारी यंत्रणा आहे.
आता पूर्वीसारख्या प्रत्यक्ष जाऊन चिठ्ठय़ा दिल्या नाही तरी चालतात. मोबाईलवर आकडा घेण्याची पद्धत सोयीची आणि सुरक्षित मानली जाते. त्यातूनही मोठा व्यवसाय होतो. मटक्यात नशीब आजमावणारे महाभाग त्यामुळे वाढले आहेत. हे सगळे अवैध धंदे शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात सुखनवे सुरू असताना एरव्ही जागृक पालक, शिक्षण संस्थांना परिस्थितीचा अंदाज घेऊन मूग गिळून गप्प बसावे लागते. नवे जिल्हा पोलीसप्रमुख सौरभ त्रिपाठी या धंदेवाईकांवर जरब बसवतील, अशी अपेक्षा होती; परंतु आतापर्यंत त्यांना यश यात आलेले नाही.
सर्वांचा वाटा वेळेवर मिळतो