आज या लेखाच्या निमित्तानं अतिशय छान योगायोग जुळून आला आहे, तो म्हणजे मकर संक्रांत आणि आजचा आहारमंत्र! या दिवसापासून सूर्यनारायणाचं मकर राशीत संक्रमण म्हणजेच प्रवेश होतो, म्हणूनच आजचा दिवस मकर संक्रांत म्हणून साजरा करतात. हा सण एकट्यादुकट्यानं साजरा करायचा नसून तो एकमेकांना गोडधोड (आनंद) वाटून, परस्परांमध्ये गोडवा आणण्याचा संदेश देणारा असा उत्सव आहे. अशा या गोडवा आणणा-या सणाच्या निमित्तानं शरीरात उष्णता निर्माण करणा-या पदार्थाविषयी थोडक्यात.
मकर संक्रांत म्हणजेच ‘तीळ आणि गूळ’ हे वर्षानुवर्षापासूनचं समीकरण आहे. परंतु यामागे नैसर्गिक कारणही आहे. निसर्गातील बदलत्या ऋतुचक्रानुसार जशी विविध फळं आणि वनस्पतीही उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे हंगामी विकारही होण्याची संभावना असते. म्हणूनच निसर्ग ठरावीक ऋतूमधील ठरावीक आजारानुसार औषधी वनस्पती, फळं निर्माण करतो. हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे शरीरातील स्नायू व सांधे आखडतात. रक्ताभिसरण क्रियाही मंदावते.
रक्तवाहिन्यांवरही थंडीचा परिणाम होत असल्यामुळे शरीराला रूक्षता (कोरडेपणा) येते. अशा वेळी शरीराला स्निग्धतेची गरज असते. तिळामध्ये स्निग्धतेचा गुण आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीनं तीळ आदर्श खाद्याची गरज पूर्ण करतात. हिवाळी हंगामात शेतातून ताजे तीळ बाजारपेठांमध्ये व तिथून थेट घरात येतात. त्यामुळे शुष्क बनणाऱ्या शरीरासाठी तिळाहून अधिक गुणकारी औषध कोणतं असू शकतं!
आयुर्वेदशास्त्रात तिळाचं महत्त्व आणि मोल अपरंपार आहे. तीळ हे तेलबिया या वर्गातील असून त्याचं मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान ताजे तीळ मिळतात. या तिळांमध्ये जास्तीत जास्त गुणवत्ता असते. तिळापासून काढलं जाणारं तेल हे उष्ण गुणात्मक, कार्यकारी शक्ती वाढवणारं असल्याने त्याचे शरीरावर दिसून येणारे परिणामही उष्ण असून हिवाळ्यात ते आपल्या शरीराला सात्म्य होतात. ते भाजी, आमटी, पोळीची कणीक भिजवतानाही वापरले जायला हवेत. तसंच तिळाची चटणी ही दीपन-पाचन (भूक व अन्नपचन या दोन्ही शरीरक्रिया उत्तम प्रकारे सांभाळणारी) असून ती जिभेलाही रुची आणणारी आहे. तिळाच्या तेलाचा वापर अभ्यंगासाठी म्हणजेच शरीराचं मालीश करण्यासाठी करतात. त्याचप्रमाणे तिळाच्या तेलानं केसांच्या मुळांना मालीश केल्यास केस जोमानं वाढतात व त्यांची मुळंही घट्ट होतात. रोजच्या आहारात दोन चमचे तिळाचं तेल वापरल्यास चेहे-याच्या कांतीचं तेज दीर्घकाळ टिकतं. कोलेस्टेरॉलचं प्रमाणही कमी होतं.
तीळ व तिळाच्या तेलातही हृदय संरक्षक रसायनद्रव्य (ओमेगा थ्री फॅटी अॅसिड्स) असतं. त्याचप्रमाणे भरपूर प्रमाणात कॅल्शिअम आहे. म्हणूनच दररोज प्रत्येकानं भाजलेले तीळ जमेल त्या स्वरूपात खावेत. काळे तीळ हे पांढ-या तिळांपेक्षा जास्त उष्ण असतात. पण त्यात लोहाचं प्रमाणही अत्युच्च आहे. ते केवळ थंडीतच व विशेषत: थंड प्रदेशात राहणा-यांनी खाल्ल्यास उत्तम परिणाम साधला जातो.
तीळ म्हटल्यावर त्यासोबत गूळही आलाच. नंतर भाजलेले शेंगदाणे, सुकं खोबरं, खसखस, जायफळ, वेलदोड्याची पूड हे सर्व जिन्नस तिळाच्या लाडूंमध्ये समाविष्ट असतात. गूळ हासुद्धा उष्ण गुणात्मक असतो. म्हणूनच हिवाळ्यात याचा सढळ हातानं उपयोग करावा. गुळामध्येही भरपूर प्रमाणात लोहतत्त्व, साखर, कॅल्शियम आहे.
शेंगदाण्यांना तर ‘गरिबांचे काजू’ असं म्हटलं जातं. काजू, बदामाइतकी पोषणमूल्य शेंगदाण्यातही आहेत. मूठभर भाजलेले शेंगदाणे गुळासोबत खाणं, हे एक उत्तम नैसर्गिक टॉनिक आहे. शेंगदाण्यांमध्ये उत्तम दर्जाची प्रथिनं, बुद्धिवर्धक तत्त्वं, कबरेदकं आणि अनेक प्रकारची जीवनसत्त्वं आहेत. शेंगदाण्यापासून काढण्यात येणा-या रिफाइंड (ब-याच प्रक्रियांद्वारे अतिशुद्ध करण्यात आलेलं) तेलापेक्षा फिल्टर्ड (गाळलेलं) तेल वापरावं (परंतु तेही प्रमाणातच). कारण रिफाइंड करण्याच्या प्रक्रियेमुळे त्यातील पोषणमूल्यं निघून जातात. तुलनेनं फिल्टर्ड तेलामध्ये ती टिकून राहतात.
उष्णता निर्माण करणा-या पदार्थाच्या वर्गातील खसखस हा प्रकार सर्वात महाग मिळतो. गोड पदार्थ वा चमचमीत पदार्थामध्ये खसखस भाजून वापरतात. खसखसमधील नैसर्गिक तेलात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि हृदय संरक्षक रसायन आहे.
जून ओला नारळ आतून पूर्णपणे सुकेपर्यंत तसाच ठेवून दिल्यास सुक्या खोब-याच्या वाट्या तयार होतात. मुबलक प्रमाणात स्निग्धता व मेदजन्य घटक यात आहेत. म्हणून स्वयंपाकात याचा वापर जरा बेतानंच करावा. विविध भाज्या, मांसाहार यामध्ये याचा वापर होत असला, तरीही यासोबत वापरल्या जाणा-या कांद्याचं प्रमाण जास्त व सुकं खोब-यांचं प्रमाण कमी ठेवावं.
thans very nice and useful information