महाराष्ट्र विधान परिषदेवर काँग्रेसच्या कोट्यातील एका जागेसाठी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नावाची घोषणा केली.
नवी दिल्ली- महाराष्ट्र विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या काँग्रेसच्या कोट्यातील एका जागेसाठी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी शनिवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नावाची येथे घोषणा केली. काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यालयातून सायंकाळी ४ वाजता श्री. नारायण राणे यांना फोनवरून हे वृत्त कळवण्यात आले.
महाराष्ट्र विधान मंडळात फडणवीस सरकारच्या विरोधात अनेक घोटाळ्यांचे आरोप होत आहेत. नारायण राणे यांना विधान परिषदेत पाठवून काँग्रेसने विधान परिषदेत आणि त्या निमित्ताने विधान मंडळात काँग्रेसचा बुलंद आवाज गरजत राहण्याचा निर्णय केला.
श्री. नारायण राणे यांच्यामुळे फडणवीस सरकारला राज्य करणे अवघड होईल, असा पक्षश्रेष्ठींचा या उमेदवारीमागचा उद्देश आहे. देशपातळीवर राज्य सभेच्या उमेदवारांची नियुक्ती याच उद्देशाने करण्यात आलेली आहे. श्री. नारायण राणे विधान परिषदेत आल्यानंतर या सरकारला संविधानिक आघाडीवर ते कमालीचे अडचणीत आणतील. हा मुख्य उद्देश त्यांच्या उमेदवारीमागे आहे.
महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेसचे ४१ आमदार असून, विधान परिषदेवर निवडून द्यायच्या जागेसाठी पहिल्या पसंतीची २६ मतांची गरज होती. काँग्रेसकडे १५ जादा मते असून, दुसरा उमेदवार न लढवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असून, नारायण राणे यांचा विजय आता १०० टक्के निश्चितच आहे.
नारायण राणे यांच्या उमेदवारीमुळे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाला एक जबरदस्त संजीवनी मिळणार असून, गेल्या १८ महिन्यांच्या संघर्षातून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी योग्य उमेदवार दिल्यामुळे महाराष्ट्रात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. श्री. नारायण राणे सोमवार दिनांक ३० मे रोजी आपला उमेदवारी अर्ज सादर करणार असून, अर्ज भरण्याची अखेरची मुदत ३१ मे आहे.
२०१४ च्या निवडणुकीत श्री. नारायण राणे महाराष्ट्र काँग्रेस निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्याच अध्यक्षतेखाली महाराष्ट्रात त्यांनी जवळपास प्रत्येक जिल्ह्यात दौरा केला. याशिवाय महाराष्ट्रातील भीषण दुष्काळात लातूर जिल्ह्याचा दौरा करून त्यांनी सरकारच्या निष्क्रियतेचा जोरदार पंचनामा केला होता. नारायण राणे यांचे पक्षासाठी असलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ही उमेदवारी दिली आहे.
काँग्रेस एकच जागा लढवणार
महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेसचे ४१ आमदार असले तरी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विधान सभेवर निवडून द्यायच्या उमेदवारासाठी एकच जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या पसंतीची २६ मते मिळवणारा उमेदवार विजयी होईल. काँग्रेसकडे १५ जास्त मते आहेत. ती राष्ट्रवादीच्या दुस-या उमेदवाराला दिली जाणार आहेत. राष्ट्रवादी दोन जागा लढवणार आहे. त्या बदल्यात विधान परिषदेचे उपसभापतीपद काँग्रेसला देण्याचा निर्णय झालेला आहे.
माननीय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यामुळे विधीमंडळातील रचनात्मक भूमिकांची उणीव भरून निघेल आणि या निर्णयासाठी, महाराष्ट्र, काँग्रेसचे व सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे कायम ऋणी राहतील.