प्रहारला कुणीही मॅनेज करू शकणार नाही, अशा शब्दांत प्रहारचे सल्लागार संपादक आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भूमिका मांडली.
ठाणे- वृत्तपत्र व्यवसायाचे पावित्र्य राखून जनतेच्या प्रश्नावर प्रहार लढत राहील. व्यवसायासाठी प्रहारला संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. आवश्यक विकासाला प्राधान्य आणि अन्यायावर प्रहार हीच प्रहारची भूमिका आहे. प्रहारला कुणीही मॅनेज करू शकणार नाही, अशा शब्दांत प्रहारचे सल्लागार संपादक आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी खुल्या मनाने भूमिका मांडली.
ठाणे-रायगड आवृत्तीचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे रविवारी थाटात संपन्न झाला. यावेळी ‘नमन नटवरा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.ने (शेडय़ुल्ड बँक) प्रायोजित केले होते. या वेळी श्री. नारायण राणे हे अध्यक्षपदी होते. सार्वजनिक जीवनातील मैत्री जपून राजकीय जीवनातील मैत्री जपत असताना जनतेच्या प्रश्नांबाबत प्रहार कधीही आणि कुणालाही मॅनेज करू शकणार नाही, याची स्पष्ट ग्वाही देऊन प्रहारची वाटचाल नारायण राणे यांनी स्पष्ट केली.
यावेळी सार्वजनिक क्षेत्रातील विविध मान्यवर आणि ठाण्यासाठी उत्तुंग कार्य करणा-या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भारतीय जनता पार्टीचे ठाण्यातील आमदार संजय केळकर, वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार नितेश राणे, सौ. निलमताई नारायण राणे, आमदार निरंजन डावखरे, ठाणे महापालिका विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, माजी आमदार श्याम सावंत, बाळकृष्ण पूर्णेकर, नारायण पवार, प्रहारचे मुख्य वितरक बाजीराव दांगट उपस्थित होते.
यावेळी बोलताना नारायण राणे पुढे म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक यांची पत्रकारिता आता उरलेली नाही. पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे. एखाद्या माणसाने ठरविले तर आज आपली बातमी वाट्टेल तिथे लावू शकतो. वर लावलेली बातमी खाली घेऊ शकतो. मी ज्यावेळी वृत्तपत्र काढले त्याचवेळी ठरविले की प्रहारची वाटचाल ही लोकहितासाठी असेल. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी धडाडीने प्रयत्न करील. कधीही कुणाला मॅनेज होणार नाही. कारण मी वृत्तपत्र काढतानाच निर्धार केला आहे. मला का वृत्तपत्र काढावे लागले? राजकीय जीवनात वावरत असताना माझ्यावर मोठय़ा प्रमाणात आरोप होऊ लागले. चौफेर टीका होऊ लागली. माझ्याविरोधात बातमी आली की खुलासाही पाठवायचो. पण बातमी मोठी पहिल्या पानावर आणि खुलासा मात्र आत कुठे तरी आतल्या पानावर असायचा. तेव्हा माझ्या परिचयातले एक ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांना मी फोन केला आणि विचारले, ‘‘साहेब माझ्यावर रोज आरोप होतात, काय करू? मला मार्गदर्शन करा!’’ तेव्हा ते म्हणाले. तुम्ही कोकणातले ना? कोकणात आंब्याची झाडे आहेत ना? मग लोक आंबे आलेल्या झाडाला दगड मारतात की ज्या झाडाला आंबे नाहीत त्यांना दगड मारतात? तुमच्या कर्तृत्वाच्या झाडाला आता आंबे आलेले आहेत. म्हणून लोक टीका करीत आहेत.
त्यांनी काही मला वृत्तपत्र सुरू करायला सांगितले नाही. मात्र त्याच वेळी निश्चय केला की, आता आपल्यालाच वृत्तपत्र काढावे लागेल आणि मग मी वृत्तपत्र काढण्याचा निर्णय घेतला. तसे वृत्तपत्र काढणे सोपी गोष्ट नाही. तुम्ही मराठी वृत्तपत्रांची यादी पाहा. त्यात किती वृत्तपत्रांचे मालक हे मराठी आहेत, याचा विचार करा. तरीही मराठी वृत्तपत्र काढण्याचा निर्णय घेतला. आणि माझ्या संपादकांना सांगितले, तुम्हाला पूर्ण स्वातंत्र असेल. आपले वृत्तपत्र असे असेल की ते कधीही मॅनेज होणार नाही. म्हणजे मोठी जाहिरात दिली की मोठी बातमी आणि छोटी जाहिरात दिली की छोटी बातमी असे माझ्या वृत्तपत्रात होणार नाही. पत्रकारितेचे पावित्र्य राखून तुम्हाला जे करता येईल ते सर्व करा. लोकांच्या हितासाठी, लोकांचे प्रबोधन करण्यासाठी, लोकांना न्याय मिळण्यासाठी आपली पत्रकारिता असली पाहिजे. मी राजकारणात वागत असताना सडेतोड वागलो, सत्तेत असो अगर विरोधी पक्षात असो, कधी कुणालाच मॅनेज झालो नाही. तसेच माझे वृत्तपत्र असले पाहिजे. लोकमान्य टिळक, बाळशास्त्री जांभेकर यांना अभिप्रेत असलेली पत्रकारिता माझ्या वृत्तपत्रातून होईल, असा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला.
सार्वजनिक जीवनात आम्ही वेगवेगळय़ा पक्षात असलो तरी मी अनेकांशी मैत्री जपली आहे. शिवसेना सोडली तर सर्वच पक्षात माझे मित्र आहेत. राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपण्याची आपल्या राज्याची परंपरा आहे. याचा एक किस्सा मला आठवतो, असे सांगून नारायण राणे म्हणाले की, मी आमदार आणि बेस्टचा चेअरमन होतो. रमेश प्रभू त्यावेळी मुंबईचे महापौर होते. मी त्यांच्या बंगल्यावर गेलो होतो. ते म्हणाले, काही गिर्यारोहक हिमालय परिक्रमेला जात आहेत. आपण त्यांना निरोप द्यायला जाऊ. त्यांच्यासोबत छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहोचलो. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार होते. गिर्यारोहकांना निरोप दिला आणि आम्ही परत फिरलो तेव्हा पवार यांनी रमेश प्रभू यांच्या खांद्यावर हात ठेवला. म्हणाले, ‘मुलगा आता कसा आहे.’ प्रभू यांच्या मुलाला त्यावेळी अपघात झालेला होता. त्याची संपूर्ण चौकशी केली. काही मदत पाहिजे का, याची विचारणा केली. राजकारणापलीकडे जाऊन अशी मैत्री जपणारे शरद पवार यांच्यासारखे नेते आपल्या महाराष्ट्रात आहेत. तीच परंपरा चालवीत
सुनील तटकरे, संजय केळकर, हितेंद्र ठाकूर, निरंजन डावखरे येथे आले आहेत, असे राणे यांनी यावेळी सांगितले.
दहा मान्यवरांचा सत्कार
समाजामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला. ज्यात बाबूराव सरनाईक, संजय सावळाराम पाटील, डॉ. दाऊद दळवी, जयकुमार पाठारे, पद्मश्री कल्पना सरोज (यांचा सत्कार त्यांच्या बहिणीने स्वीकारला), विनायक बेटावदकर, श्रीकांत नेर्लेकर, नीलेश गायकवाड आणि प्रशांत सपकाळ यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. आमदार संजय केळकर यावेळी बोलताना म्हणाले की, नारायण राणे हे वादळी व्यक्तिमत्त्व आहेत. ते जिथे जातात तिथे आपल्या नावाचा ठसा उमटवितात. त्यांचे वृत्तपत्रही त्यांच्याप्रमाणेच बेधडकपणे समाजातील प्रश्न मांडत आहे. या वृत्तपत्रातून रंजल्या-गांजलेल्यांना नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर म्हणाले की, नारायण राणे आणि आमचे जुने घरोब्याचे संबंध आहेत. मैत्री कशी जपावी, हे नारायण राणे यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. प्रहार परिवारास त्यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रहारचे संपादक मधुकर भावे म्हणाले की, प्रहार कायम विरोधी पक्षाची भूमिका मांडून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करील. महाव्यवस्थापक मनीष राणे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. विशेषत: हा कार्यक्रम प्रायोजित करणारे सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. (शेडय़ुल्ड बँक)चे अध्यक्ष साखळकर आणि उपाध्यक्ष गौतम एकनाथ ठाकूर यांचे खास आभार मानले.
दिसते तसे नसते.हि म्हण कोकणी माणसाने तयार केलेली आहे. कोकणातील मराठी माणसाने ठरवले तर तो काहीही करू शकतो.म्हणूनच दिल्ली कोकणातील मराठी माणसाला घाबरते.