चित्रपट पाहताना त्यात श्रवणेंद्रियंही सहभागी होतात. त्यामुळे चित्रपटाचा अनुभव हा अधिक व्यापक धरता येईल. या दोन्ही कलांची संगती लावण्याचा प्रयत्न करणारा चित्रपट म्हणजे ‘अकल्पित’.
सिनेमा म्हणजे प्रसंगांची मांडणी, एखाद्या चित्रकाराने काढलेले चित्रच जणू. कथाकार-पटकथाकार पेन्सिलने एक रेखाचित्र तयार करतात, दिग्दर्शक त्यातल्या रंगांची संगती ठरवतो. त्यात रंग भरतो. चित्रपटातला अभिनय हा चित्रातल्या रंगांसारखा असतो. ते जितके योग्य प्रकारे खुलून येतील तितकी त्या चित्राची परिणामकता अधिक. त्यामुळे एखादं चित्र पाहताना आपल्याला जो आनंद मिळतो त्याच प्रकारचा आनंद चित्रपट पाहतानाही मिळू शकतो. चित्र पाहताना केवळ आपल्या डोळयांना व मेंदूत उठणा-या संवेदनांना महत्त्व असतं. तर चित्रपट पाहताना त्यात श्रवणेंद्रियंही सहभागी होतात. त्यामुळे चित्रपटाचा अनुभव हा अधिक व्यापक धरता येईल. या दोन्ही कलांची संगती लावण्याचा प्रयत्न करणारा चित्रपट म्हणजे ‘अकल्पित’. ही संगती केवळ मांडणीतच नाही तर ती कथेतही आहे. कशी ते काही सांगता येणार नाही. कारण चित्रपटाचा बाज हा रहस्यमय चित्रपटाचा आहे. ते सांगताना आपल्याकडून रहस्यभंग होता कामा नये.
कथा आहे नवरा-बायकोची, त्यांच्या जीवनात आलेल्या विविध प्रसंगांची, त्यातून निर्माण झालेल्या गुंत्याची, निखिल व रिया हे जोडपं, एकदा फिरायला म्हणून एके ठिकाणी जातात. त्यानंतर त्यांच्या जीवनात येणारे विविध प्रसंग इथे आपल्यासमोर येतात. ते कसे हे प्रत्यक्ष पडद्यावरच पाहणं अधिक संयुक्तिक ठरेल.
दिग्दर्शक प्रसाद आचरेकर याने या चित्रपटाची मांडणी अगदी नावीन्यपूर्ण पद्धतीने केलीय. एखादा चित्रकार ज्याप्रमाणे आपल्या ब्रशचे फटकारे (स्ट्रोक) मारतो त्याप्रकारे त्याने एक एक प्रसंग प्रेक्षकांच्या समोर आणलाय. एकीकडे निव्वळ प्रसंग पाहत असल्याचा भास निर्माण करत कथानक उलगडत नेण्याचं त्याचं कसब वादातीत. कधी कधी दोन वेगवेगळय़ा काळातले प्रसंग, कधी दुसरीकडचाच प्रसंग अशा पद्धतीने त्याने ही रचना केली आहे. चित्र पाहताना जसा कधी काही अंतरावरून संपूर्ण चित्राचा आस्वाद घेतला जातो तर कधी जवळ जाऊन रंग व रेषांचा बारकाईने आस्वाद घेतला जातो. अशाच प्रकारची ही मांडणी व सादरीकरण आहे. हे प्रसंगांचे ‘फटकारे’ पाहताना अनेक प्रश्न पडतात व हळूहळू ते उलगडत जातात, अगदी एखादं अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग पाहताना जसं होतं अगदी तसंच. चित्रपटाचा विषय व त्याच्या मांडणीतलं हे नावीन्य नक्कीच स्वागतार्ह आहे. दिग्दर्शकाविषयी अपेक्षा वाढवणारं आहे. त्याला त्याच्या तांत्रिक संघाने पूर्ण सहकार्य केलंय. केवळ पार्श्वसंगीतकार वगळता. अमित कोडोथ व निशाक माथुरे यांचं छायाचित्रण अप्रतिम. प्रत्येक प्रसंग फुलवण्याचं, त्यासाठी कलादिग्दर्शकाने दिलेल्या खोलीचा उपयोग करून घेण्याचं त्याचं कसबही वादातीत म्हणायला हवं. त्यातही त्याने अंतर्गत प्रसंगांमध्ये जी प्रकाशयोजना केलीय तीही दाद देण्याजोगी. प्रसंगांचं गांभीर्य, त्याचा मूड जपत असतानाच कथानकातलं रहस्य जपण्याचा प्रयत्न खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. या चित्रपटात यांनी नाइट व्हिजन कॅमे-याचा उपयोग करून जे प्रसंग फुलवतेल ते मराठी चित्रपटात पहिल्यांदाच पाहायला मिळाले. त्यातही संकलकानेही आपलं काम चोख केलंय. सुरुवातीला रंगरेषांचा व एखाद्या चित्राचा आभास पडद्यावर निर्माण करून नंतर प्रसंग दाखवण्याची त्याची हातोटी चांगली असली तरी एका प्रसंगातून दुस-या प्रसंगात जातानाच जे अडखळलेपण जाणवतं तेवढाच काय तो रसभंग, या सा-या चांगल्या कामावर पार्श्वसंगीत देणा-याने पाणी फेरलंय. रहस्यमय चित्रपटांच्या पार्श्वसंगीताचा एक टोन सांभाळावा लागतो. जर यापेक्षा वेगळा प्रयत्न करायचा असेल तर त्याची तशी कारणमीमांसा करावी लागते. हे पार्श्वसंगीत अगदी अंगावर येतं. कधी कधी तर ते अगदीच असयुक्तिक वाटतं. पार्श्वसंगीतातून प्रसंगातलं गांभीर्य व रहस्यमय चित्रपटातलं गूढत्व अधोरेखित व्हायला हवं होतं तेही इथे होताना दिसत नाही.
अभिनयाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर एका बाजूला अभिनयाचे डोंगर तर एका बाजूला अगदीच हौसेचा मामला आहे. या दोन वेगवेगळय़ा पातळय़ांवरच्या अभिनेत्यांची भेळ काही केल्या जमून येत नाही. मोहन आगाशे, निर्मिती सावंत व रेणुका शहाणे एका बाजूला तर दुस-या बाजूला अगदीच नवे चेहरे, बरं त्यातल्या काहींना किमान अभिनयाची आवड असावी किंवा त्यांना तो करण्याची आंतरिक इच्छा तरी असावी, तर तेही दिसून येत नाही. त्यातही मिलिंदची भूमिका करणारा अभिनय सावंत व राज झालेला सुमेध गायकवाड व विशालची भूमिका करणारा आशुतोष पत्की यांना वगळलं तर इतरांनी आपल्या भूमिका काही मनापासून केल्या नाहीत. अभिनयाची शैली असावी, केवळ शैलीलाच (स्टाईल) अभिनय म्हणू नये इतक तारतम्यही त्यांनी बाळगलं नाही. या चित्रपटाच्या कथा-पटकथेबराबरच त्याचे संवादही अगदी परिणामकारक आहेत, कथेशी सुससंगत आहेत. मात्र काही पात्र त्यातही वकिलाची भूमिका करणारा सचिन शिंदे याने तर आपल्या अशुद्ध बोलण्याने अगदी वात आणलाय. ‘साधा’, ‘बास्स’,‘पाणी’, यासारख्या साध्या शब्दांचे उच्चारही इतके सदोष आहेत की ते ऐकताना कंटाळा येतो. बरं, ही भूमिका कमी महत्त्वाची असली तरी एकवेळ निभावलं गेलं असतं. तर तीही महत्त्वाची, आपल्याला इतकी महत्त्वाची भूमिका मिळालेली असेल तर ती निभावण्याचं तारतम्यही त्यांन पाळलेलं नाही. मिलिंदची मध्यवर्ती भूमिका करणा-या अभिनय सावंत याने मात्र आपल्या भूमिकेचा पोत सांभाळून एक चांगली लक्षवेधी भूमिका केलीय. त्याच सुरुवातीचं वागणं त्यात आत्मविश्वास नसल्यासारखं दिसत असलं तरी जसजसा चित्रपट पुढे जातो तसतसं त्याचं त्यामागील कारण लक्षात येत जातं. बारीकसारीक तपशीलांतून त्याने जी भूमिका रंगवली आहे ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. त्याच्या बायकोची भूमिका करणा-या रुतुल पाटील हिने आपल्याभोवती कथानक फिरत असल्याचा बाज काही सांभाळला नाही. तिच्या डोळयांच्या अभिनयातून ते व्यक्त व्हायला हवं होतं. ते काही झालं नाही. ते जर झालं असतं तर तिची भूमिका वाखाणण्याजोगी झाली असती. या दोन-तीन भूमिकांनी या चित्रपटाची परिणामकता काहीशी कमी केलीय. ‘राज’ची भूमिका करणा-या सुमेध गायकवाड याने आश्वासक अभिनय केलाय. आपल्या भूमिकेचा पोत व त्याच कथानकातलं स्थान याचा उपयोग करून त्यानं आपली भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे.
एक चांगला प्रयत्न करणा-या एका आश्वासक दिग्दर्शकाला कराव्या लागलेल्या तडजोडीचं वाईट वाटत असतानाच, एक चांगला चित्रपट पाहिल्याचं समाधानही हा चित्रपट देतो हेच कदाचित या चित्रपटाचं यश आहे. अनेक प्रतिकूल बाबी असूनही ही कथा तिच्या विविध वैशिष्टय़ांसह मनाला भिडते, याबद्दल दिग्दर्शक प्रसाद आचरेकर याचं कौतुक करावं तितकं थोडं आहे.
मी माझा मित्र प्रसाद आचरेकर चे अभिनंदन करतो.
एका चित्रकाराने इतका छान चित्रपट बनवला .याचे केोतुक वाटते .