आंब्याचा हंगाम जवळ आला की, बालपणाच्या आठवणी ताज्या होतात. दुस-याच्या आंब्यांवर दगड मारून चोरून कै-या आणि आंबे खाण्याची मजा काही औरच होती. दगडाचा नेम चुकल्यावर एखाद्याच्या घराचं कौल फुटल्यावर होणारी धावपळ गमतीशीरच. आज त्या गमतीजमती दुरावल्या असल्या, तरीही बालपणातल्या ‘त्या’ आठवणी वेगळीच अनुभूती देऊन जातात
‘बालपण’ हा नुसता शब्द उच्चारला, तरी मन ‘फ्लॅशबॅक’मध्ये जाऊन उडय़ा मारायला लागतं. मग काही क्षणांतच स्वत:ला सावरून भानावर यावं लागतं. कारण, आता आपण लहान नाही, पुन्हा लहान होणं शक्य नाही, तसं वागायचं थोडंफार ठरवलं तरी लोकं हसतील नाही का? असं स्वत:शीच बोलायचं आणि ‘बालपण पुन्हा नाही’ ही खंत उराशी बाळगून जुन्या आठवणींमध्ये रमून ती खंत दूर करण्याचा प्रयत्न करायचा..
लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा..
ऐरावत रत्न थोर
त्यासी अंकुशाचा मार
जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण
तुका म्हणे बर्वे जन
व्हावे लहानहुनी लहान..
संत तुकारामांच्या या ओळी आठवल्या की बालपणात हरवून जावंसं वाटतं. पुन्हा एकदा लहान व्हावंसं वाटतं. लहानपणात केलेल्या खोडय़ा आणि गमतीशीर किस्से आठवले की, अशी इच्छा मनात जागृत होते. पण लहानपणी खोडय़ा केल्यावर घरच्यांकडून अन् शाळेत गुरुजींकडून ‘प्रसाद’ भेटायचा, तेव्हा वाटायचं या क्षणाला मोठे झालो तर? कुणी ओरडणार नाही, कुठेही जा, कधीही जा, कसंही वागा, कुणाचं बोलणं खावं लागणार नाही. पण लहानपणी आलेला तो ‘बालिश विचार’ चुकीचा होता, असं ‘शहाणपण’ मोठं झाल्यावर येतं.
गेले काही दिवस ‘व्हाट्सअॅप’, ‘फेसबुक’ यांसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर लहानपणाच्या आठवणी ताज्या करणारी काही छायाचित्रे ‘पोस्ट’ होताना दिसत आहेत. एका सुमसाम गल्लीत एकाकी पडलेलं विटी-दांडू, काचेच्या लहान गोटय़ा, लगोर अशी बालपण नजरेसमोर खेळायला लावणा-या छायाचित्रांसह लेमनच्या गोळय़ांची त्या काळातील चवही या गोळय़ांच्या छायाचित्रांमधून जिभेवर ताजी-ताजी आणि हवीहवीशी वाटू लागली. ‘चार आण्याला पाच कुणी-कुणी खाल्ल्या होत्या या गोळ्या?’ हा लेमनच्या गोळ्यांच्या छायाचित्राखालील प्रश्न पुन्हा चार आण्याला पाच गोळ्या खाण्याचा मोह देऊन गेल्या. या आठवणींमध्ये हरवताना प्रश्न पडला, ‘पुन्हा लहान होता आलं तर?’
अ
संच बालपण ताजं करणारं एक छायाचित्रं काही दिवसांपूर्वी ‘फेसबुक’वर नजरेत आलं. पिकलेल्या आंब्याचं मनसोक्तपणे आस्वाद घेणारं ‘ते’ गोंडस बाळ पाहिलं आणि सगळय़ा जुन्या आठवणींनी मनात घर केलं. परीक्षांचा नको असलेला हंगाम संपता- संपता महिनोन् महिने ज्याची प्रतीक्षा असते, तो आंब्याचा हंगाम अगदी हवाहवासा, वाटणारा. शाळा आणि अभ्यासाला सुट्टी, गुरुजींच्या छडीला सुट्टी आणि घरच्यांकडून अभ्यासासाठी होणा-या ओरडय़ापासूनही सुट्टी! मग मनसोक्त आंब्याचा हंगाम उपभोगायचा, खेळायचं आणि निव्वळ बागडायचं, हा एकच उद्योग ठरलेला.
परीक्षा जवळ आल्या की, झाडावर बारीक-बारीक कै-या लागायला सुरुवात व्हायची. मग आम्ही एकत्र अभ्यास करण्याच्या नावाखाली जमायचो. अभ्यासाबरोबरच ‘एकमेका सहाय्य करू..’ म्हणत मोहल्ल्यातील आंब्याच्या झाडांवरील कै-या धोपटायचा आमचा उद्योग ठरलेला. अभ्यासासाठी घरातून बाहेर पडताना कैरीची मजा लुटण्यासाठी घरातून कुणी मीठ आणायचं, कुणी तिखट आणायचं, कुणी पाणी आणायचं, कुणी सुरी आणायची, सारं काही ठरायचं. अर्थातच घरातल्यांची नजर चुकवून हे सारं काही उपलब्ध (थोडक्यात चोरीच ती) करणे, म्हणजे त्यावेळी गणिताचे ‘प्रमेय’ पाठ करण्यापेक्षाही मोठी कसरत वाटायची. मग एक-एक करून सगळे ठरलेल्या जागी जमा झाले, की अभ्यास सुरू करण्यापूर्वी मोहल्ल्यातल्या कुणाच्या तरी आंब्याच्या झाडाची ‘शिकार’ व्हायची. पुरेशा कै-या जमा झाल्या की, अभ्यास करता-करता त्यांचा फडशा पाडला जाई. कधी-कधी कै-या पाडताना मारलेल्या दगडाचा नेम चुकून एखाद्या घराच्या कौलांवर जायचा. मग, त्या घरातून एखादी व्यक्ती घरावर बॉम्बच पडल्यासारखं केकाटत दांडका घेऊन मागं लागायची. ती मागे, अन् आम्ही पुढे, असं पळत-पळत मोहल्ल्याभर आमच्या कैरी चोरीच्या प्रकाराची बोंब व्हायची.
मग, मे महिन्यात पिकलेल्या कलमी आंब्यांना झोडपायचा उद्योग व्हायचा. भर उन्हात आंबे पाडताना घामाघूम व्हायला व्हायचं. त्यातच दगडाने आंबे पाडताना हाताला लागलेली माती.. तशाच अवस्थेत मग आंबा खायचा.. आंबा खाताना त्याचा रस तळहातावरून हाताच्या कोप-यांपर्यंत वाहत जायचा.. मोठय़ा कष्टाने घाम गाळून पाडलेल्या आंब्याच्या रसाचा एक थेंबही सांडून द्यायची इच्छा नसायची.. मग कोपरापर्यंत वाहत आलेला रस हात वाकडातिकडा करून जिभेने चाखायचा.. मोहल्ल्यातल्या झाडांवरचं मन भरलं की, मग मोर्चा जवळच्या जंगलात वळवायचो. दुपारी घरचे झोपले की हळूच काढता पाय घेऊन सगळे रान गाठायचो. संध्याकाळपर्यंत करवंद, काजू, आंब्याचे ढीग पोतीत भरून सूर्य मावळायच्या आत घरात. पिकलेले कलमी आंबे घरात खायला मिळायचे. पण गावभर हिंडून दगडाने नेम धरून दुस-याच्या झाडावरून पाडलेला आंबा खाण्याची जी चव यायची ती घरात आयतं मिळणा-या आंब्यात नसायची.
वर्षावर र्वष सरत गेलं.. शाळा, शाळेतून हायस्कूल, हायस्कूलमधून कॉलेज अन् कॉलेज संपल्यावर नोकरी.. या सा-या टप्प्यांमध्ये ‘ते’ बालपणही आपण मागे सोडून जात आहोत, याची जाणीव तेव्हा नव्या उमेदीच्या काळात कदाचित झाली नसावी. आता ते सारे क्षण आठवले की, बालपण पुन्हा हवंहवंसं वाटतं. आता आंबा खरेदी करून खायला पैसे असतात, पण कधीतरी वाटेत एखादं आंब्याचं झाड पाहिलं अन् त्याच्यावर लगडणा-या कै-या पाहिल्या की, आजही दगड हातात घेऊन बालपणातला ‘नेम’ आजमावण्याचा ‘मोह’ होतो. मात्र भीतीही वाटते की, नेम चुकून दगड भलतीकडे गेला, तर ‘लहान’ आहे, असं समजून कुणी माफ करणार नाही. उलट ‘एवढा मोठा घोडा झालाय, याचं टाळकं फिरलंय काय?’ असं बोलून एखादी व्यक्ती तोच दगड आपल्या टाळक्यात घालायची भीती. बालपणाच्या आठवणींनी मनात निर्माण होणा-या मोहांना आवर घालताना नेहमीच प्रश्न पडतो की, खरंच हरवलं का ते सारं काही? पण परवाच एका सोशल नेटवर्किंग साइटवर एक सुंदर वाक्य वाचायला मिळालं ‘हरवलेलं काही नाही, फक्त आपलं बालपण तुम्ही आपल्या मुला-मुलीत पाहा. सर्व तुम्हाला जवळच सापडेल. फक्त काळाचा फरक आहे.’ तरीही राहून-राहून पुन्हा असंच वाटतं.. काळाचा हा फरक आयुष्यातून पुन्हा वजा झाला तर? आणि हळूच मनात तुकाराम महाराजांच्या ओळी येतात.. ‘लहानपण देगा देवा..’
Mala hi may mahina alyawar gawachi aathawan ayte aani man tya kalat ramun gate