बाजारपेठेतील रहिवासी, व्यावसायिक आजूबाजूला कुठेही कचरा टाकत असतात. पण या कच-यातून फुलांच्या बागा फुलल्या तर.. ही किमया केली आहे गोरेगाव ग्रामपंचायतीने.
अलिबाग- बाजारपेठेतील रहिवासी, व्यावसायिक आजूबाजूला कुठेही कचरा टाकत असतात. पण या कच-यातून फुलांच्या बागा फुलल्या तर.. ही किमया केली आहे गोरेगाव ग्रामपंचायतीने. या बागांमुळे रस्त्यात तसेच इतरत्र साचणा-या कच-याचा प्रश्नही सुटला आहे. सोबतच स्थानिकांकडून कचरा टाकण्यालाही आळा बसला आहे.
गोरेगाव ही रायगड जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. तसेच महत्त्वाची बाजारपेठही, या ग्रामपंचायतीमध्ये एक अनोखा प्रयोग केला जात आहे. गावात ठिकठिकाणी टाकला जाणारा कचरा हटवून आता त्या ठिकाणी कोपराबागा तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपोआपच त्या ठिकाणी कचरा टाकणे बंद झाले. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी ग्रामपंचायतीला निधी खर्च करावा लागलेला नाही.
गोरेगाव हे तब्बल १० हजार लोकसंख्येचे गाव. वाढत्या नागरिकरणामुळे या भागात अस्वच्छतेचा प्रश्न वाढला. त्यामुळे ठिकठिकाणी कच-याचे ढीग जमा झाले. हा कचरा सर्वासाठीच डोकेदुखी ठरत होता. यावर ग्रामपंचायतीने नामी शक्कल लढवली आहे. कचरा टाकण्याच्या जागा साफ करून तेथे छोटय़ा बागा तयार केल्या आहेत. त्यामुळे आपोआपच त्या ठिकाणी कचरा पडणे बंद झाले.
गावातील कोपरे हे कचरा टाकण्याचे हक्काचे ठिकाण मात्र, आता कोपराबागांमुळे तेथे नागरिकांकडून कचरा टाकला जात नाही. त्याने गावातील दुर्गंधी व कुत्र्यांचा, डासांचा, उंदरांचा त्रास कमी झाला आहे. अशा ११ कोपराबागा गावात तयार करण्यात आल्या आहेत. गावच्या स्मशानभूमी परिसराला डम्पिंग ग्राऊंडचे स्वरूप आले होते. तेथील कचरा हटवून तो परिसर स्वच्छ करण्यात आला.
अशा तयार झाल्या बागा
बागा तयार करण्यासाठी जुने टायर, डबे, मडकी यांचा वापर करण्यात आला . नागरिकांनी स्वखर्चाने छोटय़ा कचराकुंडय़ा आणून सोसायटीत ठेवल्या. यासाठी ग्रामपंचायतीला खर्च करावा लागलेला नाही. या अभियानामुळे गावाला आलेले बकाल स्वरूप दूर झाले आहे. यात ग्रामपंचायतीच्या कर्मचा-यांचे योगदानही महत्त्वपूर्ण ठरले आहे. एकही दिवस सुट्टी न घेता ते काम करतात.
गोरेगाव ग्रामपंचायतीने कोपराबाग संकल्पनेतून गावाची स्वच्छता तर राखलीच; पण गावच्या सौंदर्यातही यामुळे भर पडली आहे. नागरिकांच्या सहकार्यातून गोरेगाव ग्रामपंचायतीने राबविलेल्या या उपक्रमातून अन्य ग्रामपंचायतींनी बोध घेतल्यास स्वच्छ अभियानास नक्कीच हातभार लागेल.
कच-यापासून बायोडिझेल प्रकल्प
भविष्यात कच-यापासून बायोडिझेल प्रकल्प उभारण्याचा ग्रामपंचायतीचा मानस असल्याचे गोरेगावच्या सरपंच अमृता हरवंडकर यांनी सांगितले.
गोरेगाव ग्रामपंचायतीने कोपराबाग संकल्पनेतून गावाची स्वच्छता तर राखली.. अत्यंत्य समाधान कारक उपक्रम आहे. अन्य ग्रामपंचायतींनी बोध घेतल्यास स्वच्छ अभियानास नक्कीच हातभार लागेल.