प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा पाऊस यावर्षी अगदी सुरुवातीलाच मनसोक्त बरसला आणि या पावसाला साजेशा कविताही कविमनातून उत्स्फूर्तपणे प्रगटल्या. महाराष्ट्राला सुखावणा-या या पावसावर दै. ‘प्रहार’ने ‘बालकवी’ पुरस्कारासाठी कवींना ‘पाऊस’ या विषयावर कविता पाठवण्याची एक अनोखी संधी दिली आहे. पावसावरील अशाच काही निवडक कविता आम्ही आपणा वाचकांसाठी क्रमश: प्रसिद्ध करत आहोत. प्रसिद्ध झालेल्या कवितांमधील सर्वोत्कृष्ट तीन कवितांची निवड करून त्या कवितांना दै. ‘प्रहार’तर्फे तीन पुरस्कार देण्यात येतील. प्रख्यात कवी ह. शि. खरात यांच्या हस्ते आणि ‘प्रहार’चे संपादकीय सल्लागार नारायणराव राणे यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.
पाऊस एक ऋतू असतो हिरवी स्वप्न फुलवणारा
पाऊस एक सेतू असतो कवी मनं जुळवणारा
पहिलावहिला पाऊस म्हणजे माऊलीचा पान्हा
अंगणात नाचणारा यशोदेचा कान्हा
पाऊस असतो नव्या को-या पुस्तकांचा वास
कवितेतच निथळणारा मराठीचा तास
कागदांच्या होडया आणि पागोळ्यांच्या धारा
बालमनात वेचलेल्या प्रश्नांच्या गारा
यौवनाच्या आषाढातलं तुफान म्हणजे पाऊस
उसळणा-या प्राणामधलं उधाण म्हणजे पाऊस
पाऊस म्हणजे टपरीवरची गरमागरम कटिंग
तिच्यासाठी बसस्टॉपवरची चिंब चिंब वेटिंग
इथं मात्र प्रत्येक पाऊस घायाळ कवी असतो
कॉलेज जवळ येता-जाता रिमझिम करीत बसतो
एस.एम.एस.चा आषाढ मग हळूहळू ओसरतो
सप्तरंगी श्रावण आता संसारातून पिसारतो.
पाऊस आता जबाबदार मध्यमवर्गी बापासारखा
वादळ वारा सहन करीत उभ्या दीपस्तंभासारखा
आयुष्याचे इंद्रधनू क्षितिजाकडे झुकत जाते
कॅलेंडरच्या पानागणिक भिजले अंग सुकत जाते
डोक्यावरचे ढग आता पांढरे करडे होऊ लागतात
चष्म्यामधले डोळे पाऊस खिडकीमधून पाहू लागतात
एखाद् दुसरी सर येते तरी अंगण भिजत नाही
पेरले किती, पिकले किती हिशेब काही जुळत नाही
काही म्हणा पाऊस हल्ली पूर्वीसारखा राहिला नाही
नक्षत्रांची नावं तीच पण? ओलावाच उरला नाही
कागदांच्या होडया कधीच इतिहासजमा झाल्या
मोबाईलच्या डब्या मात्र प्रत्येक मुठीत आल्या
आषाढ असो श्रावण असो पाऊस सदा तिरसटलेला
घोटाळ्यांचे आकडे ऐकून आमच्यासारखाच गारठलेला
शेतक-यांचे डोळे म्हणे, विहिरीपेक्षा खोल गेले
आसवांच्या पिकातसुद्धा सरकारने झोल केले
पाऊस आता सवय म्हणून जमेल तसा पडत राहतो
टीव्ही बघून, पेपर वाचून आतल्या आत रडत राहतो
म्हणून म्हणतो पावसासाठी काहीतरी केलं पाहिजे
एक तरी कविता घेऊन स्वागताला गेलं पाहिजे
प्रवीण सावंत – देसाई, रत्नागिरी
पाऊस येतो भूवर
रिम झिम रिम झिम
सर सर सर सर
पाऊस येतो भूवर
परिसर होतो गार,
झाडांना फुटते पालवी
पारावर फुलांना जोजवी
आकाश अंधारते छान
कोकीळ छेडितो तान
तालात वाहतो निर्झर
पाऊस येतो भूवर
रिम झिम रिम झिम
सर सर सर सर..
देहाचा थांबतो दाह
सुरू होतो थंड प्रवाह
सभोवताली नाचते हिरवळ
नाचत येतो अवखळ ओहळ
पाऊस ओततो निर्जिवात प्राण
हात जोडूनी मानू त्याचे आभार
पाऊस येतो भूवर
रिम झिम रिम झिम
सर सर सर सर..
सूर्यकांत आंगणे, ताडदेव
स्वारी वरुणराजाची
आकाशी वा-यासंगे लागली शर्यत ढगांची।
आली आली स्वारी वरुणराजाची।। धृ।।
झाडे डोलती मनमोकळ्या त्या हवेत।
पक्षी लपले झाडांच्या त्या कवेत।
झरे निघाले काढत काढत वाट।
हिरवा शालू घेऊन नटला डोंगर घाट।
घाई झाली थुई थुई नाचण्या मोराची।
आली आली स्वारी वरुणराजाची।। १।।
एका मागोमाग एक धावती सरी।
मनमोकळ्या होऊन नाचती माळरानावरी।
शांत झाले बोलणारे ये गं ये गं सरी।
भरून वाहू लागल्या सर्वाच्या घागरी।
तुडुंब भरून वाहू लागली पात्रं नद्यांची।
आली आली स्वारी वरुणराजाची।। २।।
शेतक-याला घाई झाली शेतावर जाण्याची।
नांगरासंगे घेऊन निघाला जोडी बैलांची।
कंबरेला मोटली ती कांदा चटणी भाकरीची।
भर पावसात मिळे उब त्या घोंगडीची।
वर थेंब झेलण्या चोच उघडी त्या चातकाची।
आली आली स्वारी वरुणराजाची।। ३।।
प्रशांत बाणे, रत्नागिरी
पाऊस सरी
काल तुझ्या दारी
आलेल्या पाऊस सरी
आज बरसत आहेत
माझ्याही दारी
फडफडत्या पंखांनी
चिमणं पाखरू
आलं आहे घरी
दोघीही पाहात बसलो
पाऊस सरी
गप्पा आमच्या
रंगतील भारी
तिची चिव चिव
माझी बडबड
गम्मत येईल न्यारी
काल तुझ्या दारी
आलेल्या पाऊस सरी
आज बरसत आहेत
माझ्या दारी
– पूर्णिमा नार्वेकर, दहिसर
पावसाच दान
————————————
आटले नदी अन नाले
कोरडे ठक्क झाले डोळे
तळपून तळपून उन्हामध्ये
जळून गेलंय रक्त
सुकलेल्या गळ्यामध्ये
मोजकेज श्वास फक्त
उजडून गेलं रान
पसरलं पाचूळयाच वान
पसरून हात मागतो
निसर्गा पावसाच दान .
————————————
-चाफेश्वर गांगवे
रिसोड जि .वाशीम
संवाद -९०९६६७५००१