एका मित्राचा परवा फोन आला. तो सर्वार्थाने मित्र आहे; पण भाजपावाला. त्याचे म्हणणे असे की, ‘तुम्ही भाजपावर अकारण टीका करता आहात.’ तो बराच हळवा झाला होता. देशातही अनेक लोक असेच हळवे झाले आहेत. वस्तुस्थिती समजून घेत नाहीत.
एका मित्राचा परवा फोन आला. तो सर्वार्थाने मित्र आहे; पण भाजपावाला. त्याचे म्हणणे असे की, ‘तुम्ही भाजपावर अकारण टीका करता आहात.’ तो बराच हळवा झाला होता. देशातही अनेक लोक असेच हळवे झाले आहेत. वस्तुस्थिती समजून घेत नाहीत. भाजपाने घोषणा किती केल्या, त्या घोषणांचे नेमके काय झाले, याची माहिती करून घेत नाहीत. टीका होणार आहे, अजून ती खूप संयमित आहे; पण भाजपाने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची महाराष्ट्राच्या भाजपा सरकारने अक्षरश: वाट लावून टाकलेली आहे.
संतापाने लिहिण्यासारखीच ही परिस्थिती आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्य सरकारतर्फे अशी घोषणा करण्यात आली की, भारनियमन करणे शक्य नाही. किमान पाच वर्षे तरी राज्यातले भारनियमन राहणार आहे. कारण परिस्थिती गंभीर आहे.’ परिस्थिती गंभीर आहे, याची सगळय़ांनाच कल्पना आहे; पण निवडणुकीच्या प्रचारकाळात भाजपा नाकाने कांदे सोलत होता आणि धडधडीत खोटी आश्वासने सर्व सभांतून जाहीरपणे देत होता. सभेच्या भाषणांमध्ये एकवेळ असे बोलणे क्षम्य समजता येईल.
कारण गर्दी जमली की, असे सुसाट बोलावेच लागते. टाळय़ा घ्यायच्या असतात, प्रसिद्धी मिळवायची असते. त्यामुळे दडपून सर्रास खोटे बोलले गेले. प्रत्यक्ष कारभार करताना भाजपाची फटफजिती व्हायची वेळ आलेली आहे. आता जे भारनियमनाबद्दल भाजपाने त्यांच्या जाहीरनाम्यात सांगितले होते, त्या जाहीरनाम्याच्या पुस्तिकेचे नावसुद्धा ‘समृद्ध महाराष्ट्राची हमी देणारे दृष्टीपत्र’ असेच होते. बाकी राजकीय पक्ष ज्याला जाहीरनामा म्हणतात, त्याला भाजपाने गोंडस नाव दिले. दृष्टीपत्रात आपण काहीतरी वेगळे आहोत, असे दाखवण्याची आणि भासवण्याची या भाजपाच्या चौकडीला फार मोठी आवड आहे. चौकडी म्हणजे फडणवीस, तावडे, खडसे, मुनगंटीवार.
या चैकडीने या दृष्टीपत्राचा जो काही आव आणला त्यामध्ये पान क्रमांक ९ वर ‘दोन-क’मध्ये ऊर्जा या विषयावर दृष्टीपत्राची पाच कमले आहेत – १३ ते १७. या पाच कलमांमध्ये या भाजपावाल्यांनी जे ऊर्जा धोरण जाहीर केले आहे, त्यामध्ये १७व्या कलमात भ्रष्टाचाराला प्रतिबंध करून एका वर्षात राज्य भारनियमनमुक्त करू, असे जाहीर केले आहे. कृषीपंपांना किमान १० तास वीज देऊ, असे १७व्या कलमात म्हटले आहे. आता या दोन्ही कलमांपैकी केलेल्या घोषणेपासून संपूर्णपणे माघार घेऊन भारनियमन सुरू ठेवण्याची घोषणा करण्यात आलेली आहे.
कारण भारनियमनमुक्त महाराष्ट्र करणे शक्य नाही. या संपूर्ण ‘दूरदृष्टी’मध्ये दृष्टी कुठे दिसत नाही. उलट बोगस घोषणांची यादीच्या यादी यात दिसते आहे. पान क्रमांक ११वर शेतक-यांना सुगीचे दिवस येणार, अशा मोठय़ा शीर्षकाखाली पहिल्याच कलमामध्ये शेतक-यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार, असे एक कलम आहे. फडणवीस सरकार अधिकारावर आल्यानंतर दोन महिन्यांत ४०७ शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.
या शेतक-यांसाठी जे सात हजार कोटींचे पॅकेज नागपूर अधिवेशनात जाहीर केले ते धांदात बोगस पॅकेज आहे. पगाराला पैसा नाही, बाजारात नवे कर्ज मिळत नाही. दोन महिन्यांत साडेतीन लाख कोटींच्या व्याजाचे २९ हजार कोटी रुपये भरले नाहीत. त्यामुळे सरकारची पत शिल्लक राहिली नाही. नवीन कर्ज मिळत नाही. एलबीटी रद्द होत नाही. त्यासाठी १५ हजार कोटी रुपये लागणार आहेत ते आणणार कुठून, असा अर्थमंत्र्यांनी सवाल विचारला. कापूस उत्पादक शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव देऊ, असे आणखी एक कलम त्यात आहे. वीज पंपासाठी सात दिवसांत कनेक्शन, असे दहावे कलम सांगते. शेतीसाठी वीज पंपांना पुरेसा नियमित पुरवठा असाही उल्लेख १०व्या कलमात आहे. आता या भाजपाच्या मित्राला स्पष्ट विचारणे आहे की, सात दिवसांत किती वीजपंपांना कनेक्शन दिलीत? आकडा सांगा. नियमित वीजपुरवठा किती पंपांना केला, त्याचा आकडा सांगा. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, अशी स्थिती आता निर्माण झालेली आहे.
पान क्रमांक ८ वर अर्थ व्यवस्था, उद्योग आणि रोजगार अशा मोठय़ा शीर्षकाखाली आणखी एक फसवी घोषणा करण्यात आली आहे की, ‘राज्याची घसरलेली अर्थव्यवस्था रुळांवर आणणार’ राज्याच्या डोक्यावरचा तीन लाख कोटी कर्जाचा उल्लेख त्यात आहे. आता ते कर्ज साडेतीन लाख कोटी रुपये झाले. त्याच कलमात आर्थिक शिस्त पाळू आणि काटकसर करू, असे सांगण्यात आले आहे. वानखेडे स्टेडियमवरील शपथविधी समारंभाला किती कोटी उधळले, हे मात्र सांगण्यात आलेले नाही. ही जी ‘दूरदृष्टी’ आहे, याची एकूण २९ पाने आहेत.
त्या २९ पानांतले प्रत्येक कलम त्याचे जाहीर वाचन भाजपावाल्यांनी करावे आणि त्यापैकी कोणत्या कलमातील गोष्ट अमलात आणली, त्याची यादी जाहीर करावी. खोटे बोलण्यात आणि रेटून बोलण्यात या भाजपावाल्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. राज्य चालवणे खूप सोप आहे, असे त्यांना आतापर्यंत वाटत होते आणि आता फे फे होताना दिसत आहे. विरोधी पक्षात बसून बोलणे खूप सोपे आहे. घोषणा करायला त्याहून सोपे आहे. ‘महाराष्ट्र वाचवू, महाराष्ट्र घडवू, महाराष्ट्र वाढवू’ असे अगदी रामदास स्वामींच्या थाटात अगदी दासबोध सांगत आहोत, अशा तोऱ्यात ही वाक्य लिहिलेली आहेत; पण ही नुसती शब्दांची कारंजी आहेत. उद्योग जगतात महाराष्ट्र मुसंडी मारणार, असे सांगण्यात आले आहे.
अशा प्रत्येक घोषणेमध्ये जेवढा खोटेपणा दडलेला आहे, तेवढाच रेटून बोलण्याचा उद्धटपणाही दिसतो आहे. ही मंडळी काही करू शकणार नाहीत. फडणवीस यांचे सात हजार कोटी रुपयांचे पॅकेज तर तद्दन खोटे आहे. हेच फडणवीस विरोधी पक्षात होते तेव्हा आत्महत्या झाल्यावर मुख्यमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करा, असे विधानसभेत तावातावाने बोलत होते. आता फडणवीसांच्या काळात दोन महिन्यात ४०७ आत्महत्या झाल्या. आता या फडणवीसांवर खुनाचे ४०७ गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि म्हणून या ढोंगी माणसांचा बुरखा फाडण्यासाठी कडक लिहावेच लागणार आहे. नाकाने कांदे सोलणारी ही माणसे आहेत, त्यांची पर्वा करायची कशाला आणि त्यांचे गोडवे गायचे कशाला?
बोलबचन मंत्री ! बोलत राहा ! पेपर वालो ,तुम्ही लिहीत राहा, आम्ही वाचत राहतो ,!!!