‘सत ना गत’ हा चित्रपट सर्वसामान्य माणसांवर, खासकरून स्त्रीवर झालेला अत्याचार व त्याची इतर सामाजिक कारणं शोधण्याचा करण्यात आलेला प्रयत्न आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र…
आटपाट नगरीच्या गोष्टी आपल्या फार जवळच्या असतात. या कथांमध्ये नाटय असतं, त्यात एक उत्कंठा असते, त्यात निर्माण झालेल्या प्रश्नांना त्यांच्या पातळीवर एक उत्तर शोधलेलं असतं. ते जरी अंधश्रद्धेच्या जवळ जाणारं असलं तरी त्यात माणसांच्या जीवनविषयक विचारांचं प्रतिबिंब पडत असतं. या कथांमध्ये अनेक वेळा आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला असतो. काही काही चित्रपटांची कथा ही याच आटपाट नगरीतल्या कथांप्रमाणे असते. त्यातही एक प्रश्न दाखवण्यात आलेला असतो. आजूबाजूच्या परिस्थितीचा वेध घेतला जातो, तर कधी कधी त्या कथानकाच्या चौकटीतलं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला असतो. नुकताच प्रदर्शित झालेला ‘सत ना गत’ हा चित्रपट अशाच प्रकारे सर्वसामान्य माणसांवर, खासकरून स्त्रीवर झालेला अत्याचार व त्याची इतर सामाजिक कारणं शोधण्याचा करण्यात आलेला प्रयत्न आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र या चित्रपटाच्या पटकथेतल्या काही कच्च्या दुव्यांमुळे या चित्रपटाची अवस्थाही त्याच्या शीर्षकाप्रमाणेच झालेली पाहायला मिळते.
चित्रपटाची कथा घडते, मुख्यमंत्र्यांच्या गावात. या गावात एका नदीच्या काठी एक गरीब कुटुंब राहात असतं. दाम्या, नामी (पाखी हेगडे) व त्यांची दोन मुलं असं हे कुटुंब. त्यात दामू हा व्यसनी व काहीही कामधंदा नसलेला. नामी ही एका शेठच्या घरात काम करत असते. या नदीच्या काठावर एक दिवस एक प्रेत सापडतं. त्याची चौकशी करण्यासाठी आलेल्या इन्स्पेक्टर आसोदे (महेश मांजरेकर) याची नजर या नामीवर पडते. आपण काहीही करून तिला मिळवायचीच असा तो चंग बांधतो. त्याच दरम्यान या प्रकरणाची बातमी करणारा पत्रकार उत्तम वाबळे (भरत जाधव) याला आपल्या गावात या पद्धतीनं कुणा गरिबाला त्रास होत असल्याचं वाईट वाटत असतं. तो त्या गावातल्या एका साप्ताहिकात काम करत असतो. त्याचा संपादक शिंदे (सयाजी शिंदे) हा केवळ थोरामोठयांच्या गोष्टी सांगून आपला धंदा करणारा असा असतो. त्याला पत्रकारांच्या कर्तव्याशी काहीही देणंघेणं नसतं. पुढे अशा काही घटना घडतात की इन्स्पेक्टर आसोदे हा या नामीवर अत्याचार करतो. त्याची बातमी होते. पुढे या प्रकरणाला पत्रकार वाबळे लावून धरतो व त्यातून या गावात अनेक उलथापालथी घडतात. त्या काय काय असतात ते आपल्याला पडद्यावरच पाहायला बरं वाटतं.
चित्रपटाची कथा दिग्दर्शक राजू पार्सेकर यांनी मोठय़ा ओघवत्या शैलीत मांडली आहे. चित्रपटातल्या घटना एकामागोमाग घडत आपल्याला बांधून ठेवण्यात यशस्वी झालेल्या आहेत. मात्र तरीही या घटना आपल्या मनावर फार मोठा परिणाम करत नाहीत. एका बाजूला इतकं गंभीर नाटय घडत असतानाही का कोण जाणे त्या नामीचं दु:ख पडद्यावरही ठाशीवपणे येत नाही. ती एक काल्पनिक कथा असून त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नसल्याचा एक तटस्थपणा सतत जाणवत राहतो. या चित्रपटातले गंभीर प्रसंग जितक्या गंभीरपणे यायला हवे होते तितके ते गंभीरपणे येत नाहीत. इथेच या चित्रपटाचा परिणाम कमी होतो. त्याचबरोबर या चित्रपटात सुरुवातीपासून एक डार्क शेड वापरली आहे. ती कथानकामुळे नसून काही तरी तांत्रिक चूक असल्यामुळे आहे की काय, असं जाणवत राहतं. चित्रपटातले दुपारच्या वेळचे प्रसंगही त्यामुळे अगदी सायंकाळी घडतायत की काय असं वाटतं राहतं. दिग्दर्शकानं गावाचं चित्रण जरी अगदी बिनचूक केलं असलं तरी काही ठिकाणी केलेली अतिशयोक्ती चित्रपटाच्या एकंदरीत परिणामाला मारक ठरली आहे. खासकरून अत्याचार झालेल्या नामीला पाहायला गावातले लोक तिच्या घराभोवती जमतात तो प्रसंग तर अगदी कृत्रिम झाला आहे. त्या ठिकाणी पँट-शर्टमधले तरुण पाणी भरायला आलेले दाखवलं आहेत. त्याने जरी गावातल्या लोकांची असंवेदनशीलता दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी तो हास्यास्पद झाला आहे.
चित्रपटाची खरी शक्ती आहे ती या चित्रपटातल्या कलाकारांमध्ये. अनेक दिवसांनी आलेला मराठीतला हा मल्टिस्टारर चित्रपट आहे. भरत जाधव, महेश मांजरेकर, सयाजी शिंदे, वैभव मांगले, कुलदीप पवार, उदय टिकेकर असे एकाहून एक मातब्बर कलाकार या चित्रपटात आहेत. प्रत्येकाच्या भूमिकेचा बाज वेगळा. त्यांनी त्या केल्याही आहेत जबरदस्त. महेश मांजरेकर यांनी इन्स्पेक्टर आसोदे सहजतेने व ताकदीने सादर केला आहे. त्याचं बेअरिंग, लहानसहान प्रसंगांत त्यानं दाखवलेलं गांभीर्य, एका बाजूला अधिकाराचा माज, दुस-या बाजूला त्याचं माघार घेणं. आपली विकृती दाखवणं, तिचं समर्थन करणं. या सा-याच गोष्टी त्यानं मोठया ताकदीनं उभ्या केल्या आहेत. सयाजीनं तर या भूमिकेचं अगदी सोनं केलं आहे. अनेक दिवसांनी त्याला मराठीत अशा प्रकारची भूमिका करण्याची संधी मिळाली आहे. काही ठिकाणी त्यानं इतक्या गमतीजमती केल्या आहेत की, त्याच्या या पात्राच्या कथानकाच्या अनुषंगाने येणारा रागही दूर जातो. भरत जाधवनं या सा-या भाऊगर्दीत आपल्या अंडरप्लेचा एक नमुना पेश केला आहे. आपली भूमिका कुठेही कुणावरही वरचढ न होता तिचा पूर्ण परिणाम साधावा हे त्याचं कौशल्य वादातीत. या सा-या जणांमध्ये लक्षात राहतो तो संतोष शिंदे.. नामीचा नवरा असलेला दामू त्यानं ज्या ताकदीनं उभा केलाय त्याला तोड नाही. त्याच्यावर कोणत्याच गोष्टींचा परिणाम होत नाही. जीवनाची लढाई हरलेला व तसं स्वीकारलेला दामू त्यानं अगदी योग्य पद्धतीनं साकारला आहे. हळूहळू प्रेक्षकांनाही त्याची चीड निर्माण व्हावी ही त्याच्यावरची जबाबदारी त्यानं योग्य पद्धतीनं पार पाडली आहे. हा संपूर्ण चित्रपट आपल्या खांद्यावर आहे हे ओळखून कुठेही आपल्या भूमिकेचं बेअरिंग न सोडता ती साकारण्याचं कसब पाखी हेगडेनं या चित्रपटातल्या नामीच्या भूमिकेनं सिद्ध केलं आहे. तिच्या वाटय़ाला आलेल्या प्रत्येक प्रसंगात तिनं आपल्या संयत अभिनयाचं प्रदर्शन केलं आहे. इतर सर्वच अभिनेत्यांनी आपल्या लौकिकाला साजेसं काम यात केलंय. अगदी सचिन खेडेकरच्या शेवटच्या निवेदनासह.
चित्रपट इतर तांत्रिक अंगानेही एक चांगला अनुभव देऊन जातो. कलादिग्दर्शकानं नदीच्या काठावर उभारलेली झोपडी जबरदस्त. ती तिथे उभारण्यात आलीय याचा जराही संशय प्रेक्षकांच्या मनात येऊ शकत नाही, पोलिस स्टेशन व इतर गोष्टीही चांगल्या केल्या आहेत. हा काळ सत्तरच्या दशकातला आहे. त्यामुळे त्यातलं साप्ताहिकांचं महत्त्वही आपोआप अधोरेखित झालं आहे. त्या काळातला छापखाना व छपाईही फार चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे. दिग्दर्शकानं या चित्रपटासाठी केलेली मेहनत जरी लक्षात येत असली तरी त्याच्या एकंदरीत परिणामात कुठेतरी काहीतरी कमतरता आहे असं जाणवतं राहतं. या चित्रपटातले काही हास्यास्पद प्रसंग वगळले तर हा एक चांगला सामाजिक आशयाचा चित्रपट आहे यात शंका नाही.
आपण समीक्षा उत्तम केलीत पण मूळ कादंबरी ( सत ना गत ) आणि त्याचे लेखक ( राजन खान ) यांचा उल्लेख देखील केला नाहीत याची खंत वाटते. बस्स. बाकी झकास!!