‘उरीमध्ये आमचे थोडे चुकलेच’ अशी कबुली संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली आहे. पर्रिकरांना हे सांगायला हवे की, ‘थोडे नव्हे.. बरेच काही चुकले आहे.. आणि त्या जबाबदारीतून खुद्द पर्रिकरांनाही सुटता येणार नाही’ जर चुकल्याची कबुली संरक्षणमंत्र्यांनी दिली असेल तर त्या चुकीच्या कामाची शिक्षा संरक्षणमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे.
पर्रिकर हे टेक्नोक्रॅट आहेत. संरक्षणमंत्री म्हणून त्यांना मोदींनी बोलावले तेव्हा गोवा सोडायला त्यांच्या खूप जीवावर आले होते. मुख्यमंत्रीपदावरून संरक्षणमंत्री पदावर जेव्हा पंडितजींनी यशवंतराव चव्हाणांना बोलावले, त्या चव्हाणसाहेबांचे कर्तृत्व आणि नेतृत्व कुठच्या कुठे.. आणि मुख्यमंत्रीपदावरून संरक्षणमंत्री पदावर पर्रिकरांना संधी मिळाल्यानंतर गेल्या दोन वर्षात अतिरेक्यांनी केलेली फटफजिती आणि भारताची नाचक्की कुठे! गांभीर्याने दखल घेतली नाही म्हणून एक क्षणसुद्धा पर्रिकर नावाच्या माणसाला संरक्षण मंत्रीपदावर ठेवणे देशासाठी घातक ठरेल.
यशवंतराव संरक्षणमंत्री म्हणून गेले आणि त्यांनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध जिंकून दिले. पर्रिकर संरक्षणमंत्री म्हणून गेले आणि दोन वर्षे ते पिकनिक साजरी करीत आहेत. शुक्रवार ते सोमवार ते गोव्यात असतात. त्यांचा जीव अजून गोव्यात अडकलेला आहे. दिमतीला हवाई दलाची विमाने असल्यामुळे दिल्ली-गोवा, गोवा-दिल्ली अशा पर्रिकरांच्या किती खेपा झाल्या याची माहिती, माहितीच्या अधिकारात अनिल गलगलीने काढली की, पर्रिकरांचे संरक्षण मंत्रालयात अजिबात लक्ष नव्हते, हे स्पष्ट होईल. गोव्याच्या स्थानिक राजकारणातच त्यांनी स्वत:ला गुरफटून घेतले. त्यामुळे जो संरक्षणमंत्री आमचे चुकले असे म्हणतो त्या चुकीची शिक्षा पर्रिकरांनी काय घेतली? पर्रिकर हे विनोदी असावेत. त्यांनी आणखी एक निवेदन केले आहे की, ‘उरीची पुनरावृत्ती आता होणार नाही..’ पठाणकोट विमानतळावर अतिरेक्यांनी जेव्हा हल्ला केला तेव्हा पर्रिकर हेच म्हणाले होते. त्यांचे शब्द होते.. ‘इसके बाद कभी नही..’ आता उरीचा हल्ला झाल्यावरही तीच शिळी कढी संरक्षणमंत्री उकळवीत आहेत. राहुल गांधी यांनी त्यांना सणसणीत टोला मारला होता. ‘इव्हेंट मॅनेजमेंटने युद्ध जिंकता येत नाही’, या राहुल गांधी यांच्या नेमक्या टिपण्णीवर पर्रिकर काही बोलले नाहीत आणि ते बोलूही शकणार नाहीत. १८ जवानांचे मरण ओढवले, त्याची कसलीही खंत पर्रिकरांच्या चेह-यावरही कधी जाणवली नाही. पर्रिकर संरक्षणमंत्री झाल्यापासून किती हल्ले झाले.. अतिरेक्यांनी किती जवानांचे प्राण घेतले.. त्याच्या बदल्यात कारवाई कोणती केली.. याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर या टेक्नोक्रॅटला देता येणार नाही.
खरे तर या देशातील विरोधी पक्ष जेवढा आक्रमक असायला हवा तेवढा तो नाही.
व्ही. के. कृष्णमेनन संरक्षणमंत्री असताना चीनच्या विरोधातील युद्ध आपण हरलो तेव्हा कृष्णमेनन यांना ‘कम्युनिस्ट’ ठरवून देशभर त्यांच्या विरोधात वातावरण तयार झाले आणि शेवटी कृष्णमेननला राजीनामा द्यावा लागला. युद्ध आणि अतिरेकी हल्ले यांची तुलना करायची नसली तरी पर्रिकर संरक्षणमंत्री झाल्यापासून ४० वेळा अतिरेक्यांनी वेगवेगळय़ा मार्गानी हल्ले केले आहेत. त्याची कुठलीही गंभीर दखल पर्रिकर यांनी घेतलेली नाही. एखाद्या उडाणटप्पूने दिवस ढकलावा तसे संरक्षणमंत्री दिल्र्ली-गोवा, गोवा-दिल्ली असे दोन वर्षे फिरत आहेत. गोव्यात संघवाल्यांचे बंड झाले तर देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी हवाई दलाच्या विमानाने लगेच उड्डाण केले. विषय होता संघाच्या फुटीचा. आणि विमान वापरत होते हवाई दलाचे. या संरक्षणमंत्र्यांचे लाड खूप झालेले आहेत. दोन वर्षात जवळपास ६० जवान अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले आहेत. त्याची कसलीही जबाबदारी संरक्षणमंत्री घेऊ इच्छित नाहीत. आमचे थोडेसे चुकले असे म्हणणे हे लाज-लज्जा नसल्याचे लक्षण आहे. १८ जणांचे बळी गेले आणि संरक्षणमंत्र्यांना वाटत आहे की, आपले थोडेसेच चुकले! शिवाय पर्रिकर एका प्रश्नाचे उत्तरच देत नाहीत. पाकिस्तानचे ४ अतिरेकी उरीमधील लष्करी तळाभोवतालचे तारांचे कुंपण तोडून दोन गटांत लष्करी तळावर घुसले आणि सरळ १५० मीटर चालत गेले. पर्रिकर स्वत: ही माहिती देतात. एखाद्या माहिती अधिका-याने माहिती द्यावी तशी हसत हसत ही माहिती दिली जाते आणि आपण संरक्षणमंत्री आहोत, याला आपणही जबाबदार आहोत, असे त्यांना कुठेही वाटले नाही.
देशाची माफी मागण्याचे सोडा, उलट संरक्षणमंत्री हवाला देत आहेत पंतप्रधानांचा. हवाला कसला आहे? तर पंतप्रधान म्हणाले होते की, ‘हल्ला करणा-यांना शिक्षा होईल’ आणि पर्रिकरही तेच सांगताहेत की, हल्ल्याला जबाबदार असणा-यांना शिक्षा करणार असे पंतप्रधान म्हणालेलेच आहेत. संरक्षणमंत्री बोलघेवडे आणि पंतप्रधानही बोलघेवडे.. कोणाला शिक्षा देणार आहात? ज्यांना शिक्षा द्यायची त्या चार अतिरेक्यांना लढाऊ जवानांनी यमसदनाला पाठवलेले आहे. आता तुम्हाला कॉलर पकडायची आहे ती नवाझ शरीफची.. ही हिंमत पर्रिकरांजवळ आहे का? शिक्षा नेमकी कशी करायची याचा गांभीर्याने विचार चालू आहे, अशी पांचट निवेदने करणा-या संरक्षणमंत्र्यांना ‘चालते व्हा’, असे सांगण्याची वेळ आली आहे. इतक्या बेजबाबदार पद्धतीने संरक्षणमंत्र्यांनी बुधवारी केलेले निवेदन हा १८ शहिदांचा संरक्षणमंत्र्यांनी केलेला अपमान आहे. थोडे चुकले म्हणायला जनाची किंवा मनाची थोडी तरी वाटली पाहिजे. त्या थोडय़ा चुकीने १८ कुटुंबे उद्ध्वस्त झाली, देशाचे नाक कापले, संरक्षणमंत्री म्हणून पर्रिकरांचे दोन वर्षात अस्तित्व तरी जाणवले का? याचे उत्तर पर्रिकरांनी द्यावे. नाही तर हा संरक्षणमंत्री ‘पिकनिकमंत्री’ आहे. आता हे पार्सल गोव्याला पाठवा, हे सांगण्याची वेळ आली आहे.
अहो ह्या मनोहर पर्रीकर ” गोय karaan ” गोवाच्या मांडवी समुद्रात कधी मासे marle nahit .तो aatank vadyana kaay
marnar .?