वाचनाने ज्ञान वाढतं, लोकांसमोर बिनधास्त बोलल्याने माणूस हजरजबाबी होतो, मात्र लिहिण्याने माणसाचा विचार नेटका तसंच काटेकोर होतो. बरं या लिखाणाचे कौशल्य सगळ्यांनाच अवगत असतं असं नाही. भाषेवर प्रभुत्व असलं की आपण सहज लिहीत जातो. अशा या लिखाणाचा एक भाग म्हणजे चित्रपट, मालिका. ज्यात आजचा प्रेक्षक गुंतलेला आहे. मालिका लोकप्रिय होण्यात कलाकारांहून अधिक मोलाचा वाटा हा संवाद लिहिणा-यांचा आहे. एकदा कथा लिहून पूर्ण झाल्यावर त्यातील वेगवेगळ्या दृश्यांची संवाद लेखक प्रसंगामध्ये विभागणी करतात. हे प्रसंग निश्चित झाल्यानंतर मूळ कथा तशीच ठेवून त्या प्रसंगांना संवादात्मक रूप देतात. यालाच पटकथा लेखन असं म्हटलं जातं. खरं तर या लिखाणासाठी गरज असते ती कल्पनाशक्तीची आणि उत्तम लेखन कौशल्याची. अशाच एका ताकदीच्या पटकथा लेखकाची म्हणजेच अभिजित पेंढारकर यांची ही ओळख.
मूळ कथावस्तू तशीच ठेवून त्याचे चित्रपट अथवा नाटकासाठी रुपांतर करताना केल्या जाणा-या संवादात्मक लिखाणाला पटकथा म्हटलं जातं. तर कथेच्या मुळ प्रसंगाची विभागणी करून त्या प्रत्येक प्रसंगाला संवादात्मक लिहीणं म्हणजे पटकथा लिखाण. लिखाणाची कला अवगत करण्यासाठी तुम्हाला प्रचंड वाचनाची आणि अवांतर लिखाणाची आवड असली पाहिजे. पण अभिजित पेंढारकर यांना वाचनाची रूची तशी कमी असली तरी अवांतर लिखाणाची आवड पहिल्यापासूनच होती.
शाळा आणि कॉलेजमध्ये असताना कविता आणि कथा वर्तमानपत्रासाठी आवडीने लिहून पाठवणा-या अभिजित यांच्या आईवडिलांची त्यांचा मुलगा इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हावा अशी इच्छा होती. अभ्यासात हुशार असणा-या अभिजित यांनी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सायन्समध्ये अॅडमिशन घेतली. शिक्षण घेता घेता लिखाण सुरूच ठेवलं. त्यांनी बीएससीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर वर्तमानपत्रात काम करण्याची संधी चालून आली. मुळ रत्नागिरीतल्या अभिजित यांनी रत्नागिरीतल्या स्थानिक वर्तमानपत्रात काम केलं. त्यानंतर ‘केसरी’, ‘लोकसत्ता’, ‘सकाळ’ यांसारख्या वर्तमानपत्रात काम केलं. अपघाताने पत्रकारितेत आलेल्या अभिजित यांनी जवळ जवळ सतरा वर्ष पत्रकारिता केली.
आपल्या संघर्षाच्या काळाबद्दल अभिजित सांगतात, ‘मी कधी पत्रकार होण्याचा विचार केला नव्हता. आई शिक्षिका असल्यामुळे घरातलं वातावरण तसं शिक्षणमय होतं. आईवडिलांची इच्छा होती की मी इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हावं. म्हणूनच शिक्षणासाठी पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर जाणवलं की करिअर करायचं असेल तर पुण्यात राहूनच. घरातल्यांचा तसा नकारच होता, पण माझा स्वत:वर विश्वास होता. मी पत्रकारितेत येण्याअगोदर पुण्यात अगदी किरकोळ कामं केली. वडिलांनी स्पष्ट सांगितलं होतं, तू तुझं करिअर स्वबळावर करायचं. म्हणून घरातल्यांची मदत न घेता मी पुण्यात नोकरी करायला लागलो. तिथे मला खूप कमी पगार मिळायचा. तो काळ माझ्या आयुष्यातला संघर्षाचा काळ होता. वर्षभर मी कपडे खरेदी केले नाहीत किंवा कोणती हौस केली नाही. जे काही वेतन यायचं ते भाडयात आणि माझ्या उदरनिर्वाहासाठी खर्च व्हायचं. त्यानंतर मला पत्रकारिता करण्याची संधी मिळाली. नंतर मी अनेक शिखरं गाठतच गेलो. आणखी बरंच काही करायचं आहे, ही तर फक्त सुरुवात आहे’
पत्रकारिता करण्याचा विचार केला नसला तरी अवांतर लिखाणाची उपजत आवड असल्यामुळे जे काही आपल्याला जमतं तेच करायचं असा विचार करून अभिजित यांनी या क्षेत्रात पर्दापण केलं. अजूनही त्यांचा प्रवास ख-या अर्थाने सुरू झाला नव्हता. सकाळ वृत्तपत्रात स्वतंत्रपणे ‘ग्राफिटी’ हे सदर सुरू केलं. त्यांच्या लिखाणाला ब-याच जणांनी नावाजलं. त्यांना काही उपक्रमात काम करण्याची पहिली संधी दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी दिली असली तरी, १९९५ पासून पुढली सात वर्ष पत्रकारिता करणा-या अभिजीत यांच्या करिअरला कलाटणी मिळाली ती प्रवीण तरडे यांच्यामुळे. प्रविण तरडे यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे त्यांनी पत्रकारिता सोडण्याचा विचार केला. त्यांच्या कोणत्याही निर्णयात पाठिंबा दिला त्याच्या पत्नीने म्हणजेच हर्षदा पेंढारकर यांनी.
सतरा वर्ष पत्रकारिता केल्यानंतर काही वेगळं करण्याचा हा विचार त्यांनी केला. पण, अचानक दुस-या क्षेत्रात जाण तसं जोखमीचंच होतं. कारण, त्यात प्रगती होईलच असं नाही. दुस-या क्षेत्रात जाण्याच विचार करणारे अभिजित म्हणतात, ‘मला जे आवडतं तेच करायचं असं मी ठरवलं होतं. मला संधी मिळाली आणि त्या संधीचं मी सोनं करण्याचा निश्चय केला होता. पण सुरुवातीलाच यश मिळेलच किंवा काम मिळेलच या अपेक्षेने मी गेलो नव्हतो. कारण, कोणत्याही क्षेत्रात गेल्यावर स्ट्रगल करावंच लागतं हे मला चांगलंच ठाऊक होतं. पण तरीही मी क्षेत्रं बदलण्याचा विचार केला. त्यात मला माझ्या पत्नीची ख-या अर्थाने साथ मिळाली. तिने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यामुळे माझा विचार प्रत्यक्षात आणू शकलो’.
आपल्या अर्धागिनीच्या साथीने २०१२ साली अभिजित यांनी पत्रकारितेला शेवटचा राम राम ठोकला. ‘कुंकू’ या मालिकेसाठी सहायक संवाद लेखक म्हणून लिखाण सुरू केलं. कुंकू मालिका संपल्यानंतर त्यांना सहा महिने काम मिळालं नाही. पण आपल्या घरातल्यांचं पोट भरायचं आहे म्हणून त्यांनी कसलीही लाज न बाळगता छोटया उपक्रमांसाठी लिहण्यास सुरुवात केली. हा काळ येणारच होता यासाठी मनाची तयारी आधीच केल्यामुळे त्यांनी या प्रसंगाचंही हसत स्वागत केलं. त्यानंतर त्यांना ई टीव्हीच्या ‘कालाय तस्मै नम:’, तसंच झी मराठीच्या ‘पिंजरा’ या मालिकांसाठी सहायक पटकथा लेखक म्हणून लिखाण करण्याची संधी मिळाली. या प्रवासात त्यांना ब-याच अडचणींना सामोर जावं लागलं. त्यानंतर त्यांना ‘दोन किनारे दोघी आपण’, ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, यांसारख्या मालिकांसाठी स्वतंत्र लिहिण्याची संधी मिळाली. सध्या स्टार प्रवाहच्या ‘दुर्वा’ या मालिकेसाठी ते पटकथा लेखक म्हणून लिहीत आहेत. तसंच ‘फु बाई फु’ या मालिकेसाठीसुद्धा ते पटकथा लेखक म्हणून लिहितात. तसंच त्यांनी ‘थोडं तुझं थोडं माझं’ आणि ‘दगडाबाईची चाळ’ या चित्रपटांसाठी पटकथा लेखक म्हणून स्वतंत्र लिखाण केलं आहे. त्याशिवाय त्यांनी तीन पुस्तकांच भाषांतर केलं आहे. त्यात ‘सिड्स ऑफ टेरर’, ओम पुरी यांचं आत्मचरित्र ‘द अनलाइकली हिरो’ या पुस्तकांचं मराठीत भाषांतर केलंय. तसंच सचिन पिळगावकर यांचं आत्मचारित्र सांगणारं पुस्तक ‘हाच माझा मार्ग’ याचं त्यांनी शब्दांकन केलं आहे.
आपल्या यशाच सारं श्रेय ते त्यांच्या पत्नीला देतात. त्यांना प्रोत्साहन देणा-या त्यांच्या बायकोबद्दल सांगताना अभिजीत म्हणतात, ‘मी आज जे काही कमावलं आहे ते तिच्यामुळे कारण, जेव्हा मी दुस-या क्षेत्रात जाण्याचा विचार केला तेव्हा ती एकच वाक्य म्हणाली, बिनधास्त जा, बाकी सगळं मी सांभाळते’ तिच्या या वाक्यामुळेच मी आज थोडया प्रमाणात का होईना यश संपादन करू शकलो. मला या क्षेत्रातच पुढे जायचं आहे. मी पुढेही हेच काम करेन,’. अभिजित आजकालच्या नवीन लेखकांना संदेश देताना सांगतात, ‘करण्याची जिद्द असेल तर सगळं काही जमतं, जिद्दीबरोबर गरज असते ती धीराची. कारण, नेहमीच काम मिळतं असं नाही. प्रत्येक गोष्टीला थोडावेळ द्यावा लागतो आणि हो, जेव्हा काम येतं तेव्हा जास्त विचार न करता फक्त कामाचाच विचार करावा. चिकाटी, जिद्द, प्रामाणिकपणा आणि मेहनत करायची तयारी असेल तर सारं काही शक्य आहे. म्हणून मला वाटतं की ज्यांना काम मिळत नाही त्यांनी निराश न होता आपल्यात सुधारणा करत राहिलं पाहिजे. कधी ना कधी यश हे येतंच’.
अभिजितच्या यशापाठिमागचं सारं नाही पण वाचकांना आणि जे नव्याने आपली करियर घडवू इच्छितात त्यांना एक दिशा मिळते..अर्थाय कुठलाही मार्ग निवडताना साकल्याने विचार करणे आमि घराचा विशेषतः पत्नीता मिळणारा पाठिंबा सर्वार्थाने हवा असतो…त्यांच्या वाटचालीला आत्ता कुठे सुरवात झाली आहे…यापुढे सारे आकाश मोकळे आहे..खूप काही ते देऊन मराठी मन जगभरात विखुरणार आहेत
Reply