शेगाव संस्थानचे प्रमुख आणि नि:स्वार्थीपणे श्रद्धापूर्वककाम करणारे शिवशंकरभाऊ पाटील यांचा उद्या ७५ वा वाढदिवस. त्यानिमित्ताने भाऊंनी ‘प्रहार’शी केलेली मनमोकळी बातचीत..
२५ नोव्हेंबरला दरवर्षी यवतमाळला जात असतो. बाबूजींचा (जवाहरलाल दर्डा) तो स्मृतिदिन. त्यांनी मला ‘लोकमत’चे संपादक केले. त्यांना विसरू शकत नाही. आचार्य अत्रेसाहेबांनी मला शिकवले की, आयुष्यात काहीही मिळाले नाही तरी चालेल, पण कृतज्ञ राहा. यवतमाळला जाण्याची हीच भावना असते. या वर्षी यवतमाळहून परत येताना मनात विचार आला की, शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला जावे. तिथे शिवशंकरभाऊंना भेटावे. शिवशंकरभाऊ म्हणजे माणसांमधला ‘देवमाणूस’ आहे. त्यांना भेटल्याशिवाय ते कळणार नाही.
गजानन महाराज संस्थानचा भव्यपणा, तिथली टापटीप-स्वच्छता आणि निष्ठेने काम करणा-यांची तन्मयता तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. त्या मंदिरात सेवा करण्यासाठी हजारो लोकांची प्रतीक्षायादी आहे. भाऊंची ही कमाल आहे. तीन हजार सेवेकरी त्या मंदिराच्या परिसरात तुम्हाला दिसतील. ते सगळे श्रद्धेने काम करणारे आहेत. भाऊंनी हे परिवर्तन घडवले. संस्थानच्या कारभाराची सूत्रे भाऊंच्या हातात येण्यापूर्वी या संस्थानाची वार्षिक उलाढाल पंचेचाळीस लाख रुपयांची होती. भाऊंनी ही उलाढाल आता १३७ कोटी रुपयांपर्यंत आणली. त्यातूनच महाराष्ट्रातले सर्वोत्कृष्ट इंजिनीअरिंग कॉलेज तिथे उभे राहिले. त्यातूनच आनंदसागरसारखे जागतिक कीर्तिचा नंदनवन ठरेल, असा भव्य बगिचा उभा राहिला. शब्दांमध्ये वर्णन न करता येण्यासारखा. काही विषय सांगून समजत नाहीत, ते प्रत्यक्ष पाहावे लागतात. ऐकण्याचा आनंद वेगळा.
अडीच तासांत शेगावला पोहोचलो. पत्रकार मित्र गोविंदराव कलोरे हजर होतेच. भाऊंची लगेच भेट झाली. भाऊ कोणालाही मुलाखत देत नाहीत. कोणत्याही चॅनेलसमोर जात नाहीत. प्रसिद्धी त्यांना नको आहे. शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते भाऊंना मानतात. मला असे वाटते की, शरद पवार एकाच व्यक्तीला वाकून नमस्कार करतात, ते आमचे शिवशंकरभाऊ. अमेरिकेतल्या सिटी बँकेचे विक्रम पंडित हे गजानन महाराजांचे भक्त. ते नेहमी येतात. भाऊंचे काम बघून ते असे थक्क झाले की, त्यांनी भाऊंना सांगितले, ‘भाऊ, या सगळ्या प्रकल्पांसाठी किती कोटी हवेत तेवढे सांगा..’ विक्रम पंडितांनी त्यांच्या बँकेमार्फत किती कोटी द्यावेत? तब्बल ७०० कोटी. कोण एवढे पैसे देईल? देणा-याची दानत मोठी असेल, पण घेणा-याचा प्रामाणिकपणा आणि सचोटी माहीत असल्याशिवाय एवढी प्रचंड रक्कम कोणती बँक देऊ शकेल? लिखापढी नाही, जामीन नाही. कोणती मालमत्ता बँकेकडे गहाण नाही आणि एक भक्त आपल्या बँकेचा एवढा प्रचंड पैसा भाऊंच्या विश्वासावर देतो..
भाऊंची भेट झाली आणि भाऊ सांगू लागले..‘अहो, विक्रम पंडितांनी ७०० कोटी रुपये दिले. आमच्या विश्वस्त मंडळाने विकासाचा आराखडा तयार केला. किती पैसे लागतील, याचा हिशेब केला. किती पैसे परत फेडू शकू, ते गणित बसवले आणि असं ठरवलं की, ७०० कोटी रुपये आपल्याला नकोत, फक्त ७० कोटी रुपये घ्यायचे. महाराजांचा असा संदेश असायचा की गरजेपुरते घ्या आणि जे घ्याल ते परत करा. आम्ही विचार केला, गरज एवढीच आहे आणि फक्त ७० कोटी रुपये घेतले. त्याची परतफेड केली. गजानन महाराज यांच्या प्रेमापोटी विक्रम पंडितांनी ही रक्कम दिली. त्याचा विनियोग कुठेही चुकीचा होणार नाही, याची काळजी घेतली. आणि म्हणूनच त्यांचा विश्वास बसला..
गप्पा सुरू झाल्या आणि भाऊंनी चहा मागवला. ते म्हणाले, मी कुणाला मुलाखत देत नाही. पद्मश्री, पद्मभूषण काही घेत नाही. शरद पवार म्हणाले, ‘मी शिफारस करतो.’ मी म्हटलं, ‘अजिबात नको.’ परवा सुप्रिया सुळे आल्या होत्या. त्यांनी काम पाहिले. थक्क झाल्या. आनंदसागर बघून आल्या. इंजिनीअरिंग कॉलेज पाहिलं. सगळे प्रकल्प पाहिले. अत्यंत प्रसन्न होऊन म्हणाल्या, ‘भाऊ, तुम्हाला तर भारतरत्न दिले पाहिजे.’ मी म्हटले, ‘मला कशाला, ज्यांना भारतरत्न मिळाली, त्यातली काही मंडळी साबणाच्या जाहिराती करताहेत, अहो, काय भावनेने तुम्हाला एवढा मोठा सन्मान दिला. आणि तुम्ही काय करता आहात? मला कशाचीही हाव नाही. महाराजांनी सेवा करायला सांगितली. न बोलता सेवा करायची..’
तेवढय़ात चहा आला. मी चहाचा कप हाती घेतला. भाऊंना म्हणालो, ‘‘तुम्ही पण चहा घ्या.’’ काय म्हणावेत भाऊ? म्हणाले, ‘‘मधूभाऊ, मी संस्थानचा चहा घेत नाही. पाणीसुद्धा पीत नाही. घरून पाणी घेऊन येतो. महाराजांची ही शिकवण आहे. आपण देण्याकरिता आहोत, घेण्याकरिता नाही. त्यामुळे कसला लोभ नाही. अहो आपण चेतन आहोत, कशाचा लोभ करायला हवा? पैशाने माणसाची कधी किंमत होत नाही, तशी वस्तूने पण होत नाही. माणसाला नाचवणारी माया आहे. आणि मायेला नाचवण्याचे सूत्र भक्ती आहे, श्रद्धा आहे. आम्ही माया स्वीकारत नाही. आम्ही श्रद्धा स्वीकारतो. ते सूत्र आम्ही पाळले. विक्रम पंडितांनी जेव्हा ७०० कोटी रुपये देऊ केले तेव्हा त्यांना हे सांगितले, जेवढे लागतील तेवढेच घेऊ. ७० कोटी रुपये घेतले. परत केले. त्यांनीपण जाहिरात केली नाही, आम्हीही जाहिरात केली नाही. हा भक्तीचा व्यवहार आहे. संस्थानला पैसेच मिळवायचे असते, तर लोक मला सांगतातच, भाऊ, आनंदसागर पाहण्याची फी ३०० रुपये करा. लोक आनंदाने देतील. मी सांगितले, नाही. अशा पद्धतीने पैसा मिळवायचा नाही आणि मिळाला तरी तो टिकायचा नाही. आम्ही फक्त १५ रुपये फी ठेवली. आज १३७ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे. त्यात १३ टक्के पैसे मानवसेवेवर खर्च करतो.
रुग्णालये आहेत, औषधे आहेत. १० टक्के रक्कम बाजूला काढून नवीन बांधकामाकरिता ठेवतो. भक्त निवास कशी बांधली आहेत बघा. बाबा आमटे कुठेच जाऊन राहत नव्हते. ते फक्त इथे यायचे.
देवळातही जात नाही म्हणायचे. आपला उद्देश स्वच्छ असेल तर लोकांना तो समजतो. काम सदिच्छेने करा. प्रामाणिकपणे करा. आमच्या शेगाव नगरपालिकेकडे पाणी योजनेला पैसे नव्हते. शेगाव शहरात पाण्याची कमालीची अडचण. स्वच्छ पाणी मिळेना. पंधरा दिवसांनी पाणी. नगर परिषदेचे अधिकारी पाटणकर माझ्याकडे आले. म्हणाले की, पाणी योजना करायला केंद्र सरकार ४२ कोटी रुपये देत आहे. पण नगर परिषदेचा वाटा ७-८ कोटी रुपये द्यायलाही पालिकेकडे पैसा नाही. काय करायचे? मी म्हटल,े चिंता करू नका. संस्थानच्या सर्व विश्वस्तांना सांगून, त्यांच्या मान्यतेने नगर परिषदेला हवे असलेले ७ कोटी ७७ लाख रुपये आम्ही देऊन टाकले. महाराजांच्या आदेशानेच हे केले.’’
आज शेगावला जे पाणी मिळते आहे, त्यामुळे लोकांच्या चेह-यावर समाधान आहे. आया-बहिणींचे कष्ट वाचले आहेत. त्यांच्या समाधानात आम्ही आमचं समाधान मानतो. तुम्ही त्याला नाव द्या, ‘सामाजिक बांधीलकी’, आम्ही म्हणतो ‘आमचं कर्तव्य..’ भाऊंकडे पाहत राहिलो. एका माणसामध्ये मला देवमाणूस दिसला.
४२ प्रकल्पांतून अहोरात्र सुरू आहे मानवाची सेवा
शेगावच्या गजानन महाराज संस्थानमध्ये केवळ दर्शनासाठीच हजारोंची रांग लागते असे नव्हे, तर या संस्थानमार्फत शिवशंकरभाऊंनी जे
४२ प्रकल्प उभे केले आहेत, त्या प्रकल्पातल्या प्रत्येक विषयाचा फायदा सामान्य माणसालाच होतो आहे,
ते हे ४२ प्रकल्प..
१) धर्मार्थ अॅलोपॅथी दवाखाना, २) धर्मार्थ होमिओपॅथी दवाखाना, ३) धर्मार्थ आयुर्वेदिक दवाखाना, ४) अपंग पुनर्वसन केंद्र, ५) फिरते रुग्णालय (मोबाईल व्हॅन), ६) फिरते रुग्णालय (मोबाईल व्हॅन आदिवासी विभागाकरिता),
७) नेत्रशस्त्रक्रिया शिबिर, ८) प्राथमिक स्वास्थ्य केंद्र नसलेल्या परिसरातील ग्रामीण विभागातील रुग्णाकरिता फिरती रुग्णालय सेवा, ९) ग्रामीण विभागांतील कमकुवत घटकातील रुग्णांना आर्थिक मदत,
१०) फिजिओथेरपी विभाग, ११) श्रीक्षेत्र पंढरपूर, श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर (कुंभमेळा) तसेच मध्य प्रदेशातील श्रीक्षेत्र ओंकारेश्वर (कार्तिक मेळा) येथे यात्रेकरूंच्या सुविधेकरिता मोफत औषधोपचार केंद्र तथा महाप्रसाद वितरण, १२) वेगवेगळ्या गंभीर आजाराने पीडित रुग्णांकरिता विशेष मार्गदर्शन शिबिरे व मदत, १३) राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत वेगवेगळ्या लसीकरणाची मोहीम, १४) सातपुडा सेवा प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी सेवा प्रकल्प, १५) श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय,
१६) आदिवासी विभाग दीपावलीला मिष्टान्नासह कपडे वितरण, १७) आदिवासींना गरजेनुसार अन्नधान्य वितरण, १८) आदिवासी मुला-मुलींच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन व संसारोपयोगी भांडी वाटप, १९) आदिवासी पाल्यांचे मार्गदर्शनार्थ पालक मेळावे, २०) बौद्धिकदृष्टय़ा कमकुवत पाल्यांच्या विकासासाठी पालक मेळावे तथा मार्गदर्शनपर शिबीर, २१) ग्रामीण सेवा, २२) विभागीय नैसर्गिक आपद्ग्रस्तांना मदत-भुकंप, पूरपीडित, दुष्काळ, आगग्रस्त (अग्निप्रकोप) प्रसंगी सर्वतोपरी सहाय्य, २३) दुष्काळग्रस्त विभागातील जनावरांकरिता चारा व पाण्याची व्यवस्था, २४) अवर्षणग्रस्त भागाकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, २५) कुष्ठरोग्यांच्या सेवेतील संस्थेस आर्थिक सहाय्य,
२६) वारकरी शिक्षण संस्था व लहान मुलांकरिता व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे, २७) प्रवचन, कीर्तन, दिंडी यात्रा व व्याख्यानाद्वारे आध्यात्मिक प्रबोधन,
२८) भजनी साहित्य वाटप टाळ, मृदंग, विणा तसेच संत वाङ्मय वितरण, शेगाव, श्रीक्षेत्र पंढरपूर व श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे (आतापावेतो ११८५६ दिंडय़ांना साहित्य वाटप), २९) संत वाङ्मय प्रचार, ३०) धार्मिक, आध्यात्मिक व योगासन शिबिर, ३१) श्रींच्या दर्शनार्थ पालखी सोहळा आयोजन, ३२) शेगांवसह संस्थेच्या सर्व अधिकृत शाखांमध्ये भक्तनिवास सेवा, ३३) दररोज ३० हजार भक्तांना मिष्टान्नासह महाप्रसादाचे विनामूल्य वितरण, ३४) अल्प देणगी भोजन सेवा, ३५) आनंदसागर प्रकल्प, राष्ट्रीय कार्ये, सर्वधर्म समभाव, मानवी मूल्यांची जोपासना, मानसिक शांती राहावी, लहान मुलांचे शारीरिक समृद्धीसाठी विविध खेळण्यांसह बालोद्यान व पुरातन तथा नूतन संस्कृतीची जोपासना अशा अनेक निधींनी नटलेला आनंदसागर, ३६) शेगांव व आजूबाजूच्या परिसरातील भूगर्भामधील पाण्याच्या पातळीचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न, ३७) पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता वृक्षारोपण २ लाखांच्या जवळपास, ३८) वाचनालय, ३९) २४ तास सेवार्थ बस सेवा उपलब्ध, ४०) ५ बसेसद्वारा मंदिर-बस स्टॅण्ड- रेल्वेस्टेशन-आनंदसागर (जाणे-येणे), ४१) लोकहितोपयोगी तसेच राष्ट्रीय हित साधण्याच्या दृष्टीने शैक्षणिक गुणवत्ता विकास, नैतिक विकास व संपूर्ण स्वच्छता अशा कार्यशाळेकरिता कार्य, ४२) खातेनिहाय कामाद्वारे रोजगार उपलब्ध.
शेगाव पाणी योजनेसाठी शिवशंकरभाऊंनी दिले ७ कोटी ७७ लाख रुपये!
शेगाव नगर परिषदेला पाणीपुरवठा करणा-या योजनेचा नगरपालिकेचा १० टक्के वाटा नगर परिषदेला देणे शक्य नसल्यामुळे गजानन महाराज शेगाव संस्थानने हा भार उचलावा म्हणजे पाणी योजना मार्गी लागेल, अशी विनंती आम्ही शिवशंकरभाऊंना केली होती. त्यांनी आनंदाने हा वाटा उचलायची तयारी दाखवली आणि ४२ कोटी रुपयांच्या योजनेतला नगरपालिकेचा ७ कोटी ७७ लाख रुपयांचा वाटा शेगाव नगर परिषदेला शिवशंकरभाऊंमुळे मिळाला. म्हणून शेगाव नगरात पिण्याचे पाणी आज सगळ्यांना मिळत आहे, अशी माहिती शेगाव नगर परिषदेचे त्यावेळचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीधर पाटणकर यांनी दै. ‘प्रहार’शी बोलताना दिली.
२००७ ते २०१० या कार्यकाळात श्री. पाटणकर हे शेगाव नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यावेळी केंद्र शासनाच्या मध्यम आणि लहान शहरांच्या पायाभूत विकास योजनेमध्ये पाणीपुरवठा योजनाही होती. केंद्र सरकारच्या मान्यतेने शेगाव नगर परिषदेची ही योजना ४२ कोटी १८ लाखांची ठरली. त्यात केंद्र सरकारकडून ३१ कोटी ४ लाख रुपये येणार होते. महाराष्ट्र शासन ३ कोटी ८८ लाख रुपये राज्य सरकारचा वाटा म्हणून देणार होते. नगर परिषदेचा हिस्सा होता ३ कोटी ८८ लाखांचा. तो हिस्सा शेगाव संस्थानने दिला. शिवाय कमी पडणारे ३ कोटी ८९ लाख रुपये शिवशंकरभाऊंनी संस्थानमार्फतच दिले. असे या संस्थानातर्फे केवळ शिवशंकरभाऊंमुळे ७ कोटी ७७ लाख रुपये पाणी योजनेला मिळाले. म्हणून ही योजना कार्यान्वित झाली. संस्थान केवळ श्रद्धास्थान न मानता, त्याची सामाजिक बांधीलकी भाऊंनी जपली. त्यामुळे ही पाणी योजना अमलात आली आहे. गजानन महाराजांच्या कृपेनेच हे घडले आहे, अशी शिवशंकरभाऊंची भावना आहे, असेही श्री.?पाटणकर यांनी सांगितले. शेगाव शहरात पिण्याचे स्वच्छ पाणी पंधरा-पंधरा दिवस आम्ही देऊ शकत नव्हतो. शिवशंकरभाऊंनी एवढी मोठी रक्क्म नगर परिषदेला दिल्यामुळेच आज एवढे मुबलक पाणी शेगाव शहराला मिळू शकले आहे, अशी कृतज्ञतेची भावनाही श्री. पाटणकर यांनी व्यक्त केली. – श्रीधर पाटणकर, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, शेगाव नगर परिषद
बारा तास नि:स्वार्थ काम करणारे शिवशंकरभाऊ
शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील स्वच्छता हे सगळ्यात मोठे आकर्षण आहे. जगभरातून लोक इथे येतात आणि एवढय़ा भव्य परिसरात इतकी स्वच्छता कशी, असे विचारतात. याचे सगळे श्रेय भाऊंना आहे. शिवशंकरभाऊंनी तीन हजार सेवेक-यांमार्फत इथे अशी एक शिस्त लावली आहे की, कागदाचा कपटा टाकायलाही कोणी धजावणार नाही. जर स्वच्छतेचे असे वळण लावले तर आपोआपच प्रत्येक माणसाच्या वृत्तीमध्ये स्वच्छता भिनते. आणि कोणीही कुठेही कचरा करत नाही.
मी शिवशंकरभाऊंना कर्मयोगीच समजतो. संतसुद्धा म्हणता येईल, इतके त्यांचे काम मानवाला आत्मिक समाधान देणारे आहे. जेव्हा गजानन महाराज होते, त्या काळात त्यांनी महाराजांनी जे नियम ठरवले, त्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून गजानन महाराज संस्थान तंतोतंत काम करते आहे. कसलीही प्रसिद्धीची हाव नाही. दिवसभरात बारा तास काम करत राहणारे शिवशंकरभाऊ तपस्व्यासारखे वाटतात. भाऊ भगवी वस्त्रे घालणारे संत नाहीत, तर साधासुधा सुती कपडा त्यांच्या अंगावर आहे. धोतर, सदरा आणि गांधी टोपी या वेशातले भाऊ तपस्वीच वाटतात. ४२ सेवाप्रकल्प भाऊंनी उभे केले आहेत. आणि त्यातला प्रत्येक प्रकल्प स्वच्छ आणि पारदर्शक आहे. आनंदसागर पाहून या, जगाला या प्रकल्पाने वेड लावले आहे. याचा संकल्प भाऊंचा, आर्किटेक्टही भाऊच. सगळे काही त्यांच्या डोक्यातून आले. असे हे भाऊ आज ७५ वष्रे पूर्ण करीत आहेत. त्यांना मन:पूर्वक अभिवादन.- गोविंद कलोरे, पत्रकार, शेगाव
श्री,shiv Shankar भाउ पाटील यांना vaad दिवसाच्या हार्दिक Shubhechcha !
ति. भाऊ, आपण कर्मयोगीच, “माणसातील देवमाणूस” हि सर्वश्रेष्ठ पदवी आपण केंव्हाच संपादन केली आहे. बाकी कोणत्याही पुरस्काराची, पदवीची आपल्याला गरज नाही. आपल्या कर्तृत्वा प्रती नतमस्तक. श्रींच्या सेवेकरिता आपणांस उदंड आयुष्य लाभो. || श्री गजानन जय गजानन ||
शिवशंकर भाऊ आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.