देव संतांच्या शब्दात किती ताकद असते पाहा..! त्यांनी उच्चारलेल्या शब्दांची, वाक्यांची प्रचिती येतेच हा अनुभव आहे. मागील भागात ‘हम गया नही जिंदा है’ या स्वामी महाराजांच्या वाक्याचा अर्थ शोधत होतो. बाबारे!
देव संतांच्या शब्दात किती ताकद असते पाहा..! त्यांनी उच्चारलेल्या शब्दांची, वाक्यांची प्रचिती येतेच हा अनुभव आहे. मागील भागात ‘हम गया नही जिंदा है’ या स्वामी महाराजांच्या वाक्याचा अर्थ शोधत होतो. बाबारे! मी पाहतो आहे. याचं भान तुला असलचं पाहिजे. असा सज्जड दम देणारे स्वामी समर्थ महाराज आपण पाहिले. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी सर्वत्र ते रूप भरून उरलेले आहे. महाराजांची शक्ती कल्पनातीत आहे. त्याचा अंतपार वेदानाही लागलेला नाही. म्हणून माणसांचा देह धारण करून अवतरलेले महाराज हे फक्त लौकिक देह विसर्जित करण्यासाठी समाधिस्त झाले. हेच खरे आहे. आजही अनेकांना सहाय्यभूत झालेले महाराज अनेकांकडून ऐकायला मिळतात. याची प्रचिती आम्ही घेतली. दोन वर्षापूर्वी एक चमत्कारिक घटना घडली.
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस भर उन्हाळय़ात संध्याकाळी चारच्या दरम्यान अवकाळीचे वातावरण निर्माण झाले. अक्कलकोटच्या वटवृक्ष स्वामी मंदिरात भक्तांची खूप मोठी गर्दी दर्शनासाठी झाली होती. अचानक पाऊस, विजांचा कडकडाट सुरू झाला. मंदिरात लोक मिळेल तिथे आडोशाला उभे राहिले होते. गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता. तेवढय़ात विजेचा प्रचंड लोळ वटवृक्षातून खाली आला. त्याचा आवाज अक्कलकोट शहरापासून दहा किलोमीटरच्या पंचक्रोशीत घुमला. आसपासचे सगळे टी.व्ही. इलेक्ट्रिक वस्तू जळून गेल्या, परंतु वटवृक्षाच्या फांदीतून आलेला विजेचा लोळ खाली आला आणि पुन्हा आल्या त्या मार्गाने परत गेला.
कुणालाही इजा झाली नाही. कानठाळय़ासुद्धा बसल्या नाहीत. महिला, लहान मुले, पुरुष मंडळी घाबरून मुकी झाली होती. परंतु कोणालाही त्याची झळ बसली नाही. हाय लागली नाही की वटवृक्षाची पाने सुद्धा जळाली नाहीत. प्रसंगानंतर दुरुस्तीच्या दुकानात खूप गर्दी झाली. या घटनेचा प्रत्येक जण अर्थ वेगवेगळा काढतील. परंतु डोळस, श्रद्धेय माणूस मात्र म्हणेल ही स्वामीलीला आहे. ‘हम गया नही जिंदा है’ या वाक्याचीच प्रचिती आहे.
श्री महाराजांनी चैत्र वद्य १३ मंगळवार शके १८०० सन १८७८ दुपारी चार वाजता समाधी योग साधला. तत्पूर्वी महाराजांनी श्री चोळप्पांच्या घरी ब्रह्मानंद गंहेची निर्मिती स्वत:साठी करवून घेतली. तेथे त्यांनी अष्टवसू, दशदिक्याळांची स्थापना करवून घेतली. समाधीच्या वरती उजवीकडे गणपती, मध्ये मल्हारी मरतड आणि डाव्या बाजूला आम्रकोटी महादेवाची स्थापना करवून घेतली. त्याचे पौरोहित्य योगीराज श्री चिदंबर दीक्षित यांनी केल्याचा उल्लेखही आहे. महाराज म्हणाले हे देव आमचे पाहुणे आहेत. ‘आम्ही जे जेऊ त्यातील त्यांना आधी देऊ, मग आम्ही खाऊ’ इत्यादी वर्णन येथे उल्लेखीत करण्याचे कारण म्हणजे महाराजांचा समाधीयोग झाला हे निश्चित होते. परंतु त्यानंतर ते म्हणतात, ‘हम गया नहीं जिंदा है’ हे प्रकट बोधवाक्य सर्वश्रृत आहे.
असे असून सुद्धा श्री स्वामी समर्थ कोठे आहेत? असा प्रश्न अनेकांच्या मनात येणार हे स्वत: महाराजांनीच जाणले होते. त्यामुळे त्याचे उत्तर त्यांनीच देऊन ठेवले आहे.
अनन्याश्चिंतयन्तो मां ये जन: पर्युपासते।।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेत्रं वहाम्यहम ।।
या गीतेतील श्लोकाचे उच्चारण स्वत: महाराज अनेकवेळा करत. म्हणून महाराजांना स्मर्तुग्रामी म्हटले जाते. स्मरण करा. अनन्य भावभक्तीने त्यांचे स्मरण करा त्याक्षणी मी तुमच्या पाठीशी आहे. असे प्रकटभाष्य त्यांनी केलेले आहे. मग प्रश्न मनात राहण्याचे कारणच नाही. महाराज ‘हम गया नहीं जिंदा है’ असे का सांगतात, तर मनामध्ये अन्य कोणताच किंतू, विचार न ठेवता जो स्मरण करतो. महाराजांची आठवण काढतो. त्याला महाराज आजही सहाय्य करतात. हा हजारोंचा अनुभव आहे. पण तरीही काहीजण, महाराज अमूक ठिकाणीच आहेत. किंवा अमूक ठिकाणी नाहीत. अशी बाष्फळ बडबड करताना दिसतात. कारण देव सर्वत्र भरुन उरला आहे.
देव सर्वत्र भरला।
अवघा ठाव रिता नाही उरला।।
असे तुकोबाराय सांगतात. मग आम्ही काय करायचे तर सर्वत्र भरलेले स्वामी महाराज हे एक मनाची उर्जाश्रोत समजून नामस्मरणाची उपासना करायची. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण हाच मोठा भक्तिमार्ग आहे. त्यातूनच ‘हम गया नहीं’ या वाक्याची प्रचिती येते. हा अनुभव आहे. कारण महाराज पुन्हा आपल्या पाठीशी सत्कर्माच्या वेळी आहेत की नाहीत? हे वेगळे पाहण्याची गरजच राहात नाही. कारण श्रींचे दुसरे आश्वासन आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
।। गोडी नामस्मरणाची।।
मला लहानपणापासून वाचनाची पुष्कळ आवड. मी अनेक पुस्तके वाचली. त्यात माझे आध्यात्मिक पुस्तकाचे वाचनही बरेच झाले आणि आध्यात्मिक वाचनातून मला सारखे नामस्मरणाला पर्याय नाही हे जाणवत होते व मलाही नामस्मरण करावे असे वाटत होते. पण मन चित्त था-यावर ठेऊन नामस्मरण होतही नव्हते व वेळही मिळत नव्हता, म्हणजे तो काढला ही जात नव्हता व असेच पाच वर्षापूर्वी मी दत्तजयंतीच्या दरम्यान गावी मालवणला होतो व माझा मेहुणा शांताराम कांदळगांवकर दत्तजयंती दिवशी मला सकाळीच म्हणाला, चल जरा काम आहे.
आपण सावंतवाडीला जाऊ या. मीही कंटाळलो होतो. चल म्हणालो व आम्ही दोघे त्यांच्या मोटार सायकलने निघालो व वाटेत कुडाळ मार्गे जाताना राऊळ महाराजांचा मठ लागला. मी ही राऊळ महाराजांबद्दल व त्यांच्या मठाबद्दल स्वामींच्या पुस्तकात वाचले होते. व मला त्या मठात जायचेही होते, मग आम्ही परत येताना त्या मठात जाण्याचे ठरवले व परतीच्या प्रवासात त्या मठात आलो व नेमकी आम्हाला आरती मिळाली. व आम्ही आरतीला थांबलो. समोर राऊळ महाराजांची सुंदर मूर्ती होती, पण आरती चालू असेपर्यंत राऊळ महाराजांच्या मूर्तीत मला सारखे स्वामी समर्थच दिसत होते.
माझ्या मनात थोडी कालवाकालव झाली, कारण आम्ही स्वामीभक्त आणि दिवस दत्तजयंतीचा आणि राऊळ महाराजांच्या मठात मला समजत नव्हेत, माझ्या मनाचा भ्रम की चमत्कार, पण आरती संपल्यावर दर्शन रांगेतून पुढे गेल्यावर राऊळ महाराजांचीच मूर्ती दिसली. आम्ही दर्शन व प्रसाद घेतला व आजूबाजूच्या मंदिरातही दर्शन घेतले व मी माझ्या सवयीप्रमाणे तेथील दुकानात राऊळ महाराजांची अधिक माहिती मिळावी म्हणून काही पुस्तक मिळते का ते पाहू लागलो व एक पुस्तक घेतले व त्या पुस्तकाबरोबर दुकानदाराने मला राऊळ महाराजांचा एक फोटोही दिला. त्या फोटो मागे एक संदेश लिहिला होता,
।। जीवनात आल्यावर कमीत कमी दिवसातून एक वेळ। परमेश्वराचे नाव घ्यावे की, जेणेकरून जीवनाचे सार्थक होईल।।
आम्ही दोघेही घरी आलो, पण मी एक निर्णय घेतला व तो सतत गेली पाच वर्षे सातत्याने पाळत आहे. मी श्री स्वामी समर्थाचे नामस्मरण चालू केले व खरंच नामस्मरणानी आपल्या जीवनात आमूलाग्र बदल होतो हे मला पटले. नामस्मरणामुळे मला एक विलक्षण ईश्वरीय शक्ती आपल्याबरोबर सतत आहे. यांचा चांगलाच अनुभव आहे.
।। श्री स्वामी समर्थ।।
स्वामींच्या नामाची पालखी
भक्तानी खांद्यावर घेतली
वाट चालुया जीवनाची
गोडी लागली नामस्मरणाची
सोबत आहे श्री स्वामी समर्थाची।। – मयूर ढोलम
‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे’
या स्वामींच्या वाक्याचा परिचय मला माझी आई रुग्णालयामध्ये असताना आला. हे वाक्य लिहिताना माझ्या अंगामध्ये आता पण शहारे येत आहेत.माझी आई नानावटी रुग्णालयामध्ये उच्चरक्तदाबाच्या त्रासाने आजारी असल्या कारणाने भरती केली होती. डॉक्टरांचे चार दिवस औषध उपचार चाले होते. डॉक्टरांनी चार दिवसांनी म्हणजेच शनिवारी सांगितले की रविवारचा दिवस असू दे आता तब्येत बरी आहे. सोमवारी तुम्ही घरी घेऊन जा. त्याच दिवशी माझा दोन नंबर भाऊ व भावजय आईला रुग्णालयामध्ये बघायला आली आणि त्याच दिवशी तो आईबरोबर काही तरी त्याचे बोलणे झाले (त्याच्या वैयक्तिक त्रासाबद्दल) आणि तो आईसमोर रडायला लागला. आईने त्याच्या बोलण्याचा धसका घेतला आणि ३ ते ४ चार तासांनंतर आईचे संतुलन बिघडले आणि आई ३० ते ३५ र्वष पाठीमागच्या विषयी बोलू लागली.
ती कोणाला ओळखत पण नव्हती एक सारखी तेच तेच विषयी बोलत होती. नजरेला नजर लावत नव्हती ताबडतोब डॉक्टर, नर्स यांनी आईला आय सीयूमध्ये ठेवले आई कोणाचे ऐकत नव्हती आणि रुग्णालयाच्या खॉटेवर झोपत या बसत नव्हती. डॉक्टरांनी इंजेक्शन दिले तरी झोपत नव्हती. डॉक्टर आपल्या परीने प्रयत्न करीत होते. शेवटी डॉक्टरांनी त्यांच्या कर्मचा-यांना आईचे हात-पाय खाटेला बांधून ठेवायला सांगितले. तेव्हा माझ्या डोळय़ातून पाण्याच्या धाराच येऊ लागल्या. मनातून पुरेपूर खचलो होतो. पण घरामध्ये मी मोठा असल्याकारणाने मी माझ्या मुलांना, बायकोला, भावंडांना, आणि बाबांना पण दाखवू दिले नाही की मला किती त्रास होतोय. आईला रुग्णालयामध्ये टाईमा टाईमावर चहा-नाष्टा जेवण येत होते. जे येईल ते आई दोन मिनिटांमध्ये खाऊन टाकत होती.
एरव्ही आई थोडे खाणारी ते आयसीयूमध्ये चार दिवस काही पण दिले तरी खात होती. त्याच दरम्यान माझी मावशी व तिची सुनबाई आईला बघायला आली. आईचा त्रास पाहून त्या दोघीही रडायला लागल्या. मलाही राहावल नाही. मावशीच्या सुनेने मला वॉर्डच्या बाहेर घेऊन सांगितले की भाऊ रडू नका, काही तरी मार्ग निघेल. पण ते चार दिवस आई झोपत पण नव्हती. आईचा त्रास मला सहन होत नव्हता. त्या वेळेला मला वहिनीने समर्थाचा मंत्र जप करायला सांगितला. त्या वेळेपासून मी स्वामींचा मंत्र जप आईच्या कानामध्ये करून आई जवळ असताना करू लागलो. खरंच माझ्या अंगामध्ये आताही शहारे येत आहेत.
त्याच रात्री म्हणजे गुरुवारी सकाळी ४ वाजता माझा तीन नंबर भाऊ आईजवळ थांबला होता. रात्रभर जागे राहून त्याचा ही डोळा जागला तेव्हा अचानक स्वामींचा चमत्कार झाला आणि त्याला विचारू लागली मी इथे कशी काय आली. मला बांधून का ठेवले आहे. त्याला म्हणाली, अंकुशला बोलव. मला त्याने लगेच बोलावून घेतले. त्याच वेळेला डॉक्टर पण आले त्यांनी आईला विचारले की तुमचे नाव काय. आईने आपले नाव सीताबाई असे सांगितले. हा समोर उभा कोण, असे विचारले तर तिने सांगितले हा माझा मोठा मुलगा, ही माझी सून, ही मुलगी आम्हा सर्वाना तिने ओळखले तेव्हा माझा जीवात जीव आला. त्या वेळेला मी स्वामींचे आभार मानले. त्या वेळेला कळत नकळत शब्द निघाले ‘स्वामी तिन्हीं जगाचा आईविना भिकारी’ हे शब्द त्या दिवशी आठवले. त्या दिवसापासून मी स्वामींच्या विलेपार्ले येथील मठामध्ये वेळ काढून जाऊ लागलो. त्याच वर्षी अक्कलकोटला माझे मित्र जात होते. मला त्यांनी विचारलं की तू येणार का, मी कसलाही विचार न करता हो म्हणालो आणि स्वामींच्या समाधीचे दर्शन घेऊन आलो.स्वामींची अशीच सेवा माझ्या हातून अखंड घडत राहू दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना! – अंकुश गुरव
अक्कलकोटमधील खास स्थळे
श्री स्वामी समर्थानी अक्कलकोटसारख्या आडवळणाच्या खेडेगावी, जेथे आठ आण्याची खडीसाखर मिळणे देखील कठीण होते अशा ठिकाणी येऊन वास्तव्य का केले असा विचार ब-याच भक्तांच्या मनात येतो. परंतु अक्कलकोट व त्याच्या आजूबाजूचा परिसर व तेथील परिस्थिती पाहिली असता या गोष्टीचा उलगडा होऊ शकतो. दक्षिणेस ३०-४० मैलावर गाणगापूर हे भीमा-अमरजा संगमावरील पुराण प्रसिद्ध तीर्थ असल्याचा उल्लेख स्वामींनीच अनेक वेळा कलेला आहे. दक्षिणेस ४०-५० मैलांवर गुलबर्गा हे मोठे शहर आहे. तेथे एक मुसलमान सुफी पंथाचे सुप्रसिद्ध व दक्षिणेतील प्रमुख आचार्य बंदे नवाज अली होऊन गेले. त्यानांच हिंदू केशव चैतन्य अर्थात बंदे नवाज अलींची समाधी म्हणून मानतात. यास ७०० वष्रे पूर्ण झाली आहेत. येथील दर्गाही ब-याच मैलावरून दिसतो. येथेच श्रीशरण बसवेश्वर नावाचे लिंगाईत पंथाचे साधू शेकडो वर्षापूर्वी होऊन गेले त्यांच्याही प्रेक्षणीय मठ येथे आहेत.
४० मैलावर ईशान्येस पंढरपूर येथे सुप्रसिद्ध असे पांडुरंगाचे देवालय फार पुरातन कालापासून आहे. श्रीनाथ शंकराचार्यानी या क्षेत्रास महायोगपीठ म्हटले आहे. पंढरपुराजवळ मंगळवेढेवृद्धा शेकडो वर्षापासून संताची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. अक्कलकोटास येण्यापूर्वी श्री समर्थाचे या गावी १२ र्वष वास्तव्य होते.
उत्तरेस वाशी या गावी भक्त अंबरीश राजासाठी श्री भगवान विष्णूंनी चिरंतन वास्तव्य केले आहे. श्री भगवंत व श्री लक्ष्मी यांच्या उत्कृष्ट शालीग्राम शीलेच्या मूर्ती आहे. सांगोला तालुक्यात दरबाबाचा डोंगर असून त्यावर श्री शुक्राचार्याचे पवित्र स्थान आहे. त्याला शुक्राचार्याचा डोंगरही म्हणतात.
करमाळे तालुक्यातील कंदर गावी श्री कण्व ऋषींची समाधी आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावर मोहोळ या गावाजवळ उवळ येथे श्री नागनाथ सिद्धांचे मूळ स्थान आहे. भीमा नदीच्या काठी असलेल्या आश्रमात पांडव असल्याचाही उल्लेख आहे. उत्तरेस ४० मैलांवर तुळजाभवानीचे पुरातन स्थान आहे.
सोलापूरच्या सीमेवर बाळे या गावी खंडोबाचे पवित्र स्थान आहे. श्री माणिक प्रभू व उपासनी महाराज वगैरे दत्त सांप्रदायीचा खंडोबा देवताशी संबंध आहे. खुद्द सोलापुरात सिद्धेश्वर नावाचे साधू होऊन गेले. म्हणून या गावी श्री केशव मंदिर आहे. तेथे ध्रुवाने तपश्चर्या केली होती. तसेच अगस्ती ऋषींनी श्रीची पूजा केल्याचा उल्लेख आहे. बऱ्हापूर गावी पीर अल्लाउद्दीनचा दर्गा आहे. हिंदू लोक मुसलमान दोघेही जण येथे पूजा-अर्चा करतात. जेऊर या गावी साक्षात काशी विश्वेश्वर प्रकट झाले होते. हे हेमाडपंथी देवालय बरेच जुने आहे. बोरी आणि हरणी नदीच्या संगमावर कुरनूर या गावी संगमेश्वराचे पुरातन देवालय आहे.
अक्कलकोट गावतच डबरे गल्ली म्हणून वस्ती आहे. तेथे श्री नागनाथ सिद्धांचा मठ आहे. अनेक सिद्ध पुरुष येथे होऊन गेले आहेत. याच गल्लीत हक्याच्या मारुती म्हणून रामदासपंथी जुना प्रसिद्ध मठ आहे. येथेच बाळप्पा महाराजांनी श्री समर्थाच्या आज्ञेनुसार तपश्चर्या केली.
बाजार पेठेला लागूनच गल्लीत शिवयोग्यांच्या तपाने बारा ज्योर्तिलींगे प्रकट झाली आहेत. या स्थानाला मोगल बादशाहाकडून इनाम मिळालेले आहे. गावातील मार्केट रस्त्यावरच एकमुखी दत्ताचे स्थान आहे. ही मूर्ती मूळ पुरुषाला २०० वर्षापूर्वी श्रीकाशी क्षेत्रात प्राप्त झाली आहे. मूर्ती सुबक व आकर्षक आहे. दक्षिणेस गावच्या शिवेवर ख्वाजा दाऊद नरूद्दिन या दोन सुफी पंथाच्या अवलियांच्या कबरी व दर्गे आहेत. गावात श्री सिद्धिविनायकाचे पुरातन मंदिर आहे. अशा प्रकारचे देवालय क्वचितच पाहावयास मिळते. अक्कलकोटच्या दाही दिशांना व गावातही पवित्र देवतांचे, अवधुतांचे, योग्यांचे वास्तव्य आहे. याचकरिता हे पवित्र स्थान श्री स्वामी समर्थानी आपल्या अंतिम वास्तव्यकरिता पसंत केले होते.
अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थाचे पाच मुख्य मठ आहेत. ही समर्थाची लीलाभूमी असल्याचे गावात ठिकठिकाणी श्री समर्थाचे अवतारकालीन झालेल्या पादुका आहेत. अर्थात ही समर्थाची उपपीठे आहेत. समाधी मठ पेठेतील स्वामी समर्थाचा समाधीमठ हा मठ श्री समर्थाच्या अवतार काली गेला. त्यावेळी येथे श्री. विंचुरकर हे संस्थानाचे व्यवस्थापक होते. त्यांना कुष्ठरोग होता. श्री समर्थाना याबद्दल विचारता समर्थानी श्री. विंचुरकरांना हातातील हि-याची अंगठी काढून फेकून दे म्हणून सांगितले. अंगठी फेकण्यापेक्षा त्यांनी समर्थापुढे ठेवली, ती चोळप्पाने उचलली व विकून आलेल्या रक्कमेत हा मठ श्री समर्थाच्या समाधी गुहेसहीत बांधला. या मठात गर्भगारात असलेल्या श्री गणपती, देवी, तिनमूर्ती आणि शिवलिंग या सर्वाची स्थापना फार मोठय़ा समारंभाने शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आली होती. त्यावेळी समर्थ जिव्हाळय़ाने या सोहळय़ाला उपस्थित होते.
Sir,
Please public the Prahalad maharaj artical.
Thanks