महागाईने पोळलेले लोक ‘महंगाई की पडी मार.. अब की बार मोदी सरकार’ अशा घोषणेला फसले आणि आता डोक्यावर हात मारून घेत आहेत.
‘काळ्या पैशाला आवर घालण्यासाठी..’
‘तस्करी करणा-यांना रोखण्यासाठी..’
‘जाली नोट बाजारात येऊ न देण्यासाठी.. ’
नोटाबंदी जाहीर करण्यामागचा नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला उद्देश असा तीन विषयांत सांगितला होता.
देशातील सामान्य जनतेला काळा पैसा बाळगणा-या ६३ उद्योगपतींबद्दल कमालीचा राग आहे. देशातील ८० टक्के संपत्ती ६३ उद्योगपतींच्या हातात आहे. त्यात पुन्हा ८० टक्के हा काळा पैसा आहे. पंतप्रधान निवडणुकीत जी आश्वासने देत होते की, परदेशातील काळा पैसा मी भारतात आणीन. तो पैसा भारतात आणणे त्यांना काही शक्य झाले नाही आणि शक्य होणारही नव्हते. सामान्य मतदारांना मूर्ख बनवण्यासाठी निवडणुकीत थापा माराव्या लागतात. अशा थापा मोदींनी मारल्या. लोकांना मूर्ख बनवले. महागाईने पोळलेले लोक ‘महंगाई की पडी मार.. अब की बार मोदी सरकार’ अशा घोषणेला फसले आणि आता डोक्यावर हात मारून घेत आहेत. कोणती दुर्बुद्धी झाली आणि भाजपाच्या कमळाबाईला देशाने डोक्यावर बसवून घेतले आणि एका नव्या हुकूमशहाचा त्यातून जन्म झाला. मोदींना नौटंकी छान जमते. जाहिरातीचे तंत्र चांगले जमते आणि लोकांना मूर्ख बनवण्याचे तंत्रही चांगले जमते. गेले चार आठवडे ते आपण पाहत आहोत. तसेही गेली अडीच वर्षे हे सातत्याने जाणवले आहे की, ‘दिल की बात’, ‘मन की बात’ अशा भंपक भाषणांनी, परदेशात भारताची निंदा- नालस्ती करून, १५ ऑगस्टला पक्षाचे सभेतील भाषण करून मोदींनी लोकांना मूर्खच बनवले आहे. पण सगळ्यात गंभीर बाब आहे ती ही की, ज्या मोदींनी ‘मेरे प्यारे देशवासीयों, असे म्हणून देशातील जनतेला असे भासवले की, काळ्या पैशाचा कॅन्सर या देशात कोण कापून काढणार असेल तर तो नरेंद्र मोदीच कापून काढणार आहेत.
१००० आणि ५००च्या नोटा चलनातून बाद केल्या, त्याला आता महिना होईल. ज्या दिवशी ही घोषणा?झाली त्या दिवशीच सांगण्यात आले की, तीन दिवसांत अर्थव्यवस्था मार्गी लागेल. मग सांगण्यात आले की, ८ दिवसांत बँकांमध्ये भरपूर पैसा येईल. मग सांगण्यात आले की, तुमचा पैसा सुरक्षित आहे. मग जाहीर झाले की, फक्त २००० रुपयेच मिळतील. सामान्य माणसाचा रांगेत उभे राहण्याचा तासाचा भाव एका तासाला एक हजार रुपये असा पडलेला आहे. दोन तास उभे राहिल्याशिवाय २००० रुपये मिळत नाहीत. म्हणून आता एक नवी युक्ती निघाली. त्याचा भाव तासाचा २०० रुपये ठरला आहे. म्हणजे असे की, ‘अ’ माणसाकरिता ‘ब’ने रांगेत उभे राहायचे. नंबर जवळ आला की, ‘अ’ला फोन करायचा मग ज्याला पैसे काढायचे आहेत त्याने रांगेत येऊन उभे राहायचे आणि ‘ब’ला तासाचे २०० रुपये द्यायचे आणि २००० रुपये बँकेतून घ्यायचे आणि १८०० मुद्दलमध्ये ठेवायचे. यातून एक नवीन रोजगार सुरू झाला. सोने बंदी आली. आता मोदींचे लोक घरात घुसणार? किती सोने तुमच्या घरात आहे याचा हिशेब होणार. विवाहित महिलेला ५०० ग्रॅम, अविवाहित महिलेला २५० ग्रॅम आणि पुरुषाला फक्त १०० ग्रॅम एवढेच सोने बाळगायची परवानगी आहे. आता लग्नाचा हंगाम आहे. अनेक लग्ने मोडणार आहेत. लोक शिव्या-शाप घालत आहेत. पैसा झाला, सोने झाले आता तुम्ही किती कपडे वापरावेत याच्यावर निर्बंध येणार आहेत. रोकड खिशात दिसली तर अटक होणार आहे. देशात जे काही चालले आहे.. महिना झाला तरी रांगा कमी होत नाहीत. लोकांना आपलेच पैसे मिळत नाहीत. सरकार चालवता येत नसेल तर असले धंदे करायला कुणी सांगितले होते. या सगळ्या विषयात अर्थमंत्री आहेत कुठे? त्यांचे नाव नाही, त्यांचा जाहिरातीत कुठे फोटो नाही. फोटो फक्त मोदींचे. एका हुकूमशहाच्या तालावर हा देश पूर्णपणे वेठीला धरला गेला आहे. अजून किती महिने ही परिस्थिती राहील, कोणीच सांगू शकत नाही. एकाने प्रश्न विचारला की, मोदींचे डोके एवढे तल्लख आहे का? हे सगळे निर्णय मोदींच्या डोक्यातून निघत आहेत का? गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यापुरते असे ‘धक्कानिर्णय’ घेतले नव्हते. आता पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या मागे किती डोकी आहेत? संघामधील काही डोकी त्यांच्या मागे आहेत का? राष्ट्रीयीकृत बँकांच्या बोर्डाचे चेअरमन विनोद रॉय त्यांच्या मागे आहेत का? जे पूर्वी ऑडिटर जनरल होते. कोणता तरी एक जबरदस्त मेंदू मोदींच्या मागे आहे आणि त्याच्या आडून मोदी हे सगळे करत आहेत. सामान्य माणूस इतका हैराण झाला.. परवा रिझर्व्ह बँकेने जाहीर केले की, आता पाहिजे तेवढे पैसे मिळणार.. बँकेने दरवाजावर पाटय़ा लिहिल्या होत्या.. ‘नो कॅश’. रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर कोणी पटेल नावाचा आणून ठेवला आहे. त्याची नियुक्ती झाल्यानंतर लगेच मोदींचा नोटाबंदीचा निर्णय आला. त्या नोटेवर या पटेलच्या सह्या आहेत. नोट एका दिवसात छापता येत नाही. सह्या आगोदर झाल्या असणार आणि जेव्हा त्यावेळचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी संघर्ष सुरू झाला त्याची कारणे नोटाबंदीच्या निर्णयाशीच जुळलेली आहेत. मोदींच्या या निर्णयाला त्यांनी ठाम विरोध केला होता. त्यातून मतभेद होऊन राजन यांना बाहेर जावे लागले आणि गुजरातमधील घरचा पटेल मोदींनी आणून ठेवला.
मोदी प्रचारात गोबेल्सला हार जाणार नाहीत. सामान्य माणसाला वाटते की, कल के लिए अच्छा हो गया. पण परिस्थिती अशी आहे की, जो काळा पैसा खणून काढण्यासाठी मोदींनी याची सुरुवात केल्याचे ते सांगतात. तर अवघ्या एका महिन्यात एका चीफ इंजिनीअरच्या घरी दिल्लीमध्ये धाड पडली. तर चार कोटी ७० लाखांच्या दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा मिळाल्या. पाकिस्तानच्या सीमेवरील ज्या दहशतवाद्यांना पकडले, त्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा मिळाल्या. तेव्हा काळा पैसा खणून काढण्याची भाषा करणारे मोदी प्रत्यक्षात नवीन चलनातील काळा पैसा इतक्या मोठय़ा प्रमाणात बाजारात उपलब्ध झाला आहे हे गणित कोण सांगणार आणि कसे जुळणार? मोदींनी आणखी एक आकडा फेकून दिला की, देशात १४ लाख कोटी काळा पैसा आहे. काळा पैसा तो – ज्याचा हिशेब नसतो आणि मोदींनी १४ लाख कोटींचा आकडा सांगून टाकला. अजून बँकांमध्ये पैसे भरण्याची मुदत २६ दिवस बाकी आहेत. ८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या काळात ११ लाख कोटी रुपये जमा झाले. पुढच्या महिन्यात किती होतील, याचा आकडा माहिती नाही. मग १४ लाख कोटींचा आकडा मोदींनी आणला कुठून?
सर्वोच्च न्यायालयात भारत सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. तीन आठवडय़ांत लोकांना त्रास होणार नाही, अशी व्यवस्था करू. गेले महिनाभर तेच सांगितले जात आहे आणि तीन आठवडय़ांनंतरही हेच सांगितले जाणार आहे की, अजून तीन आठवडे लागणार.
संतापजनक गोष्ट अशी आहे की, या सगळ्या व्यवहारात देशाचा अर्थमंत्री कुठेच नाही. ना त्यांचे निवेदन, ना त्यांची मुलाखत. त्यांना कोणी विचारतच नाही. जे काही आहे ते सबकुछ मोदी आहे. नशीब हे की, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या जागेवर अजून ते बसले नाहीत. आणखी एक मुद्दा असा आहे की, लोकांच्या संयमाचा मोदी अंत पाहात आहेत. सामान्य माणूस शांत असेपर्यंत सर्वकाही ठीक होईल, असे वाटते. तो ज्या दिवशी संतापेल त्या दिवशी परिस्थिती हातात राहणार नाही. वसईमध्ये गुरुवारी रात्री एक एटीएम फोडले. अशी किती एटीएम फुटतील, सांगता येत नाही. शेवटी सामान्य माणसाच्या संयमाला मर्यादा येतात आणि त्याला मोदींचे भाषण फार दिवस शांत बसवून ठेवेल, असे वाटत नाही. म्हणून सामान्य माणसांशी हा जो खेळ चालला आहे त्याचा स्फोट नक्की होणार. सुवर्ण नियंत्रण जेव्हा आले तेव्हाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याविरोधात अशाच पद्धतीने असंतोष शिगेला पोहोचला होता. आता त्या असंतोषापेक्षाही कितीतरी पट सामान्य माणसातील असंतोष व्यक्त होऊ लागला आहे.
सध्या व्हॉट्सअॅ प हे साधन आपल्या भावना व्यक्त करण्याचे साधन झालेले आहे. देशातील सामान्य माणसे किती चाणाक्ष आहेत, किती बुद्धिमान आहेत, त्याचे प्रत्यंतर व्हॉट्सअॅलपवरील अनेक संदेशांमध्ये येते. दोन-तीन दिवसांपूर्वी एक संदेश सगळीकडे फिरत होता.. तो संदेश असा होता..
गरिबाला वाटते आहे
नोटाबंदीमध्ये श्रीमंतांची वाट लागली,
कारकुनाला वाटते आहे,
मॅनेजरची वाट लागली,
कामगाराला वाटतेय,
मालकाची वाट लागलीय,
मतदाराला वाटतेय,
नेत्याची वाट लागली.
सत्ताधारी पक्षाला वाटतेय,
विरुद्ध पक्षाची वाट लागली.
आणि सामान्य माणसाला वाटतेय,
देशाची वाट लागली..
आणि खरी गोष्ट अशी आहे की, मोदींच्या या निर्णयाने देशाचीच वाट लागली आहे. अजून काय झालं आहे? थांबा आणि बघा काय आर्थिक अराजक होत आहे ते.
८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात ‘प्यारे देशवासियों’.. असं म्हणून भाषणाची सुरुवात केली. आज रात को बारा बजे के बाद ५००, १००० के नोट कागज हो जायेंगे, असे त्यांनी सांगितले आणि मग सावरून ते म्हणाले, की देशवासीयांनो ७२ तास कळ सोसा. तुमच्यासाठी हा निर्णय मी केला आहे. काळा पैसावाले, तस्करी करणारे आणि जाली नोटा बाजारात आणणारे या सर्वांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय आपण घेतला आहे. सामान्य माणसाला याचा अजिबात त्रास होणार नाही. याची मी ग्वाही देतो..’
८ नोव्हेंबरपासून ४ डिसेंबरपर्यंत काळाबाजारवाल्यांना, काळा पैसेवाल्यांना, तस्करी करणा-यांना आणि जाली नोट बाजारात आणणा-यांना कोणा कोणालाही त्रास झालेला नाही. त्रास झाला आहे, सामान्य माणसाला.
१२५ कोटींचा देश मोदीने गेले २८ दिवस वेठीला धरला आहे आणि एवढा मोठा देश रांगेत उभा आहे. अमर्त्य सेन म्हणाले, ‘देशात आर्थिक अराजक आहे.’
देशाचे अर्थमंत्री कोण आहेत?
नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यापासून देशाचे अर्थखाते पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच चालवित आहेत. अर्थमंत्री एवढय़ा मोठय़ा निर्णयात कुठेही सामील झाले नाहीत. त्यांचे नाव गेल्या जवळपास ३० दिवसांत सगळ्यात पहिल्यांदा समोर आले म्हणजे त्यांच्या घरीच ६५ लाख रोख रकमेत असल्याचे त्यांनीच जाहीर केले आहे.
नोटाबंदीच्या निर्णयात देशाच्या अर्थमंत्र्याला सहभागी करून घेण्यात आले नाही का? निर्णय झाला त्यानंतर देशाचे अर्थमंत्री सांगतात, की सामान्य माणसाला ५० हजारपर्यंत रक्कम बाळगण्याचा अधिकार आहे. नंतर पंतप्रधान सांगतात अडीच लाख रुपयांपर्यंत कोणताही नागरिक बॅँकेत रक्कम जमा करू शकतो. त्यानंतर अर्थमंत्री आणि अर्थसूची जाहीर करतात की, अडीच लाख रुपये भरण्यावर आयकर खात्याचा वॉच राहणार आहे. दुस-या दिवशी अर्थसचिव सांगतात की, अडीच लाखांची रक्कम भरणा-यांना ती कुठून आणली ती सांगावी लागेल.
नोटाबंदी झाल्यापासून अर्थखातं, सरकार, प्रधानमंत्री कार्यालय हे एवढे गोंधळलेले आहेत की कोणाचा पायपोस कोणाच्याही पायात नाही.
लोक म्हणजे कोण काँग्रेसच ना ? मग ते तर त्यांचे कामच आहे.
काँग्रेसवाले असेच बोलणार…