कांदिवलीत समतानगर परिसरातील दामूनगर झोपडपट्टी सोमवारी दुपारी उसळलेल्या आगडोंबात जळून बेचिराख झाली.
मुंबई- कांदिवलीत समतानगर परिसरातील दामूनगर झोपडपट्टी सोमवारी दुपारी उसळलेल्या आगडोंबात जळून बेचिराख झाली. महिंद्रा कंपनीच्या गेट क्रमांक ५ लगत पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ असलेल्या या झोपडपट्टीला लागून असलेल्या गोदामाला दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. या आगीमुळे झोपडपट्टीतील घरांमधील असलेल्या सिलिंडरचा भडका उडाला.
अत्यंत दाटीवाटीने लागून असलेल्या येथील घरांमधील सुमारे ५० सिलिंडरचे पाठोपाठ स्फोट झाले आणि आगीने सर्वच वसाहतीचा घास केला. यात दोन हजार झोपडया, कच्ची-पक्की घरे खाक झाली असून एका लहानग्यासह दोन जण ठार तर ११ जण गंभीर जखमी झाले.
दामूनगर ही कांदिवलीतील सर्वात मोठी झोपडपट्टी असून येथील बहुतेक रहिवासी कामानिमित्त घराबाहेर पडले असल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आगीमुळे परिसरात पसरलेले धुराचे साम्राज्य आणि दाटीवाटीचे, अरुंद रस्ते यामुळे अग्निशमन दलाच्या गाडय़ांची वाट अडली होती. अथक प्रयत्नांनंतर तीन-चार तासांनी आग विझविण्यात जवानांना यश आले. आग विझविण्यासाठी विलंब झाल्याने सिलिंडर स्फोट वाढण्याचा आरोप रहिवासी करत आहेत.
मात्र, अग्निशमनच्या गाडया झोपडपट्टीत शिरण्यासाठी जागा मिळत नव्हती. अखेर भिंती तोडून गाडय़ांसाठी मार्ग काढावा लागला, असे अग्निशमन दलाच्या अधिका-याने सांगितले. याच दाटीवाटीच्या घरांमुळे मदत व बचाव कार्यातही अडथळे येत होते. आगीचे रौद्र स्वरूप लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या आगीनंतर अनेक जण बेपत्ता असून त्यांची अद्याप माहिती मिळालेली नाही.
झोपडया जळून खाक झाल्यामुळे सर्व कुटुंबांचे संसार उघडयावर आले आहेत. त्यामुळे या कुटुंबांना तात्पुरता निवारा म्हणून समतानगर भागातील हनुमान नगर, आकुर्ली मार्ग महापालिका शाळेमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांची जेवणाची व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था महापालिकेने स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि विभागीय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत केली आहे.
दरम्यान, आगीच्या दुर्घटनेच्या ठिकाणी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्थानिक काँग्रेस नगरसेविका अजंता यादव यांच्यासह पाहणी केली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी घटनास्थळी भेट देऊन २ हजार चादर, २ हजार टॉवेल, खाद्यपदार्थ, पाण्याचे वाटप केले. नागरिकांसाठी सर्व जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था केली जाईल, असे निरुपम यांनी सांगितले.
दोन ठार तर ११ जण जखमी
या आगीत प्रल्हाद खरात (४५) यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एकाची अद्याप ओळख पटलेली नाही. सध्या रुग्णालयात भाजलेल्या ११ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. यात पार्वती शंकर नानुबा (६०) ही महिला ३० टक्के भाजली आहे. तर अन्य १० व्यक्ती या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
२०१५ वर्षातील सिलेंडर स्फोट
» १८ जुलै :- सांताक्रुझ चाळीत झालेला सिलेंडर स्फोट
» १६ ऑक्टोबर:- कुर्ला येथील किनारा हॉटेलला आग
» १८ ऑक्टोबर :- विक्रोळी पार्कसाईट परिसरातील सिलेंडर स्फोट
» १९ ऑक्टोबर:- ठाण्यातील साईनगर परिसरातील एका घरात आग
» ९ नोव्हेंबर:- मालाड येथील लग्नमंडपात झालेला सिलेंडर स्फोट
» २० नोव्हेंबर :- दादर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १ ला आग
आग लागली त्यावेळी प्रल्हाद घरी एकटेच होते. झोपलेले असल्याने आग लागल्याचे त्यांना कळलेच नाही. आम्हाला याची माहिती दुपारी १ वाजता कळल्यानंतर आम्ही त्यांना तातडीने रुग्णालयात आणले. मात्र, रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. प्रल्हाद हे सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. मात्र, आजारी असल्याने ते काही महिने सुट्टीवर होते. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. या झोपडपट्टीतील सर्व घर ही पत्र्याची व प्लॉस्टिकची असल्याने आग झपाटयाने पसरली.
– मिलिंद सोनावणे, मृताचे नातेवाईक
शिवसेनेला मुंबई महामहानगरपालिकेतून हद्दपार केल्याशिवाय मुंबई सुंदर होणार नाही. शिवसेनेच्या नगरसेवकांनी पैसे खाउन झोपड्या बंधू दिल्या त्याचा हा परिणाम. शिवसेना फक्त पैसा कसा उपटायला मिळेल हेच बघते, बाकी सगळे आयच्या गावात. शिवसेनेचे एकच काम ते म्हणजे जनतेला ब्लॅकमैल करून पैसे उकळणे.