परवा विक्रम आणि वेताळ कोकण भ्रमणास आले. ते कडकडीत उन्हातून मजल दरमजल करत होते. घामाच्या धारा निथळत असताना तावूनसुलाखून निघालेल्या वेताळाने विक्रमास चाळवले, ‘विक्रमा, जरा थांबतोस? फार थकायला झालेय्.’
विक्रम म्हणाला, ‘वेताळा, तुला माहीत आहे का हा भाग कोणता आहे ते? याला ‘जैतापूर-नाटे’ म्हणतात. येथील वातावरण अलीकडे नेहमीच ‘तापलेले’ असते. येथे नको. जरा पुढं विजयदुर्गकडे जाऊ आणि थांबू. हा मधला सागरी महामार्ग थोडा आनंदी करणारा वाटतो. वाघोटणच्या खाडीवरून मी लहानपणी अनेक वेळा तराफ्यातून सफर केली आहे. त्या मार्गावरून चालताना तुझे ओझेही मला वाटणार नाही. तुलाही किल्ले विजयदुर्ग पाहता येईल.
हे ऐकून वेताळ अधिकच उत्सुक झाला. ‘असे म्हणतोस, तर तेथेच थांबू.. रस्ता आवडीचा असल्याने ते तेथून सुसाट निघाले. कधी वाघोटण पार केले हे त्यांनाही समजले नाही. विजयदुर्गची तटबंदी पाहताच वेताळ थबकला. ‘तूही थकला असशील. भोवळ आली तुला, तर जवळ कांदाही नाही वास द्यायला.’ वेताळाने विक्रमाला सुनावले.
वेताळापुढे नाईलाज होऊन विक्रम एका झाडाखाली थांबला. उन्हातून सावलीत पोहोचल्यामुळे क्षणार्धात त्याचे डोळे जड झाले. तो पेंगू लागला. विक्रमही कसल्याशा विचारात गढून गेला.
झोपेतच वेताळाला स्वप्नं पडलं. स्वप्नात त्यानं पाहिले. कुणीतरी समुद्रातून माशाने भरलेले जहाज घेऊन ओढत नेत होते. तर कुणी जहाजावरचे मासे काढून समुद्रात फेकत होते. काही तासांपूर्वी हेच मासे याच भागात त्यांनी पकडले होते. समुद्रातल्या माशांना पकडायचे, पुन्हा समुद्रात सोडायचे. ही धावपळ पळापळ कशासाठी? वेताळ पुटपुटायला लागला. वेताळ झोपेत बडबडतो म्हणून विक्रमाने त्याला उठविले.
उठल्या उठल्या वेताळानं विक्रमास स्वप्नं कथन केलं आणि विचारलं, ‘विक्रमा, अरे मी स्वप्नात काहीतरी वेगळेच पाहिले. समुद्रातील मासे बाहेर विकतात. हे मला माहीत होते. पण जहाजात आलेले मासे पुन्हा का बरे सोडून दिले जातात. बरं, समुद्रातून जहाजावर आणलेले मासे मृत की जिवंत आहेत याचाही कुणी विचार करत नाही. ज्यांना पाहून असे मासे समुद्रात सोडले जातात ही माणसे कोण आहेत? माशांचा पाठलाग करताना ही माणसे जहाजे का अडवतात? त्यांना नेमके काय करायचे असते? या अनेक प्रश्नांच्या भडीमाराने विक्रम त्याला शांतपणे म्हणाला, तू म्हणतोस ते खरे आहे.
वेताळ म्हणाला, ‘विक्रमा, असं म्हणतोस? कसं काय बुवा? मला जरा विस्तारानं सांग आणि हो, आणखी एक. मगाशी स्वप्न अर्धवटच राहिलं. माझी तू झोपमोड केली आहेस. माझ्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक दे. नाहीतर तुझ्या शिराची शंभर शकले होतील.’
पुढचं विक्रमाला सांगायलाही नको होतं. त्यानं वेताळाला ‘कांदेबटाटे स्टाईल’ने उचलले आणि तो चालू लागला.
‘हे पाहा वेताळा, या प्रांतात सारेच काही अजब आहे. आपण सध्या ज्या भागात चालतो आहोत. तो भाग कोकण किनारपट्टीचा आहे. हे सौंदर्य पाहून तुला येथे कुठच्याही पिंपळावर लटकावेसे वाटेल. पण तसे तू करू नकोस. कारण हे रस्त्याकडचे पिंपळ लवकरच तुटणार आहेत. तुला लटकायला आता महामार्गानजीक काही जागा मिळणार नाही.. आता तू आडवाटच पाहा बुवा.. हा सागरी मार्ग बघून ठेव हो.. येथील प्रत्येक भाग तुला आवडेल. पण थांबण्याच्या फंद्यात पडू नकोस. कारण या जमिनीला मोठा दर आहे. काही जागा अगोदरच खरेदी झाल्या आहेत. आता जमिनीचे फक्त मालक बदलण्याचे काम जोरात सुरू आहे. वेताळाने फक्त मान हलवली. त्याचा स्पर्श विक्रमाला जाणवला. त्याने एक दीर्घश्वास घेतला आणि म्हणाला, तुला हे काहीच ऐकण्यात स्वारस्य नाही हे मी जाणतो. परंतु आपण तळकोकणात पोहोचलो आहोत. हे विसरून कसे चालेल. येथील मातीलाही मोल आहे आणि झाडापेडांनाही. समुद्रातल्या माशांना आणि त्या सागरी विश्वालाही.. पण येथे सर्वात जास्त संघर्ष मालकी हक्काचा आहे. जमीन मर्यादित. आणि माणसे कमी दिसली तरी प्रत्येकाचे मत वेगळे आहे. प्रत्येकाला स्वामित्व हवे आहे. या संघर्षातून दिवाणी दावे कमालीचे वाढले आहेत.
वेताळा, तुला एक किस्सा सांगतो. आम्ही ज्या भूमीतून चालतो आहोत. याच प्रांतातील कथा. वडिलोपार्जित जमिनीवर आपला हक्क मिळावा म्हणून दोन भाऊ भांडत होते. गावातल्या जाणत्या माणसांनी दोघांचीही भूमिका समजून घेत जमिनीचे समान वाटप केले. सारी संपत्ती वाटून दिली. परंतु एक आम्रवृक्ष असा होता. तो दोघांच्याही सरहद्दीवर असल्याने मालकी कोणाची यासाठी संघर्ष झाला. सखाराम आणि आत्माराम या दोन भावांनी आपल्यालाच त्याची मालकी मिळावी म्हणून न्यायालयात धाव घेतली. दावा चालला. आत्मारामांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. काही वर्षानी सखारामही मेला. आपल्या वडिलांचा हक्क मिळावा म्हणून त्यांच्या मुलांनी ही केस चालू ठेवली. तारखांवर तारखा पडत गेल्या. तेही आता वृद्ध झाले आहेत. गेल्या पावसाळय़ात एक वीज कडाडली आणि ती आम्रवृक्षावरच कोसळली. पुरा वृक्ष जळून गेला. उभा चिरला गेला. वृक्ष मरून गेला. मात्र दोन भावांमध्ये धुसपूस पिढय़ान् पिढय़ा चालू राहिली.
येथील मच्छीमार बांधवही असाच आहे. कालपर्यंत तो आपल्या भागापुरताच मर्यादित होता. पण मासे काही एका जागेवर थांबत नाहीत आणि कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी किती आणि कशी होते याची उदाहरणे मी तुला द्यायला नकोत. मुक्या बिचा-या माशांना कोण, कशा पद्धतीने ओढेल हे सांगता येत नाही. त्यांना मृत्यूतच परमार्थ वाटतो. खवय्येगिरीसाठीच आपले जीवन आहे, अशी त्यांनी खूणगाठ बांधली आहे.
पारंपरिक मच्छीमारांबरोबरच मोठी जहाजे घेऊन मोठय़ा जाळय़ांनी मच्छीमारी करणारी मंडळी वाढली आहेत. त्यातच दुस-या राज्यातील मंडळी आपलेच सारं काही आहे अशा पद्धतीने या भागात येऊन मच्छीची लूट करत आहेत. तुझ्या घरात घुसून तुझ्यासाठी शिजवलेले अन्न जर मी तुला न सांगता खाल्ले तर तुला कसे वाटेल? तुझ्या घरातील साहित्यावर कुणीही येऊन हक्क गाजवू लागला तर तू त्याला काय करशील? मग, कायद्याची भाषा क्रोधापुढे कमीच ठरते.
कोणी त्याला पकडले आणि त्यांच्या जहाजात कायदाभंग करून पकडलेले मासे आढळले तर माशाचा पाचपट दंड केला जातो शिवाय ज्या बोटीने ही मच्छीमारी केली ती बोटही जप्त केली जाते. हा कायदा आहे. या नियमांचे पालन करण्यासाठी काही मंडळींची नियुक्ती करण्यात आली आहे. ही मंडळी किना-यावर बसून झोपा काढायचे म्हणून येथील मच्छीमारांनी खोल समुद्रात जात अशी मच्छीमारी करणा-यांना ताब्यात घेतले. तुला माहीत आहे वेताळा, चाचेगिरी हा शब्द अरबी समुद्राला नवा नाही. येथे चाचेगिरीचा मोठा इतिहास आहे. मराठय़ांच्या आरमारापासून कानोजी आंग्रेंपर्यंत समुद्रसत्तेतला संघर्ष पेटलेलाच आहे. अलीकडे त्याची धग किना-यापर्यंत येत नाही एवढेच!
चोरटे कमी झालेले नाहीत. परंतु ज्यांची चोरी पकडली जाते. ते मच्छीमार आपली सारी मच्छी समुद्रात ओतून तुलाही नाही, मलाही नाही.. असा कावा साधत आहेत. हेच तू स्वप्नात बघितले. तू या प्रकाराने भांबाऊन जाऊ नकोस. हे कोकण आहे. येथे संघर्ष पाचवीलाच पूजला गेला आहे.
सीमावाद आपल्याही राज्यात आहे. मग हे तर महाराष्ट्र! बेळगावचा सीमाप्रश्न जसा धगधगतो आहे. तसाच समुद्रातलाही हद्दीचा प्रश्न पेटला आहे. कर्नाटक, महाराष्ट्राचे मच्छीमार समोरासमोर आले आहेत. कधीही तुंबळ युद्ध होऊ शकते. युद्ध झाल्यास हानी किती होईल? कोणाची होईल सांगणे कठीण आहे. तू म्हणशील हा प्रश्न सोपा आहे. सहज सुटेल. पण ते शक्य नाही. जोपर्यंत स्वार्थीवृत्तीला आपण तिलांजली देत नाही. तोपर्यंत समुद्रातला संघर्ष अटळ आहे.
अटळ आहे मनामनातील द्वंद्व. कायदा कुणी पाळायचा तू की मी? पारंपरिक आणि पर्सिनेट असा संघर्ष गेल्या कित्येक वर्षापासून या प्रांतात चालू आहे. यातच गोवा, कर्नाटक, गुजरात राज्यातील मच्छीमार कोकण प्रांतात भरपूर मासे मिळतील म्हणून येथे रात्रीच्या प्रहरी घुसत असतात. ही घुसखोरी कशी रोखायची. कोणाकोणाबरोबर लढायचे. आपल्या भागातील ट्रॉलर्स धारकांविरुद्ध की परप्रांतियांविरुद्ध?
त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यापेक्षा त्यांचा हा वाद असाच चिघळत राहायला हवा. म्हणजे आपली भाकरी भाजून घेऊ शकतो, असे म्हणणा-या अनेक स्वयंघोषित नेत्यांमध्येही वाढ झाली आहे. समुद्र ही एक या भागाला लाभलेली देणगी आहे. यातले मासे व अन्य संपत्तीचा खजिना पाहून ही भूमी सर्वांगसुंदर वाटते. परंतु येथील माणसांमध्ये संघर्ष अधिक वाढायला हवा. कोणीही स्वस्थ बसू नये. असा शाप असल्याचे तूच मला सांगितले होतेस. पाणवठा पाहून विक्रम चालायचा थांबला. तसं वेताळानं त्याला विचारलं, हे पाणी शापित तर नाही ना. बघ बाबा.. पाणी पिऊन विक्रमानं वेताळाला पुन्हा पाठीवर घेतलं. तो सांगू लागला, ‘वेताळा, बघ हे कोकण. किती बदलले आहे ते. येथे आता नवनवीन चेहरे दिसू लागतील. येथील जमिनीलाही सोन्याचा भाव आहे. ही एकच बाजू पाहिलीस तू. दुसरी बाजू पाहिलीसंच कुठे? शिवाय, दुस-या बाजूच्याही आणखी दोन बाजू आहेत. त्यांची नजर सोन्याहूनही किंमत असणा-या जमिनींवर आहे. काहींकडे किती घरे आहेत, त्यांनाही माहीत नाही. तरीही त्यांना निवारा हवाय. तुला वाटेल हा संघर्ष संपविता येणे शक्य आहे. येथे समृद्धी भरभरून वाढेल. पण हा तुझा गैरसमज आहे. सुंभ जळला तरी पिळ जाणार नाही. हा माणसांमधील नाही तर या भूमीचाच दोष आहे. तुझ्या वाचेला किंमत आहे. पण ते आपली वाचा कधीही बदलतात. त्यांच्या शब्दांनाचआता मोल उरलेला नाही.
वेताळा, त्यादिवशी मी मालवण भागात गेलो होतो. तेथे हिवाळे-पोईप भागात एक फोटोग्राफर आहे. म्हणजे छायाचित्रकार बरं कां!
झोपडीवजा घर. घराची पडवी सारवलेली. खास कोकणी पद्धतीची. सिमेंटचे दागिने चढवलेल्या चि-यांच्या भिंती. त्यातल्या एका भिंतीपाशी फळकूट टाकून बाकडं तयार केलेलं. मागच्या बाजूचे चिरे दिसू नयेत म्हणून कधी पलंगावरील वस्त्र किंवा एखादी साडी सोडलेली. तेवढीच शोभा आपली! वर १०० वॅटचा बल्ब. असा छायाचित्रकार आणि असा स्टुडिओ तू कुठं पाहिला आहेस कधी? बरं या फोटोग्राफरचं कमाईचं एवढंच साधनं. ना शेतीसाठी जमीन. ना मुंबापुरीस कुणी चाकरीला. आई अलीकडेच गेली. बाबाही आता पार थकलेले. घरात बायको. धुणीभांडी करणारी आणि लहान मूल घरात. वेताळा, मला सांग अशी परिस्थिती असणारा माणूस कायम भरल्यापोटी ढेकर देऊन झोपत असेल? त्याला कुणी सांगण्याची गरज ती काय ‘क्रयशक्ती’ कमी कर म्हणून?
एव्हाना, ही जोडगोळी मुख्य मार्गाला लागली होती. किती वेगाने राजा चालत होतो. न जाणो.. एवढय़ात महामार्गावरून कुणीतरी उलट चालीने निघालेले दोघांनीही पाहिले. न राहवून वेताळाने विक्रमास विचारले, ‘विक्रमा, ही भुते कुठे निघालीत?’ विक्रम म्हणाला, ‘ती भुते नाहीत. माणसेच आहेत. ती मागे नाही तर त्यांच्या दृष्टीने पुढे जात आहेत. काहीबाही जनजागृती करण्यासाठी ते संपूर्ण साम्राज्यात भ्रमणाकरता घरदार सोडून बाहेर पडलीत. असे शेकडो कोस त्यांनी मागे टाकलेत.’
वेताळ अचंबित झाला. मनातल्या मनात म्हणाला, ‘काय माणसे आहेत की चेटके? मी भुतांचा राजा असूनही आणि मुळातच उलटा चालत असूनही असा नाय चालू शकत, बुवा.’
विक्रम सांगत होता, ‘सांग, वेताळा, अशांसाठी या साम्राज्यात काय स्थान असेल? फक्त ध्येयवेडे. एवढंच! या मानापुढं त्यांना फार काही मिळतही नाही. ‘महादरबारा’ वेळी दारात ‘रथ’ जात नाही म्हणून अडून बसणा-या ‘मानक-यां’ना अशा उलटय़ा चालीमागचं ‘वेड’ समजेल, अशी अपेक्षा कशी धरावी?’
वेताळ ऐकत होता. विक्रम सांगत सांगत चालत होता. एके ठिकाणी काहीतरी वाटप सुरू असताना त्यांना दिसलं आणि ते थबकले. येथे कुणीएक बहुरूपी तेथे येऊन गरीब मुलांना कपडे वाटत होता. ‘दरबारी’, ‘कारभारी’, ‘रक्षक’, ‘सेवक’, ‘गुरुजन’, ‘सारथी’ अशी एक ना अनेक रूपे धारण करून दुस-यांचं मनोरंजन करत दारोदार फिरणारा तो बहुरूपी आपल्या वर्षभरातील कमाईच्या तीन चतुर्थाश (७५ टक्के) मिळकत अशा कार्यासाठी खर्च करत होता.
विक्रम बोलता झाला, ‘सांग, वेताळा.. आपल्या ताटातील घासही देण्यासाठी मागेपुढे न पाहणारी या भागात माणसे आहेत, हे खरे आहे. पक्की बिलंदर असलेली ही माणसे वाढत आहेत. हेही खरे आहे. तुझ्या नशिबाने तुझी गाठ कोणाशी पडते यावर तुझे कोकणातले दिवस आनंदी ठरतात. व्यक्ती तितक्या प्रकृती येथेही आहेत. आता आपण ज्या मार्गाने चालतो आहोत. तो डोळे भरून पाहून घे. कारण पुढच्या आपल्या भ्रमंतीत हा महामार्ग असाच राहील असे सांगता येणे अवघड आहे. तो आता अधिक रुंद होणार आहे.
वेताळ सुन्न झाला. त्यानं विक्रमास थांबवलं. विक्रमानं वाटभर त्याला बरंच काही काही सांगितलं होतं. त्यानं विक्रमाला विचारलं, ‘असो. पण, हे सारं खरं आहे, तर माझ्या प्रश्नाचं उत्तर तू अजून दिलं नाहीस.’
यावर विक्रम म्हणाला, ‘वेताळा, केवळ माशाचाच प्रश्न आहे, असे नाही. तरीही, सामान्यांसाठी हे सारेच प्रश्न गहन आहेत आणि ते त्यांनाच सोडवावे लागतील. माशांसह विविध समस्या या जनतेलाच सोडवाव्या लागतील. त्याची जाण ‘दरबारक-यां’ना येईलच, असे नाही.
विक्रमाच्या उत्तरावर वेताळानं मान डोलावली आणि विचारात पडला. तंद्रीतच त्यानं विचारलं, ‘आणखी एक. दुपारी तू जैतापुरात थांबायचं नाही, असं का म्हणाला होतास?’
विक्रम दीर्घ नि:श्वास सोडत म्हणाला, ‘वेताळा, तेथे अणुऊर्जा प्रकल्प नामक अध्याय लिहिला जात आहे. मी एवढंच तुला सांगेन. कारण, जास्त काही बोललो, तर ते माझं मत होईल आणि ते तुला पटेलच असं नाही. कदाचित, माझ्या शिराची शंभर शकलंही होतील.’
वेताळ फक्त हसला आणि विक्रमाच्या खांद्यावरून निसटला. तो पुन्हा पिंपळावर उलटा लटकू लागला. विक्रमाने डोक्यावर हात मारला. आणि पुन्हा खांद्यावर घेण्यासाठी निघाला.
खूपच छान लेख आहे …..