मुंबईत नालेसफाईच्या कामाला १ एप्रिलपासून सुरुवात होते. परंतु एप्रिलची आठ तारीख उजाडली तरी नालेसफाईच्या कामांचा पत्ता नाही.
मुंबई- मुंबईत नालेसफाईच्या कामाला १ एप्रिलपासून सुरुवात होते. परंतु एप्रिलची आठ तारीख उजाडली तरी नालेसफाईच्या कामांचा पत्ता नाही.
नालेसफाईसाठी कंत्राटदार निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा दावा प्रशासन करत असले तरी स्थायी समितीपुढे हे प्रस्ताव येवून प्रत्यक्षात सफाईच्या कामाला एप्रिलचा शेवटचा आठवडा उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नालेसफाईच्या कामाकडे प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष गंभीर नसून पावसाळयाच्या तोंडावर हे काम हाती घेऊन पावसाच्या पाण्यातच नाले साफ झाल्यावर ही कामे दिली जाणार का? अशी चर्चा रंगली आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळापूर्व, पावसाळयात आणि पावसाळयानंतर नालेसफाईचे काम करण्यासाठी कंत्राटदारांची निवड केली जाते. गेल्या वर्षी दोन वर्षासाठी कंत्राटदारांची निवड केली होती. त्यावेळी दोन वर्षासाठी १६० कोटी आणि मिठी नदीसाठी वेगळे कंत्राट दिले होते. परंतु यावेळी पुन्हा दोन वर्षासाठी नालेसफाईच्या कंत्राटासाठी निविदा मागवल्या. पण प्रत्यक्षात एप्रिल उजाडून आठ दिवस झाल्यानंतरही या नालेसफाईच्या कामाचा पत्ता नाही.
दरवर्षी १ एप्रिलला अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ातच नालेसफाईच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते. त्यासाठी मार्चमध्येच नालेसफाईच्या कामाचे प्रस्ताव स्थायी समितीपुढे आणले जातात. पण आतापर्यंत हे प्रस्तावही न आल्यामुळे प्रत्यक्षात हे प्रस्ताव येणार कधी, मंजूर होणार कधी, कार्यादेश दिला जाणार कधी आणि प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होणार कधी असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.
यंदा नालेसफाईचे काम एप्रिलच्या शेवटच्या नाहीतर मेच्या पहिल्या आठवडय़ातच काम सुरू होण्याची शक्यता आहे. नालेसफाईचे काम केल्यांनतर तो गाळ बाहेर काढून सुकवल्यानतर डम्पिंग ग्राऊंडवर नेला जातो. परंतु काढलेला गाळ सुकविण्यास अवधी कमी असल्यामुळे पावसाच्या तोंडावर होणारी ही सफाई कंत्राटदारांच्या फायद्याची मानली जात आहे.
पहिल्या पावसात नाल्यातील गाळ पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जातो. त्यामुळे नाल्यांची सफाई झाल्याचा दावा करायला कंत्राटदार मोकळे होतात. नालेसफाईच्या कामात यंदाही ३० ते ४१ टक्के कमी बोली लावून कंत्राटदारांनी सफाईची कंत्राटे मिळवली आहे. त्यामुळे हे कंत्राटदार कशाप्रकारे काम करणार हा प्रश्न असून त्यांच्यावर देखरेखीसाठी तज्ज्ञांची समितीही नाही.
पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता आणि अभियांत्रिकी संचालक लक्ष्मण व्हटकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी नालेसफाईच्या कामासाठी निविदा पूर्ण होऊन प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यासाठी महापालिका चिटणीस विभागाला पाठवले आहे.
यंदा मिठीनदीसह नालेसफाईच्या कामासाठी सुमारे १८० कोटींचे कंत्राट दोन वर्षासाठी दिले आहे. या निविदेत गाळ वाहून नेऊन त्याची विल्हेवाट लावण्याची अट घातली आहे. त्यामुळे गाळाची विल्हेवाट कंत्राटदारांकडूनच लावली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बृहनमुंबई महानगरपालिका यांनी कित्येक गल्लीबोळ्यात छोटीमोठी साफसफाई करण्यास नगरसेवकांकडूनi कंत्राट दार नेमले, पण कधीच आपल्या विभागात येणाऱ्या वस्ती,गल्ली यांची पहाणीसुद्धा नगरसेवक,गटप्रमुख किंवा शाखाप्रमुखा मार्फत करण्यात आली नाही. आपल्या विभागातील गटारे, नाले रोजच्यारोज साफ करावे लागतील म्हणून तेथील कंत्राटदाराने गल्लीत गटारे,विभागातील नाले पूर्णपणे बंद करून ठेवले. पावसाळ्यात सर्वसामान्य जनतेने पाहिलेच असेलकि रस्त्याच्या कडेला असलेली गटारे पूर्णपणे झाकलेली असतात, एखादा चेंबर खुला असायचा तोही कचरा,मातीच्या ढिगाऱ्याने पूर्णपणे भरलेला आहे. त्यामुळे पाणी जाण्यास कुठेच वाव राहत नाही, त्यामुळे रस्त्यावरील पाणी रस्त्यावरच साचले जाते आणि चांगल्या रस्त्यावरही खड्डे निर्माण होतात. ज्या कंत्राट दारास साफसफाईचे काम दिले जाते,तोच आपले काम हलके होण्याकरिता हि गटारे जेवढ्याप्रमाणात बंद ठेवण्यात येतील या प्रयत्नात असतात. “हमारा कम्प्लेन्ट करोगे तो बहुत मारेगा, हमारी पोलिसचौकीमे बडी पहेचान है, ये नगरसेवक और आमदार हमसे डरते है.” अशा धमक्या तेथील स्थानिक रहिवाश्यांस देतात. उलट एखाद दुसरा सफाई कामगार ठेवून फक्त रस्त्यावरील छोटीमोठी साफसफाई अर्धा तास करून घेतात आणि तब्बल ६ ते ७ कर्मचाऱ्यांचे पगार खाउन मोकळे होतात. रस्त्यावरील गटारे पूर्णपणे बंद केल्याने पाणी सर्व रस्त्यावर साचले जाते त्यामुळे नागरिक आणि रहदारी पूर्णपणे त्रस्त होतात. पालिका जर कंत्राटदारांस कामाचे पैसे देते तर ते पूर्ण करून घ्यायचे काम तेथील नगरसेवक यांचे आहे. नाहीतरी वर्षाला नगरसेवकास साधारण रु.१ कोटी इतका खर्च विभाग सुधारण्याकरिता देतेसच. मग पालिका त्यांच्याकडून कधी वार्षिक ताळेबंद मागवते कि नाही. कारण फक्त वृत्तपत्रातून पालिकेकडून इतका खर्चकरून सर्वकामे करण्यात आली असे छापण्यात येते. परंतु प्रत्यक्षात तीळमात्रही काम झालेले नसते. याची चौकशी पालिका अधिकारी कधी करणार?ऐन पावसाळ्यात रस्त्याचे खड्डे बुजवण्यापेक्षा रस्त्याच्या कडेस असणाऱ्या गटारे नाल्यांची सफाई पावसाळ्यापूर्वी करण्यात आली पाहिजे किंवा ज्या कंत्राटदारांस जो विभाग दिला आहे त्याचे पैसे दिले आहेत त्यांच्याकडून करून घेण्यात आली पाहिजे.