२६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब याला बुधवारी पुण्याच्या येरवडा कारागृहामध्ये फाशी देण्यात आली.
मुंबई- २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी मोहम्मद अजमल कसाब याला बुधवारी सकाळी साडेसात वाजता पुण्याच्या येरवडा कारागृहामध्ये फाशी देण्यात आली. फाशीनंतर काहीच वेळाने राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मुंबईत आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्लीत याबाबतची माहिती पत्रकारांना दिली.
संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया रीतसर पार पाडूनच कसाबला फाशी दिल्याचे पाटील यांनी सांगितले. तर मृत कसाबचे येरवडा तुरुंगातच दफनही करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. २६/११ हल्ल्याला चार दिवसांनी चार वर्षे पूर्ण होत आहेत. अशा स्थितीत आलेल्या या वृत्तामुळे मुंबईसह देशभरात जल्लोष आणि समाधान व्यक्त करण्यात आले. कसाबला विशेष न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीची अंमलबजावणी वेळेत झाल्याने न्याय मिळाल्याची भावना देशभरातून व्यक्त होत आहे. चार वर्षापूर्वी झालेल्या या भीषण हल्ल्यात १६६ जण ठार आणि तीनशेवर जखमी झाले होते.
कसाबबाबत समाजात असलेली तीव्र भावना लक्षात घेऊन, तसेच कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून ही सर्व कारवाई कमालीच्या गुप्ततेने पार पाडण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ५ नोव्हेंबरला कसाबचा दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर १८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री कसाबला मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून येरवडा तुरुंगात हलवण्यात आले. फाशीची वेळ कसाब तसेच पाकिस्तानला आधीच कळवण्यात आली होती. कसाबने मरण्यापूर्वी कोणतीही इच्छा व्यक्त केली नव्हती, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तुरुंग अधिका-यांनी कसाबला १२ तारखेला फाशीचे वॉरंट वाचून दाखवले होते. त्यानंतर त्याला त्याच्यावर सही करायला सांगण्यात आले. कसाबने सही केली आणि शेवटची इच्छा म्हणून आपल्या आईला याबाबत माहिती देण्यास सांगितले. त्यानुसार परराष्ट्र खात्यामार्फत पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांना कळवण्यात आले. तेथून कसाबच्या घरी कुरियरने पत्र पाठवून ही बातमी देण्यात आली, अशी माहिती तुरुंग अधिका-यांनी दिली.
पाकिस्तानची सावध प्रतिक्रिया
कसाबला फाशी दिल्यानंतर पाकिस्तानने सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो आणि त्याच्या उच्चाटनासाठी इतर देशांशी सहकार्य करायला तयार असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ता मोअझ्झम खान यांनी सांगितले. मात्र, त्यापूर्वी सकाळी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार कसाबला फाशी देण्यात येणार असल्याचे पाकिस्तानला आधीच कळवलेले होते. पण कसाब पाकिस्तानी नागरिक असल्याचे मान्य करण्यासच नकार देणा-या पाकिस्तानने ते पत्रही स्वीकारले नाही. त्यामुळे ते फॅक्स करण्यात आले असेही शिंदे यांनी सांगितले होते. मोअझ्झम खान यांनी मात्र त्याचे खंडन केले. आदल्या दिवशी आम्हाला यासंबंधी पत्र मिळाले असून आम्ही ते स्वीकारले आणि त्याची पोचपावती दिली असे ते म्हणाले. दरम्यान, कसाबचा मृतदेह परत मिळावा यासाठी त्याच्या कुटुंबीयांकडून कोणतीही विनंती करण्यात आली नाही, असे पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी सांगितले. अशी काही मागणी झाल्यास पाकिस्तानी कायद्यानुसार ती हाताळली जाईल असेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे मंगळवारीच भारताने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये मृत्युदंडाला विरोध करण्यास नकार दिला होता. समाजाला हादरवून सोडणा-या, अत्यंत अपवादात्मक गुन्ह्यांसाठीच भारतात फाशीची शिक्षा सुनावली जाते, असा युक्तिवाद भारतातर्फे करण्यात आला.
निर्णय दोन महिन्यांपूर्वीच
सर्वोच्च न्यायालयाने २९ ऑगस्टला कसाबच्या फाशीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर राज्य सरकारने ९ सप्टेंबरला प्रक्रिया सुरू केली, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. त्यानंतर ११ सप्टेंबरला अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांबरोबर सल्लामसलत करून फाशीचे ठिकाण आणि वेळ ठरवण्यात आली. या संपूर्ण मोहिमेला ‘ऑपरेशन एक्स’ असे नाव देण्यात आले होते.
कमालीची गुप्तता
कसाबला येरवडय़ाला हलवताना कमालीची गुप्तता पाळण्यात आली. दोन्ही तुरुंगातील काही काही मोजके अधिकारी वगळता, इतर कोणालाही याबद्दल माहिती देण्यात आली नव्हती. आर्थर रोड तुरुंगात त्याच्यावर पहारा करणा-या इंडो-तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांनाही कसाब त्यांच्या सेलमध्ये नसल्याचे माहिती नव्हते. तीन दिवस आयटीबीपीचे २०० जवान रिकाम्या सेलवरच पहारा देत होते.
सुरक्षेच्या खर्चाचा मुद्दा कायम
कसाबच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या आयटीबीपीचा खर्च कोणी करायचा याचा निर्णय अद्यापही झालेला नाही. मात्र हा हल्ला फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रावर झालेला नसून संपूर्ण देशावर झालेला होता, त्यामुळे हा खर्च केंद्र सरकारनेच करावा, असे गृहमंत्र्यांनी बुधवारी पुन्हा सांगितले.
ऑपरेशन एक्स
बुधवारचा दिवस सुरू झाला तोच २६/११ हल्ल्यात जिवंत हाती लागलेल्या अजमल आमीर कसाबला पुण्यातील येरवडा तुरुंगात हलवल्याच्या बातमीने. बातमी अधिकृत की अनधिकृत हे सांगायला कुणीच तयार नव्हते. एकूणच कमालीची गुप्तता पाळण्यात येत होती. राज्यात नागपूर आणि पुण्यातच फाशी देण्याची व्यवस्था असल्याने कसाबला फाशीसाठीच हलवले का, यावर चर्चा सुरू झाल्या. खटल्यात सरकारची बाजू मांडणारे अॅड. उज्ज्वल निकम यांना माध्यमांनी हेरले आणि घेरलेही.. फाशी देण्यासाठीच कसाबला हलवले असावे, त्याला २६ तारखेपूर्वी फाशी दिली जाईलही, असे अंदाज येत असतानाच कसाबला फाशी दिल्याची अधिकृत बातमीच आली. कसाबच्या फाशीची तारीख, वेळ आणि ठिकाण अत्यंत गुप्त राखण्यात सरकारी यंत्रणा यशस्वी ठरल्या. ‘ऑपरेशन एक्स’बाबत कुणालाही काहीही समजले नव्हते..
कसाबच्या फाशीसाठी आखलेली गुप्त मोहीम म्हणजेच ‘ऑपरेशन एक्स’.
५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतींनी कसाबचा दयेचा अर्ज फेटाळताच ऑपरेशन सुरू झाले.
विशेष पोलिस महासंचालक देवेन भारती यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी होती. तर सदानंद दाते, मीरा बोरवणकर, हिमांशू रॉय आदी १७ अधिका-यांनाच याबाबत माहिती होती.
ऑपरेशन सुरू झाल्यानंतर भारतींशिवाय अन्य सर्व अधिका-यांचे मोबाइल फोन पूर्णत: बंद होते. फक्त भारतीच वरिष्ठ पातळीवर संपर्क ठेवत होते.
७ नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी फाशीच्या फाइलवर स्वाक्षरी केली.
८ नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहखात्यामार्फत याबाबत कळवण्यात आले आणि त्याच दिवशी २१ नोव्हेंबर ही तारीख निश्चितही करण्यात आली.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात कसाबला डेंग्यू झाल्याचे सांगून त्याची जे. जे. रुग्णालयात तपासणी करण्यात आली. प्रत्यक्षात तो फाशीसाठी शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी ती वैद्यकीय तपासणी होती.
१९ नोव्हेंबर रोजी कसाबला अत्यंत गुप्तपणे पुण्याच्या येरवडा तुरुंगात हलवण्यात आले. अगदी आर्थर रोड तुरुंगात पहारा देणा-या २०० इंडो-तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांनाही त्याची माहिती नव्हती.
येरवडय़ातील कैदी कसाबला ओळखणार नाहीत याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली.
येरवडय़ात कसाबला ठेवलेल्या सेलची अतिशय बारकाईने झडती घेण्यात आली.
२० नोव्हेंबरला वरिष्ठ पोलिस अधिका-यांची बैठक घेऊन कायदा व सुरक्षेबाबत सावधगिरीचे आदेश देण्यात आले.
बुधवारी सकाळी ७.३० वाजता कसाबला फाशी दिल्यानंतर भारती यांनी ‘ऑपरेशन एक्स यशस्वी’ असा संदेश संबंधित उच्चपदस्थ अधिका-यांना पाठवला.
येरवडय़ातच कसाबच्या मृतदेहाचे दफन करण्यात आले. त्यासाठी दोन दिवसांपूर्वीच कबर खोदून ठेवण्यात आली होती. मात्र कबरीची नेमकी जागा केवळ दोन अधिका-यांनाच माहिती होती.
फाशीदरम्यान कसाब निर्विकार…
क्रूरकर्मा मोहम्मद अजमल आमीर कसाबला फासावर लटकवण्यापूर्वी येरवडा कारागृहातील तुरुंग अधिका-यानी अंतिम इच्छा विचारली. तेव्हा त्याने आपली काहीही इच्छा नसल्याचे सांगितले.
कसाबच्या फाशीच्यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, फासावर जाण्याच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कसाबच्या चेह-यावर तणाव दिसत होता.
त्याचे डोळे स्थिर होते. एकदाही त्याने डोळयांची उघडझाप केली नाही. त्याचा संपूर्ण चेहरा निर्विकार होता. तेथे उपस्थित असलेल्या एकाही तुरुंग कर्मचारी, अधिका-यांशी तो एक शब्दही बोलला नाही.
[EPSB]
कसे होते ‘ऑपरेशन एक्स’? »
कसाबच्या फाशीसाठी प्रशासनाने ‘ऑपरेशन एक्स’ अंमलात आणले. अत्यंत गुप्तपणे पार पडलेल्या या ऑपरेशनमुळे कसाबला दफन करेपर्यंत प्रसारमाध्यमांसह जनतेलाही याची खबर नव्हती.
येरवडयातच कसाबचे दफन
‘ऑपरेशन एक्स’ या अत्यंत गुप्त मोहिमेतंर्गत मोहोम्मद अजमल आमीर कसाबला फासावर लटकवण्यात आल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे येरवडा कारागृहाच्या आवारातच दफन करण्यात आले.
[/EPSB]
ह्या क्रूरकर्माचे दफन करण्यापेक्षा त्याचे शव दूर समुद्रात सोडण्यात यावे. नाहीतर जसे शिवाजी महाराजांनी, हिंदवी स्वराज्यावर, शिवाजी महाराजांच्या जीवावर उठलेल्या अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्यावर, त्याचा शवाचे प्रतापगडच्या पायथ्याशी दफन केले आणी आज आपल्या राजकर्त्यांनी त्याचा एखाद्या सुफी संतांप्रमाणे आपल्या मन्नती पुर्ण करणारा पीरसाहेब, बाबा च्या दर्ग्यासारखा मोठा दर्गा केला आणी त्याचे दरवर्षी ऊरूस सुध्दा भरतात, तसे कॄपया होऊ नये एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आज है दिवाळी….
आज कसाबला फाशी दिल्यानंतर पुन्हा एकदा दिवाळी साजरी करावीशी वाटते..
पण आम्हा महाराष्ट्रीयांना सुतक आहे…
कसाबला फाशी दिली याबद्दल सरकारचे अभिनंदन… आज खरी दिवाळी…