एक माणूस म्हणून आपण समाजाचा एक अविभाज्य घटक असतो. वाढती स्पर्धा, वाढती महागाई, धार्मिक कटुता अशा सर्व भोवतालच्या बदलांना, आव्हानांना तोंड देत आपण जगत असतो.
एक माणूस म्हणून आपण समाजाचा एक अविभाज्य घटक असतो. वाढती स्पर्धा, वाढती महागाई, धार्मिक कटुता अशा सर्व भोवतालच्या बदलांना, आव्हानांना तोंड देत आपण जगत असतो. याचा सामना करता यावा याकरिता आपल्या प्रेमाची माणसे बळ देतात. आपला निश्चय आणि प्रयत्न याचे बळ त्या माणसांमुळे वाढते.
ही माणसे आपलं नातं टिकलं तर आपली असतात. नात्यांची गरज ही दोन्ही बाजूने असते. एका बाजूने अपेक्षा आणि दुसरीकडून फक्त त्याग वा अपेक्षापूर्ती असं फार काळ चालत नाही. ते शोषण. शोषण बंड करायला प्रवृत्त करतं. बंडाचा शेवट हा समाधानात असतो असे नाही. ते बंड हिंसेशिवाय होते असेही नाही. बंडापेक्षा प्रेमानं माणसं जपणं त्यामानानं मला तरी सोपं वाटतं.
समोरच्याचं ऐकून घेणं, त्याच्याशी संवाद साधणं ही सवय सर्वानी लावायला हवी. लहान मुलांपासून घरातल्या वृद्ध माणसांनाही हे सर्व पाळायला हवे. संवाद असेल तर उत्साह आणि उन्माद यातील फरकही कळेल. संवाद असेल तर समोरच्याची वेदना समजून घेता येईल. प्रेम हवं आहे हे मान्य करून त्या प्रेमाविषयी काही महत्त्वाचे मुद्दे कोणते ते पाहू.
प्रेम
प्रेमाची वाट बघत ताटकळत असणारी माणसं आजही दिसतात, असं लिहिलं होतं. त्यावर अनेक वाचकांनी आता प्रेमाची वाट बघायला लोकांकडे फार वेळ नाही, असं ई-मेलमधून सुचवलं होतं. त्यात तथ्य आहेच. सगळं जसं झटपट होतं, तसंच प्रेमही झटपट झालं तर हवं आहे, असं मानणारी तरुणाई जास्त आहे, हे मला मान्य आहे.
रोमियो-ज्युलिएट, हीर-रांझा असं अजरामर झालेलं, एकमेकांसाठी जीवाची किंमत मोजणारं प्रेम आम्हाला आदर्श वाटतं. आम्ही त्याचे गोडवे गातो. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडच्या जमान्यातले आम्ही तसं प्रेम करणार नाही, तसं जगणं आम्हाला मान्य नाही. प्रेमात उगाच जीव द्यायचा कशाला? वा कुणाचा जीवही घ्यायचा का? याचं उत्तर नाही असंच आहे. प्रेम जगायला शिकवतं, प्रेम जगणं सुंदर करतं, हेच मनात ठेवू या.
पिढी बदलली की प्रेमात बदल होतो का, या प्रश्नाचं उत्तर अनेक जण ‘हो’ असं देतात. त्यावेळी त्यांना प्रेम व्यक्त करणं आणि प्रेम यशस्वी झालं, असं मानणं या दोन्ही गोष्टीत बदल झाला आहे, असं म्हणायचं असतं. मॉर्निग वॉकला जाणारी, बागेत निवांत बसून गप्पा मारणारी सत्तर-पंच्याहत्तर वर्षाची पिढी आणि आजची पंधरा सोळा वर्षाची पिढी यात प्रेम व्यक्त करणं, त्याकडे बघणं यात खूप बदल झाला आहे.
वाट बघणं, त्या व्यक्तीबरोबर जन्म काढणं हे गृहीत धरलेलं होतं. प्रेम व्यक्त करणं जमलं नाही, प्रेमाची पूर्तता विवाहात झाली नाही तर एकटं राहणं हे मान्य होतं. त्या असफल प्रेमाविषयी फार काही बोलणं हे सुद्धा समाजमान्य नव्हतं. असफल प्रेमाचा आदर करणं आता हास्यास्पद. दोन पिढयांपूर्वी या प्रेमात असणारा कालावधी मोठा होता.
एकनिष्ठता, दुस-या व्यक्तीचा विचार आणि तिच्याविषयी कळकळ जास्त काळ टिकणारी होती. कुढत आणि दु:खात जीवन जगता येत नाही, हे स्पष्टच आहे; पण प्रेमाने हिंसेचा मार्ग घ्यायची गरज असते का? बहुसंख्य लोक तो मार्ग घेत नाहीत.
नाते कसे टिकवता येते?
आज जोडीदारांमध्ये प्रेम असते तशी स्पर्धासुद्धा असते. ही तुलना वा स्पर्धा कधी मत्सरात बदलू शकते, ते कुणाच्याही हिताचे नाही. जोडीदारावर विश्वास ठेवणं अवघड वाटतं. प्रेमामध्ये मत्सर आड आला नाही तर प्रेम वाढतं. विश्वासामुळे नाती घट्ट होतात. ते आपण विसरायला नको. ही सर्व जबाबदारी कायम फक्त एकाचीच असते असं नाही.
नात्यात असलेल्या दोन्ही बाजूंची ती जबाबदारी असते. स्त्री आणि पुरुष दोघेही याकरिता समान जबाबदार असतात. कोणत्याही एका व्यक्तीकडून जास्त आणि विषम जबाबदारीची अपेक्षा आली की ते ओझं होतं, हे लक्षात ठेवायला हवं.
आपल्या आवडत्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा जास्त असतात. आवडत्या व्यक्तीवर अनेकदा राग निघतो. प्रेमाच्या माणसांना उद्धटपणे बोलणे, त्यांच्यावर आरडाओरडा वा अवास्तव अपेक्षा करणे हे पूर्ण टाळता आलं नाही तरी त्याचं प्रमाण कमीत कमी राहील, असं पाहा. आपल्या माणसाला नेहमी गृहीत धरणं हेसुद्धा कमीत कमी करावं अशा यादीत आहे.
थोडा विचार, थोडा प्रयत्न केला तर आपल्या व्यक्तीला समाधानी ठेवण्याकरिता कोणत्या गोष्टी टाळाव्या, कोणत्या स्वीकाराव्या हे नक्कीच कळतं. प्रेमाकरिता तेच आवश्यक आहे.
प्रेम असफल झाले तर काय करायचे?
घटस्फोट झाला म्हणजे लग्न असफल झालं असं म्हणता येईल. पण दोघांपैकी एकाचे तरी प्रेम असफल झाले असे म्हणता येणार नाही. लग्नसंस्था आणि प्रेम या दोन्ही गोष्टी प्रेम व्यक्त करण्याकरिता एकत्र येतात. पण त्या मुळात प्रेमाचा एक भाग आहेत हे सुद्धा लक्षात असावेच.
काही वेळा प्रेम असफल होतं. त्यामुळे प्रेमाविषयी कटुता येते. पुन्हा अपयश आले तर या विचाराने प्रेम करायची भीती वाटू लागते. याचा अर्थ पुन्हा प्रेम करायचं नाही, असा होत नाही. घटस्फोट झाला वा जोडीदाराचे निधन झाले की आलेला एकटेपणा म्हणजे असफल प्रेम नाही.
प्रेम असफल होणं हे अतिशय वेदनादायी असतं. त्यानं माणसं मोडतात, निराश होतात. अशावेळी ‘तुमचा प्रेमभंग झाला यापेक्षा तुम्ही कुणावर प्रेम केलं, ही अतिशय पूर्णत्वाची भावना आहे. प्रेम असफल झालं; पण प्रेम केलंच नाही यापेक्षा ते नक्कीच उजवं आहे. हे कायम मनात असू द्या. आयुष्यात नव्यानं प्रेम आलं तर त्या प्रेमाला अव्हेरू नका, संधी द्या.’
Hi,
I am your regular blog reader.
Nice lines.
Keep it up.