जून महिना सुरू झाला होता. सकाळच्या कोवळ्या उन्हाने गावावर सोनेरी झालर पसरली होती. अधून मधून रिमझिम पाऊस पहिल्या तारखेपासूनच सुरू झाला होता आणि झाडा, वेली फुलांवर, डोंगरांवर हिरव्या गार गवताच्या जणू कुणीतरी चादरीच पसरल्या होत्या. ‘किती सुंदर वातावरण असतं पावसाळा सुरू होण्याआधीचं आणि पाऊस सुरू झाल्यावरचं.’
मी आता इयत्ता सहावीत शिकत होतो. रोज सकाळी लवकर उठून, अंघोळ करून देवासह आई-आप्पांना ‘आप्पा म्हणजे वडील’ नमस्कार करायचा. ही गुरुजींनी दिलेली शिकवण. शाळेत जाण्याअगोदर आईला तिच्या कामात मदत करायचे. कपिलेला आणि छोटय़ा सर्जाला चारा घालायचा ही माझी नेहमीची कामं असायची. पण आता पेरणी चालू झाली असल्याने माझ्या नेहमीच्या कामात आणखी एक काम वाढले होते, ते म्हणजे शाळेत जाण्याआधी आप्पांना शेतावर न्याहारी पोहोचवायची आणि मग शाळेत जायचं.
रविवार असल्याने मी आज अंथरुणातच लोळत पडलो होतो. एवढय़ात आईने आवाज दिला, ‘वेदू.. अरे वेदू उठतोस ना! आईची हाक ऐकून मी लगेच उठलो. ‘काय झालं मम्मी?’ ‘अरे जा जरा लवकर तोंड धू आणि भाकरी पोहोचवून ये त्यांना!’ असे आईने सांगितले. आज आप्पांना न्याहारी घेऊन जाण्याचा माझा मूड नव्हता. कारण आज सर्व मित्र मिळून रानात हुंदडायला जायचा बेत होता आमचा. आईला माझ्या मनातलं नेहमीच कळायचं. माझा उतरलेला चेहरा बघून आई पट्कन म्हणाली, ‘बावा वेदू! जा पटकन भाकरी दे आणि जा दिवसभर कुठ जायचं तिकडं’! दिवसभराची मोकळीक मिळणार हे कळल्यावर मला खूप आनंद झाला. मी लगेच न्याहारी पोहोचवायला तयार झालो.
एका हातात रुमालात बांधलेली कांदा-भाकरी आणि चटणी व दुस-या हातात पाण्याचं छोटुलं मडकं घेऊन मी शेताकडं निघालो होतो. आज आप्पा घरापासून आणि नेहमीच्या शेतजमिनीपासून विरुद्ध दिशेला असलेल्या आमच्या दुस-या जागेत पेरणीला गेले होते. ज्या जागेचं नाव होतं, ‘बोरीचा आडवा’ जिथं अनेक बोरीची झाडं होती. तिथं जायचं म्हणजे ‘रहाट’ नावाचे घनदाट जंगल पार करून जावे लागे. मी मित्रांसोबत आज कुठे कुठे हुंदडायचे याचं विचारात मग्न होऊन झपाझप चालत होतो. गावापासून थोडे दूर गेल्यावर आमच्या गावातून वाहणारी नदी होती. पण अजून तिला पाणी नव्हते. तिच्यावर बांधण्यात आलेल्या लोखंडी सांकवावरून जायला मला फार आवडत असे. मी हलकेच पण आनंदाने इकडे तिकडे बघत साकवावर चढून दुस-या बाजूला उतरलो आणि पुढे असलेली चढण चढून रहाटाच्या जंगलात शिरलो. तिथे वाराही नाहीसा झाला होता. अशा शांत आणि निबिड जंगलातून मी भयाने थरथरत, इकडे तिकडे घाब-या नजरेने बघत झपाझप पावले टाकीत होतो. एवढय़ात आईने दिलेला कानमंत्र आठवला..
‘हार्टातून सवकास जा हा बावा, किडका मिडका आसलं बग पायाखाली’! हे शब्द आठवताच मन अजून चर्र्र झालं. थोडय़ा अंतरावर गेल्यावर अचानक सोसाटय़ाचा वारा सुरू झाला आणि जंगलातील झाडं एकमेकांवर जोरजोराने आदळू लागली. मी जंगलात शिरताच असलेले शांत वातावरण अचानक असं भयानक कसं झालं हेच कळेना. इतक्यात कडकड कडकड कर्र्र्र्र कर्र्र.. धडाम धूम असा जोराचा आवाज झाला.. ते ऐकताच मी हातातील छोटुलं मडकं तिथल्या तिथेच टाकलं आणि जोराने धूम ठोकली. एवढा घाबरलो होतो की घामाने सर्व कपडे ओलेचिंब झाले होते. सरळ वाटेने इकडे तिकडे न बघता आप्पा असलेल्या शेतावर जाऊन थांबलो. मला भयभीत झालेलं पाहून आप्पांनी नांगर जागीच उभा केला आणि धावत माझ्या जवळ आले. ‘बावा! काय झालं रे? घाबरलास का? माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते, तरीही धापा टाकत टाकत मी आप्पांना घडलेला प्रकार सांगून टाकला. आप्पांनी लगेच मला आपल्या उराशी कवटाळलं आणि म्हणाले, बावा किती घाबरगुंडा आहे रे तू? वेडय़ा पोराच्या जातीनं असं घाबरून कसं चालेल! पुढे ते म्हणाले, ‘अरे पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, ऊन, पाऊस, वारा हा खेळ चालूच राहणार आणि त्याच वा-याने एखादे जुने झालेले झाड तुटून पडले असेल, त्यात एवढे काय घाबरायचे? ‘आप्पा मला वाटते तिथे भूत असेल कदाचित!’ मी घाबरतच म्हणालो.. ‘गप बैस म्हणे भूत असेल, कुणी सांगितले तुला भुतं असतात हे? ते सारे मनाचे भ्रम असतात. मनात भय निर्माण झाले की, आपल्याला वाटते भूत आले. खरे तर आपलंय मनातील भीतीच आपल्याला घाबरवत असते. आपण जर घाबरलोच नाही तर, भुताचा विचारही मनात येत नाही कळलं का? कारण भूत आपल्यातल्या भयात लपलेले असते रे.. म्हणून यापुढे कधीच घाबरायचे नाही. कळले का ? आणि हो, जाताना बघूया की कुठे लपले आहे ते भूत..
मी फारच घाबरलो होतो, म्हणून परत एकटा घरी जाण्याची मला हिम्मत काही झाली नाही. मी आणि आप्पा व आमचे गणप्या शिरप्या बैल असे आम्ही चौघेजण त्याच रस्त्याने घरी येऊ लागलो. मनात अनेक विचार येत होते. तंद्रीत चालताना मी आमच्या शिरप्यावर आदळलो, कारण तो मध्येच थांबला होता. भानावर येऊन पुढे पाहिलं तर आप्पाही थांबले होते. क्षणभर काहीच कळले नाही काय झाले ते, पण नंतर एकदम आठवले अरेच्चा.. इथेच तर तो कडकड कडकड कर्र्र्र्र कर्र्र.. धडाम धूम आवाज झाला होता. आता मी पुरता घामाघूम झालो..
मी घाबरलोय हे आप्पांच्या लक्षात आले असावे बहुधा, ‘बावा वेदू!’
‘काय आप्पा?’ मी हलकेच पुढे गेलो, जाताना इकडे तिकडे पाहिलं. पण भूत असावं असं काहीच जाणवलं नाही तिथं. पुढे गेल्यावर आप्पानी वाटेत पडलेल्या भल्या मोठय़ा सागाकडे बोट दाखवलं. मी आणखी घाबरून गेलो. पण आप्पा जोराने हसू लागले. हा हा हा.. बावा घाबरा रे, तू घाबरा! असं बोलत आप्पा नुसतेच हसत होते आणि मी ओशाळल्यावाणी त्यांच्याकडे बघत होतो. मी घाबरलो होतो हे मला कळले होते. कारण जाताना मी ज्या गोष्टीला भूत म्हणून घाबरलो होतो ते भयाचे भूत होते.
तो आवाज त्या तुटणा-या सागाच्या झाडाचा होता हे मला कळले होते.
डोन्ट फेअर बिकॉज गॉड इस अल्वेज विथ एव्हरी वन