पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करणा-या पाकिस्तानच्या तपास पथकाने या हल्ल्याचा कट भारतानेच रचला होता, असा आरोप केला आहे.
इस्लामाबाद- पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी भारतात आलेल्या पाकिस्तानच्या तपास तपास पथकाने या हल्ल्याचा कट भारतानेच रचला होता, असा आरोप केला आहे.
या पथकाकडून याबाबतचा अहवाल लवकरच पाकिस्तानी सरकारला सादर केला जाणार आहे. या अहवालाबाबतचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांमध्ये छापून आले आहे.
पाकिस्तानचे तपास पथक नुकतेच भारतात येऊन गेले. या पथकाने पठाणकोट येथील हवाई तळाला भेट देऊन चौकशी केली होती. त्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिका-यांशी चर्चाही केली होती. आता या पथकाने पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर हा हल्ला भारतानेच केला असल्याचा आरोप केला आहे.
याआधी या हल्ल्याबाबत भारताने दिलेले पुरावे पुरेसे नसल्याचे या पथकाने म्हटले होते. तसेच या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा एकही पुरावा भारत सादर करू शकला नाही, असेही पाकिस्तान तपास पथकातील अधिका-यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची प्रतिमा मलीन करण्यासाठी भारताने या हल्ल्याचा बनाव रचला होता.
या हल्ल्याबाबत आणि दहशतवाद्यांबाबत भारतीय अधिका-यांना माहिती होती, असेही या अहवालात नमुद करण्यात आले आहे. पठाणकोट हल्ल्याच्या तपासात सक्रिय असणा-या राष्ट्रीय तपास संस्थेच्या मोहम्मद तंझील अहमद या अधिका-याची हल्लेखोरांनी २४ गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली.
पठाणकोट हल्ल्याचा तपास दडपण्यासाठीच या अधिका-याची हत्या करण्यात आली आहे, असा आरोपही पाकिस्तानच्या तपास पथकाने केला आहे.
Aata tya pakistani bhai lokanche jaoon paay chata,