बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेस आघाडीची सरशी झाली असून भाजपची पीछेहाट झाली आहे.
नवी दिल्ली– बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेस आघाडीची सरशी झाली असून भाजपची पीछेहाट झाली आहे. या पोटनिवडणुकीत २१ पैकी १३ कॉँग्रेस आघाडीने जिंकल्या असून रालोआच्या वाटेला केवळ आठ जागा आल्या आहेत. बिहारमध्ये नितीशकुमार, लालूप्रसाद यादव आणि काँग्रेस यांच्या धर्मनिरपेक्ष आघाडीने १०पैकी ६ जागा जिंकल्या. मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसला महत्त्वाच्या जागांवर विजय मिळाले.
पाच राज्यांमध्ये २१ ऑगस्टला झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. या निवडणुकीत जनतेने भाजपला नाकारून काँग्रेस, राजद आणि जदयूला कौल दिला आहे. बिहारमधील १० पैकी ६ जागा कॉँग्रेस, जदयू, राजदने जिंकल्या असून अन्य ४ जागांवर भाजप विजयी झाला आहे. कर्नाटकात कॉँग्रेस आणि भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या तीनपैकी दोन जागा कॉँग्रेसने जिंकल्या तर भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले. पंजाबमध्ये दोन जागांपैकी कॉँग्रेस आणि सत्ताधारी शिरोमणी अकाली दलाला प्रत्येकी एक जागा मिळाली.
बिहारमध्ये विधानसभेच्या दहा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत बिहारच्या जनतेने राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड आणि काँग्रेस या धर्मनिरपेक्ष आघाडीला कौल दिला. या आघाडीने १० पैकी ६ जागा जिंकल्या आहेत तर, भाजपला चार जागांवर समाधान मानावे लागले. भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड आणि काँग्रेसने एकत्रितपणे ही निवडणूक लढवली होती. या विजयाने नितीश-लालू यांना दिलासा मिळाला आहे. त्यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले आहेत.
लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने केलेली चूक आता सुधारली आहे, अशी प्रतिक्रिया लालूप्रसाद यादव यांनी दिली. या निकालाने आम्ही समाधानी आहोत. जदयू सरकारने केलेल्या विकास कामांमुळे हा विजय मिळाला, असे माजी मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी म्हटले आहे. जदयू-राजदमध्ये आघाडी झाल्याचा फायदा राजदला झाला आहे. पुढच्या वर्षी होणा-या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या पोटनिवडणुकांकडे पाहिले जात होते.
कर्नाटकमध्ये काँग्रेसने दोन जागा जिंकल्या असून, भाजपला शिकारीपुराच्या एका जागेवर समाधान मानावे लागले. ही जागा जिंकण्यासाठीही भाजपला संघर्ष करावा लागला. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांचा मुलगा बी. वाय. राघवेंद्र ६४३० मतांच्या फरकाने विजयी झाला. काँग्रेसने चिक्कोडी-साडालगाचा पारंपरिक बालेकिल्ला कायम राखला. येथून काँग्रेसचे उमेदवार गणेश प्रकाश हुक्केरी यांनी भाजप उमेदवार महांतेश यांचा ३१,८२० मतांनी पराभव केला. बेल्लारी ग्रामीणमधून काँग्रेसच्या एन.वाय. गोपाळकृष्ण हे ३३,१०४ मतांनी विजयी झाले.
पंजाबमधील दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी शिरोमणी अकाली दल आणि काँग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली. पतियाळा येथून काँग्रेस उमेदवार परणीत कौर या २३,२८२ मतांनी विजय मिळवला. शिरोमणी अकाली दलाने तलवाडी साबोची जागा जिंकली.
मध्य प्रदेशातही भाजपला मोठा फटका बसला आहे. भाजपचे प्राबल्य असलेल्या बाहोरीबंद मतदारसंघातून कॉँग्रेसचे सौरभ सिंग हे ७९७७ मतांनी विजयी झाले. तर विजयराघवगड येथे भाजपचे संजय पाठक आणि अगर मतदारसंघातून भाजपचे गोपाल परमार विजयी झाले.
उत्तराखंडमध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेसने तीन जागा जिंकल्या असून भाजपला एकही जागा जिंकता आली नाही.
विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल
बिहार : १०
कॉँग्रेस १, राजद ३,
जदयू २, भाजप ४
उत्तराखंड : ३
कॉँग्रेस ३
कर्नाटक : ३
कॉँग्रेस २, भाजप १
मध्य प्रदेश : ३
कॉँग्रेस १, भाजप २
पंजाब : २
कॉँग्रेस १, शिरोमणी
अकाली दल १
एकूण जागा : २१
यूपीए १३, एनडीए ८
बिहार की मालिक “जनता” को महागठबंधन प्रत्याशियों को जिताने के लिए हार्दिक धन्यवाद। देशभर के मतदाताओं ने लोकसभा चुनाव में हुई भूल को सुधारा
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd)
lie of modi will not continue long.