‘श्री गणपती’ हे विद्या, प्राणशक्तीचे दैवत, हे अगदी लहानपणापासून आपल्याला शिकवलं गेलंय. ज्ञानेश्वर माऊलींनीही गणरायाची कीर्ती अभंगातून वर्णिली आहे. परंपरेनुसार आपल्या लाडक्या बाप्पाचा भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून दहा दिवस मोठा उत्सव साजरा करून आराधना केली जाते. तसंच माघ शुद्ध तृतीयेला ‘माघी गणेश जयंती’ साजरी केली जाते. यंदा ११ फेब्रुवारीला येणा-या माघी गणेश जयंती निमित्त आज आपण या विशेष लेखातून गणपतीची नावं, त्या नावांचा क्रम आणि त्यांचं वैशिष्टय़ं, गणपतीचं मानवी देहात मूळ स्थान कुठे आहे व ते त्याच ठिकाणी का आहे? हे जाणून घेऊ या.
नारदपुराणातील केलेल्या उल्लेखानुसार गणेशाच्या नामावलीचा क्रम आहे. त्यात पहिलं नाव ‘वक्रतुण्ड’ आहे. वक्रतुण्ड म्हणजे साधारण अर्थ होतो, वाकडं तोंड असलेला. नारदपुराणात संस्कृत श्लोकात स्पष्टपणे म्हटले आहे. ‘वक्रन्तुण्डयतिइवक्रतुण्ड’ : या श्लोकातून गणपतीला ‘वक्रतुण्ड’ संबोधण्यामागील अर्थ वाईट मार्गापासून भक्तांना दूर ठेवणारा आणि सात्विकता देणारा देव म्हणजे ‘गणपती’, म्हणून तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात.
। आधी मन घेई हाती। तोचि गणाचा गणपती।
ऐहिक सुख, अहंकाराचा नाश करणारा देव म्हणजे गणपती, वाईट मार्गापासून दूर करत योग्य दिशा दर्शवणारा गणपती, म्हणून नारदांनी गणेशाला ‘वक्रतुण्ड’ संबोधले असावे.
२. एकदंत
श्री गणेशाचं दुसरं नाव ‘एकदंत’ आहे. एकदंत म्हणजे एक दात असलेला. गणेशाच्या गजमुखावरील डाव दात (हस्तिदंत) वज्रघाताने तुटलेला असल्याने केवळ उजवा दात असतो, असल्यामुळे त्याला ‘एकदंत’ म्हणतात. गणेशाचा उजवा दात सूर्याचं प्रतिनिधीत्व करतो. एक दात असल्यामुळे आध्यात्मिक दृष्टय़ा एकच ब्रह्म आहे, असा संदेश गणराय देतो. त्या संकल्पनेवरून एकदंत नाव नारदांना सुचले असावे.
३. कृष्णपिंगाक्ष
नारदपुराणात आणि गणपती स्तोत्रात ‘कृष्णपिंगाक्ष’ हे नाव पहायला मिळते. ‘कृष्णपिंगाक्ष’ या शब्दाची फोड केली तर ‘कृष्ण’ म्हणजे रंगाने काळा असा पृथ्वीचा थर तर ‘पिंग’ या शब्दाला ढगांच्या अर्थाचा शब्द मानला असून ‘अक्ष’ म्हणजे डोळा, हा सरळ साधा अर्थ होतो. गणपती हा स्वर्गापासून मृत्यूलोकांपर्यंत त्यांच्या डोळ्यांनी सर्व मनुष्यकर्म पाहू शकतो. त्यामुळे गणपतीला ‘कृष्णपिंगाक्ष’ म्हटलं जातं.
४. गजवक्त्र
‘गजवक्त्र’ या शब्दांचा अर्थ फार गहन आहे. ‘गज’ म्हणजे हत्तीचं तोंड असलेला आणि ‘वक्त्र’ म्हणजे सोंडेला आलेली वलयपणा यामुळे ‘गजवक्त्र’ नाव असावे. मुद्गल पुराणात गज या शब्दाचा अर्थ काही असा घेतला आहे. ‘ग’ म्हणजे ज्यांचा नाश होतो किंवा गत:प्राण होणा-यापासून ते ‘ज’ म्हणजे जन्म घेणा-या प्रत्येकावर कृपादृष्टी ठेवणारा म्हणजे ‘गजवक्त्र’ होय.
५. लंबोदर
गणपतीचं पाचवे नाव ‘लंबोदर’. या शब्दाचा शब्दश: अर्थ घेतला तर मोठं पोट असलेला असा अर्थ होईल. पण लंबोदर या शब्दाचा संत एकनाथांनी फार मोठा अर्थ लावला आहे. संपूर्ण पृथ्वीचा साठाच गजाननाच्या पोटात आहे. सर्व जिवंत आणि मृत सारं काही गजाननाच्या उदरात सामावतं. त्यामुळे एकनाथी भागवतात एकनाथ महाराजांनी हा अर्थ लिहून ठेवला असावा. गणपतीचं पोट मोठं असण्यामागे बरीच कारणं आहेत, पण गणपतीला ज्ञानाचा स्रेत मानलं जातं. बालगणपतीने शिवशंकराच्या डमरुच्या नादातून निर्माण होणा-या स्वरातून संगीताचं ज्ञान मिळवलं तर शंकराच्या तांडव नृत्यातून नृत्याचं ज्ञान मिळवलं आणि त्या ज्ञानामुळेच गजाननाचं पोट मोठ्ठ झालं असावं, असा समज आहे. पण काही जण या ‘लंबोदर’ शब्दाचा अर्थ काहीसा असाही लावतात की, जो अपराध पोटात घेऊन फक्त सुख पदरी घालतो. त्यामुळे त्याला ‘लंबोदर’ म्हणतात.
६. विकट
गणपतीला ‘विकट’ नावानेही ओळखले जाते. कारण विकट नावाचा अर्थ पाहिला तर फार सोपा आणि तितकाच आध्यात्मिक देखील आहे. विकट नावाची शब्द फोड केली तर काही असा अर्थ लावता येईल की, ‘वि’ म्हणजे विकृत बुद्धीचा नाश करून ‘अकट’ म्हणजे मोक्ष देणारा म्हणजे ‘विकट’ होय. विकृतीतून मोक्षाकडे नेणारा गणेशाचा अवतार पृथ्वीवर विकट नावाने वावरतो. आध्यात्मिक शास्त्रानुसार विकृतीला मोक्षाची स्वीकृती मिळत नाही, पण गणेशाला या नावाने जपले असता विकृतीतून ही मोक्ष मिळतो असा समज आहे.
७. विघ्नराजेंद्र
गणपतीला विघ्नहर्ता म्हटलं जातं त्याप्रमाणे नारदांनी ही फार विचार करून गणपतीला ‘विघ्नेश’ किंवा ‘विघ्नराजेंद्र’ म्हटलं आहे. ‘विघ्नराजेंद्र’ या शब्दाचा सोपा अर्थ असा होतो की, ‘विघ्न’ म्हणजे संकट किंवा दु:ख आणि ‘ईश’ म्हणजे देव विघ्न दूर करणारा देव म्हणजे ‘विघ्नेश’ असा समज आहे. रज, तम, सत्व या त्रिगुणांचा नाश करतो, तो विघ्नेश किंवा विघ्नराजेंद्र नावाने ओळखला जातो. खरंतर विघ्नेश या शब्दातील ईश या शब्दाचा अर्थ काही असाही लावता येईल. ‘ई’ म्हणजे ईक्षते आणि ‘श’ म्हणजे शम्यते आता या शब्दाचा अर्थ लावला तर जो आपल्या चुका पाहुन त्यातून योग्य वाट दाखवून आपल्याला क्षमा करणारा म्हणजे ‘विघ्नराजेंद्र’ होय.
८. धूम्रवर्ण
‘धूम्रवर्ण’ या शब्दाचा अर्थ साहजिकपणे धूरासारखा रंग असलेला असा होतो, पण हा अर्थ असा नसून यामध्ये सगुण निर्गुणरूपी असलेला धूर गणरायाप्रती कसा वसला आहे, हे सुचवणारं हे नाव खरंतर गणपती हा तेज तत्वाचा स्वामी मानला जातो आणि जिथे अग्नी तिथे धूर होणारच अशा सोप्या अर्थाने गणरायाचं तत्व प्रदर्शित करणा-या रूपाला हे नाव नारदांनी दिलं असावं.
९. भालचंद्र
‘भालचंद्र’ हे नाव गजाननाला कसं प्राप्त झालं याच्यामागे एक छोटी कथा आहे, पण आपण शब्दानुसार तो अर्थ लावण्याचा प्रयत्न करू या. ‘भाल’ म्हणजे ‘कपाळ’ आणि ‘चंद्र’ म्हणजे शीतलतेचं प्रतीक होय. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि मिनाक्षी या चारही देवता मानवाच्या कपाळावरील रेषामध्ये वास करत असतात, या रेषांमधून उत्पन्न होणारे तत्व हे गणरायाच्या ठिकाणी अतिशय कमी पाहायला मिळते. गणरायाच्या डोक्यावरील चंद्र हा शीतलता, करुणा आणि प्रेम याचं प्रतीक आहे. खरंतर महादेवाचं नाव भालचंद्र आहे, परंतु चंद्राचे गर्वहरण केल्यानंतर चंद्राला आपल्या शरीरावर कुठेतरी स्थान देण्यापेक्षा आपल्या वडीलांसारखेचं आपण चंद्राला डोक्यावर मिरवूया या अर्थाने गणरायाने चंद्राला आपल्या मस्तकावर स्थान दिले आणि त्यामुळे गणेशाला ‘भालचंद्र’ हे नामाभिधान प्राप्त झाले असावे.
१०. विनायक
गणपतीला ‘विनायक’ नावाने ही संबोधले जाते. विनायक म्हणजे ‘विघ्न’ दूर करणारा ‘नायक म्हणजे नेता. सर्व देवदेवतांचे विघ्न दूर करून त्याचं प्रतिनिधीत्व करणा-या देवतेला विनायक मानले जाते. विघ्न समूळ नाश करून भक्तांच्या ठिकाणी अधिराज्य करणारा देव म्हणजे ‘विनायक’ होय.
११. गणपती
‘गणपती’ हा शब्द हा मुळचा संस्कृत शब्द असल्यामुळे ‘गण’ या शब्दाचा संस्कृत अर्थ पवित्रक असा होतो. ‘पवित्रक’ या शब्दाचा मराठी अर्थ म्हणजे ‘दैवी चैतन्य’ होय. आणि ‘पती’ म्हणजेच ‘स्वामी’ म्हणूनच ‘दैवी चैतन्याचा आधिपती’ म्हणून ही गजाननाला ‘गणपती’ ही म्हटलं जातं.
१२. गजानन
गणपतीला ‘गजानन’ नावाने ही ओळखले जाते, त्यामागे गणपतीच्या चेह-यामुळे हे नाव पडलं असावं, असा समज आहे. ‘गज’ म्हणजे ‘हत्ती’ आणि ‘आनन’ म्हणजे चेहरा किंवा वदन त्यामुळे हत्तीचं तोंड असलेल्या देवतेला ‘गजानन’ म्हणतात आणि ज्याची चेह-यावरचं संपूर्ण जगाची उत्पत्ती आहे, असे भासते अशा देवतेला ‘गजवदन’ किंवा ‘गजानन’ म्हटलं जातं.
गणपतीची मुद्गलपुराणातही वेगवेगळी नाव सापडतात, पण त्याचा अर्थ नारदपुराणातील गणेशस्तुती किंवा गणेशस्तोत्राशी अगदी मिळताजुळता आहे. आता आपण मानवी देहात गणेशाचं स्थान कुठे आहे आणि ते त्याच जागी का आहे. याबद्दल जाणून घेऊ या.
शरीराची उत्पत्ती आणि गणेशस्थान
जेव्हा एखादं बालक जन्माला येते, तेव्हा त्यामध्ये पंचतत्वाचा वास असतोच त्याबरोबर काही स्थित चक्रांचा समावेश असतो. पंचतत्वाचा वावर माणसागणिक बदलतो, पण हे स्थित चक्र अगदी जशीच्या तशी प्रत्येकाच्या शरीरात पाहायला मिळतात. ही चक्र पुढीलप्रमाणे आहेत.
१) मूलआधारचक्र, २) स्वाधीष्ठान, ३) नाभी, ४) अनहत,
५) विशुद्धी, ६) अगन्या ७) सहस्र्कमळ.
या चक्रांची कार्य खालीलप्रमाणे आहेत. ‘मूलआधारचक्र’ हे भोळेपणाचं प्रतीक आहे. ‘स्वाधीष्ठान’ हे सर्जनशीलतेचं प्रतीक आहे. ‘नाभी’ ही शांतीचं प्रतिक आहे तर ‘अनहत’ सुरक्षेचं प्रतीक आहे. ‘विशुद्धी’ समानतेचं तर ‘अगन्या’ हे क्षमाशीलतेचं प्रतीक आहे. ‘सहस्र्कमळ’ हे एकत्रीकरणाचं प्रतीक आहे. या चक्रावर शरीराचा समतोल ठरला जातो आणि शरीराच्या मूळ स्थानावरचं गणपतीचं स्थान आहे. म्हणजेच ‘मूलआधारचक्रावर’ गणपतीचं स्थान आहे.
आपल्या शरीराची निर्मिती अगदी पृथ्वीप्रमाणे आहे. योगशास्त्राच्या अभ्यासानुसार जेव्हा आपण पद्मासन घालतो, त्यावेळेस आपल्या शरीराचा आकार पृथ्वीसारखा होतो, असे योगअभ्यासकाचं म्हणणे आहे. पृथ्वीची निर्मिती करणा-या गणरायाने मनुष्यदेह धारण केल्यानंतर प्रथमत: गणेशस्थानाचा अभ्यास केला असावा, म्हणूनच योगशास्त्रात प्रत्येक आसनाआधी पद्मासन घालण्याची रीत असावी, असं जाणकाराचं म्हणणं आहे.
‘मूलआधाराचक्रा’विषयी थोडक्यात
‘मूलआधारचक्रा’मुळेच शरीरात हजारो व्याधी निर्माण होऊ शकतात, त्याचबरोबर काही वेळा या मूलआधारचक्राच्या भोळेपणा या मूळ गुणाचा विसर ही पडू शकतो. भोळेपणाला कधी ही घालवता येत नाही, पण ते लपवता येऊ शकते. जसे की, सूर्याला ढग लपवू शकतात. त्याचप्रमाणे मूलआधारचक्राच्या भोळेपणाचा ऱ्हास करता येत नाही. ‘मूलआधारचक्र’ हे शरीरातील पहिलं चक्र मानलं जातं, ज्याचं शरीरातलं स्थान मणक्यामध्ये आहे, असं सांगितलं जातं. मुल आधार या शब्दाचा अर्थ म्हणजे ज्याने शरीराला मुळापासून आधार दिला आहे, ते चक्र. या चक्राची काही वैशिष्टय़ं पुढीलप्रमाणे आहेत.
या चक्रात चार पाकळ्या असून या चक्राचा घटक पृथ्वी आहे. या चक्राचा रंग लाल असतो आणि हे चक्र ओटीपोटाच्या पेशींच्या भागात पाहायला मिळते. हाताच्या तळव्यावर हे स्थान पहायला मिळतं. मूलआधारचक्राचं प्रजनन, मलमूत्र विसर्जित करताना, बौद्धिक पातळीवर आणि भावनात्मक पातळी राखून ठेवण्यासाठी प्रकटीकरण केलं जातं. मूलआधारचक्राच्या सात्विकतेमुळे आणि भोळेपणाच्या प्रतिकामुळे येथे गणेशस्थान असल्याचं सांगितलं जातं. मुलआधारचक्रामध्ये विशिष्ट गुणांचा समावेश आहे. जसे की, भावनात्मक समतोल, आनंद, शुद्धता आणि सात्विकता असे गुण पाहायला मिळतात. मूलआधारचक्राचे काही फायदे देखील आहेत जसे की, यामुळे मानवाला काय वाईट आहे आणि काय चांगले आहे, याचा अंदाज लावता येतो. भोळेपणाचं प्रतीक असल्यामुळे तुम्हाला यापासून काही धोका नसतो आणि या चक्रामुळे आपली फसगत होत नाही. मूलआधारचक्रामुळे डोळ्यांना स्थिरता मिळते आणि लक्ष केंद्रीत करण्यास मदत होते. जर मूलआधारचक्राचा समतोल ढळला तर आपल्याला काही रोगांना सामोरं जावं लागते. यामध्ये अतिसार, बद्धकोष्ठता, लैंगिकतेचा गैरवापर आणि लक्ष केंद्रीत न होणे अशा रोगांना सामोरं जावं लागते.
‘मूलआधारचक्रा’ला गणपतीचं स्थान मानलं आहे. त्यामुळे गणपती हा शरीरातच आहे, उगाचच त्याला देवळात धुंडाळत बसण्यापेक्षा त्याचा शरीरात शोध घेतलेला कधीही योग्यच आहे. शरीरात सर्व देवदेवतांची स्थान आहेत, केवळ आपण ती जाणून घ्यायला हवी. गणपती जरी पृथ्वीचा निर्माता असला तरी प्रत्येक शरीरामध्ये तो सूक्ष्मरूपाने वास करतो, हेही तितकंच खरं!
उत्तम लेख