दिव्याची ज्योत घरातील अंधकार नाहीसा करते. त्याप्रमाणे माणसातील अज्ञानाचा अंधकार ज्ञानी पुरुषाच्या सान्निध्यात आल्यावर नाहीसा होतो. ज्ञानाच्या प्रकाशाने जीवन उजळून निघेल.
साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला।
ठायीच मुराला अनुभव ॥१॥
कापुराची वाती उजळली ज्योती।
ठायीच समाप्ती झाली जैसा॥२॥
मोक्षरेखे आला भाग्य विनटला।
साधूचा अंकिला हरिभक्त॥३॥
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी॥
हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी॥४॥
जीवनात साधूचा बोध हा अत्यंत महत्त्वाचा असतो. साधूच्या बोधाने ज्ञानाची प्राप्ती होते आणि त्या ज्ञानाचा अहंमही उरत नाही, याचे अत्यंत गोड वर्णन या अभंगातून ज्ञानदेवांनी केलेले आहे. या अभंगाची पार्श्वभूमी मागच्या अभंगाच्या ‘साधूचे संगती तरणोपाय॥५॥’ या शेवटच्या चरणात स्पष्ट केली आहे. त्याचे अधिक स्पष्टीकरण या अभंगातून देण्यात आलेले आहे. अज्ञान हे दु:ख मूलक आहे. सुखाच्या प्राप्तीसाठी इतर कितीही प्रयत्न केले तरी जोपर्यंत अज्ञान जात नाही, तोपर्यंत सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. मात्र ज्ञान मिळवण्याचं सोडून सुखाचा शोध घेतला जातो. त्यामुळे सुखाच्या ऐवजी दु:खच पदरात पडतं. यासाठी एक सुंदर दृष्टांत दिला जातो. श्रीमंत कुटुंबात जन्मला आलेल्या एका व्यक्तीचं घर खूप मोठं असतं. पूर्वी चोरांची भीती असल्याने त्याच्या पूर्वजांनी घराला खिडक्या ठेवल्या नव्हत्या. घरात पूर्णपणे अंधार भरलेला असतो. तो इतर आपल्या मित्रांकडे जायचा, त्यांची घरं प्रकाशाने उजळलेली होती. मात्र, याचं घर अंधाराने व्यापलेलं. त्याने आपल्या घरातला अंधार नाहीसा करायचं ठरवलं. तो गुत्तेदाराकडे जातो. अंधार उपसून काढण्याचं कंत्राट देण्याबद्दल त्याला विचारतो. जो माणूस अंधार उपसण्यासाठी मजुरांचा शोध घेतो, तो किती ज्ञानी असेल याचा अंदाज गुत्तेदाराला येतो. त्यावर तो गुत्तेदार त्याला ५० हजार लागतील, असं सांगतो. दोन महिने मजूर घरातून नुसते रिकामे घमेले घेऊन बाहेर जातात. परत घरात येतात. अंधार उपसत असल्याचा देखावा निर्माण केला जातो. खूप पैसा खर्च होतो. पण अंधार जात नाही. हताश झालेली ती व्यक्ती एकेदिवशी आपल्या घराच्या दारात बसलेली असते. तेव्हा एक साधू तिथे येतो. हताश झालेल्या त्या व्यक्तीला विचारते, असा दु:खी का? तो सांगतो, माझ्या घरातला अंधार उपसण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. ५० मजूर एक वर्षभर काम करीत होते. मात्र अंधार काही उपसला जात नाही. साधू म्हणतो, तो अंधार तुला घालवायचा आहे काय? मी घालवतो. त्याच घराच्या कोनाडय़ात पडलेला दिवा साधू उचलतात. त्यात तेल घालतात. वात पेटवून घरात जातात. जिथे दिवा येतो तिथे अंधार उरत नाही. त्याच्या घरातील अंधार गेला. प्रकाशाने घरं उजळून निघालं. इथे आपला देह म्हणजे घर आहे, अंधार म्हणजे अज्ञान आहे. साधूची भेट होईल, त्यावेळी आपल्या जीवनातले अज्ञान नाहीसे होईल. ज्ञानाच्या उजेडाने जीवन उजळून निघेल.
ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अज्ञान नाहीसं होतं. पण ज्ञान उरते. पायात काटा घुसला असेल तर तो दुस-या काटय़ाने काढून टाकावा लागतो. एकदा पहिला काटा काढला की दुसरा काटा आपण टाकून देतो. तो जवळ राहिला तर तो पुन्हा आपल्याला टोचण्याची शक्यता असते. तसे ज्ञानाने अज्ञान निघून गेल्यानंतर ज्ञानाची अहंता शिल्लक राहते. ती अहंता गर्वाला कारणीभूत ठरते. साधूचा बोध झाल्यास ज्ञान तर प्राप्त होते, परंतु अहंता राहत नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणतात – नुरोनिया ठेला, कापुराची वात ज्याप्रमाणे जळून गेल्यानंतर खाली काहीही शिल्लक उरत नाही. तसंच साधूच्या संगतीने प्राप्त झालेल्या ज्ञानानंतर अहंताही शिल्लक राहत नाही. साधूचा ज्याने अंगीकार केला आहे, असा साधक खरा भाग्यवंत असतो. जीवनात साधूचे सोंग घेतलेले अनेक जण मिळतील. परंतु ख-या साधूची भेट खूप अवघड असते. भगवंतांची कृपा असेल तरच खऱ्या साधूचे भेट होते, असं सांगताना तुकाराम महाराजही एका ठिकाणी म्हणतात,
बहु अवघड आहे संत भेटी।
परी त्या जगजेठी करुणा केली॥
म्हणून ज्ञानदेव म्हणतात की, मला संताच्या संगतीची गोडी लागली आणि त्यामुळे जनात, वनात सर्वत्र हरी दिसू लागला. साधूच्या भेटीनेच अवघं विश्व हे भगवंत स्वरूप आहे, याची अनुभूती येते. एकदा सर्व जगच हरीरूप आहे, हे कळल्यावर कुणाचा द्वेष उरत नाही. मत्सर उरत नाही. भेदभाव उरत नाही. जनी-वनी हरी दिसण्याचे सामर्थ्य फक्त साधूच्या बोधानेच प्राप्त होते.
मोक्षाच्या दिशेने पाऊल टाकण्याच्या रेषेवर पोहोचतो. हे भाग्य फक्त साधूच्या संगतीनेच प्राप्त होते, असे ज्ञानदेव सांगतात.
Aaple nirupan khup chaangale aahet, me pratyek nirupan download karun sangrahi thevale aahet, parantu pachavya abhangache nirupan bhetat cha naahi. ‘yog yaag vidhi yene navhe siddhi’ ya abhangache nirupan kuthe bhetal? shakya asalyas kalavaave.