गेल्या पाच वर्षांत भारतीय सैन्यातील ५९७ जवानांनी आत्महत्या केली. तर १,३४९ जवानांनी राजीनामा दिल्याची माहिती संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी दिली.
नवी दिल्ली- गेल्या पाच वर्षांत भारतीय सैन्यातील ५९७ जवानांनी आत्महत्या केली. तसेच एक हजार ३४९ जवानांनी राजीनामा दिल्याची माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली.
२००९ ते २०१३ या पाच वर्षात सैन्यातील ५९७ जवानांनी आत्महत्या केली. यात सैन्य दल ४९८, हवाई दल ८३ आणि नैसेनेच्या १६ जवानांचा समावेश असल्याचे जेटली यांनी एका लेखी प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.
सर्वाधिक आत्महत्यांची नोंद २०१० मध्ये झाली. या वर्षात ११६ जवानांनी आत्महत्या केली. तर २०१३ मध्ये हे प्रमाण सर्वात कमी आहे. २०१३ मध्ये ८६ जवानांनी आत्महत्या केल्याचे जेटली यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.
तर या पाच वर्षात एकूण १,३४९ जवानांनी सेवा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिला. २,२१५ जवानांनी राजीनामा अर्ज सादर केले होते. मात्र त्यापैकी १,३४९ जवानांचे राजीनामे मंजूर करण्यात आले.
जवानांना मानसिक समाधान मिळावे या हेतूने पोषक वातावरण तयार करण्यासाठी सरकार विविध उपक्रम राबवित असते, असे जेटली यांनी सांगितले. यासाठी त्यांच्या रहाणीमान आणि कामाच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आले. त्यांना विविध सोयी-सुविधा देण्यात येतात. सुट्ट्यांचे नियोजन केले जाते. योग आणि प्रकृती संबंधित अन्य विविध प्रकारचे शिबीर नियमित आयोजित केले जातात, अशी माहिती जेटली यांनी दिली.
दरम्यान, गेल्या तीन वर्षात हवाई दलाच्या १९ विमानांचे नुकसान झाले. यात १२ मिग विमानांचा समावेश आहे. यात पाच जवानांसह एका नागरीकाचा मृत्यू झाल्याची माहिती जेटली यांनी अन्य एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.
माननीय जेटली साहेब ! गेल्या पांच वर्षांत भारताच्या दुष्मनांनी / आतंक वाद्यांनी किती भारतीय नागरिकांचे ,पोलिस ओफिसारांचे ,बळी घेतलेंत ,तेही जरा सांगून टाका ,उगीच सैन्याचा ढोल बडवीत राहू नका ,