प्रत्येक व्यक्ती कोणत्या गोष्टीकडे, काय नजरेने पाहते, त्याप्रमाणे त्याला ती गोष्ट दिसत असते. गोष्ट एकच असते; पण प्रत्येकाच्या दृष्टिकोनाप्रमाणेच अनेकांना ती गोष्ट वेगवेगळी दिसत असते. गोष्ट एकच असते, पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. उन्हाळयाच्या बाबतीतही तसंच म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. अनेकांना त्रासदायक वाटणारा उन्हाळा, चिमुकल्यांना, विद्यार्थ्यांना मात्र मोठा गंमतशीर आणि हवाहवासा वाटतो. त्याच उन्हाळयाच्या सुट्टीविषयी थोडेसे..
एप्रिल महिना उजाडला. उन्हाचे चटके जाणवू लागले. एप्रिलच्या सुरुवातीलाच तपमान ४० अंशापर्यंत गेले आहे. म्हणजे काही दिवसातच उन्हाचा जोरदार तडाखा वाढणार यात काही शंकाच नाही. हळूहळू रस्त्यावरील वर्दळही कमी होऊ लागेल. जवळजवळ सर्वच शाळांना सुट्टी पडली आहे.
महिना, दोन महिना सुट्टी. मग महिनाभर नुसती धमाल, मजा, मस्ती. शाळेची गडबड नाही, अभ्यासाची कटकट नाही.
मनाला वाटेल तेवढा वेळ झोपायचे. कोणी उठवायला येणार नाही. झोप पूर्ण झाली की मग उठायचं. सुट्टीचा काळ म्हणजे काही विचारूच नका. गावाकडे जाणा-या गाडयाही आता फुल्ल होऊ लागतील. गल्लोगल्ली आता लहान मुलांचा गोंगाट ऐकू येईल. खेळाची मैदाने गच्च भरू लागतील.
मे महिना म्हणजे प्रचंड उन्हाचा आणि अनेकांसाठी त्रासदायक महिना. सर्व ऋतूंमध्ये त्रासदायक ऋतू म्हणजे उन्हाळा, असे अनकांच्या तोंडी ऐकायला मिळते. कारण उन्हाळयात अनेकांच्या आजारपणाच्या समस्या तोंड वर काढतात. त्यामुळे ब-याच मंडळींना उन्हाळा म्हटला की काहीतरी भयंकर असल्यासारखे वाटते. पण म्हणतात ना प्रत्येकाच्या नजरेची गोष्ट असते.
कोण कोणत्या गोष्टीकडे काय नजरेने बघतो, त्याप्रमाणे त्याला ती गोष्ट दिसत असते. एकच गोष्ट अनेकांना वेगवेगळी दिसत असते. गोष्ट एकच असते, पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि त्या त्या दृष्टिकोनाप्रमाणे त्या त्या व्यक्तीला ती गोष्ट दिसत असते. उन्हाळयाच्या बाबतीतही तसंच म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.
अनेकांना त्रासदायक ठरणारा हा उन्हाळा चिमुकल्यांना मात्र फार गमतीशीर आणि आवडता महिना वाटतो. त्याची कारणेही तशीच असतात म्हणा. कारण मार्चच्या शेवटच्या आठवडयात आणि एप्रिलच्या पहिल्या आठवडयात जवळजवळ सगळयाच शाळां, कॉलेजना सुट्टी लागते. सुट्टी म्हणजे चिमुकल्यांचा, विद्यार्थ्यांचा आवडता विषय.
कारण वर्षभर अभ्यास केल्यानंतर एक महिना सुट्टीचा काळ असतो. त्या सुट्टीच्या काळात प्रत्येक जण आपापल्या परिने सुट्टीचे नियोजन करत असतो. मग निरनिराळे प्लान आखले जातात. कोणी गावाला जाण्याचा प्लान आखतो, तर कोणी नवनवीन खेळांच्या तयारीला लागतो. कोणी वेगवेगळया वाचनालयाचे सभासद होते. तर कोणी सुट्टीत जास्तीत जास्त नाटके किंवा पिक्चर बघण्याचा चंग बांधतो. सुट्टीत अनेक चांगली आणि खूप पुस्तके वाचायची असेही बरेच जण ठरवतात.
सुट्टीच्या या काळात अनेक शिबिरे आयोजित केली जातात. अशा या शिबिरांना ब-याच प्रमाणात विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसादही मिळतो. कोणी सुट्टीत कॉम्प्युटरच्या क्लासेसला जाण्याचे ठरवतो, तर कोणी महिनाभर गायन क्लासला जाऊन आपल्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करतो. अर्थातच अनेकांच्या आवडीनिवडीप्रमाणे उन्हाळयाच्या सुट्टीचे वेगवेगळे प्लान ठरतात.
या महिन्यात गावी जाणा-यांची मात्र भलतीच लगबग असते. गावी जाऊन भरपूर मजा करण्याचे सगळे प्लान अगदी मनोमन ठरलेले असतात. कधी एकदा गावाला जाणा-या गाडीत बसतोय आणि कधी एकदा गावाला पोहोचतोय असे अनेकांना झालेले असते. या महिन्यात गावी जाण्याची मजा काही औरच असते. भले तळपते उन्ह असो किंवा उन्हापासून होणारे काही अन्य त्रास असोत, लहानग्यांना याच्याशी काहीच देणे-घेणे नसते.
मे महिन्यात रस्त्यारस्त्यांवर थंडगार सरबताच्या गाडया दिसतात. त्या गाडय़ांवर चिमुरडय़ांची गर्दी पाहायला मिळते. अनेक जण ‘मामाच्या गावी’ जाण्याची स्वप्ने पाहत असतात. पण प्रत्येकाचा मामाच गावी राहतो असे आता काही राहिलेले नाही. पण पूर्वीपासून आपण ऐकत आलेलो आहोत, मे महिन्याच्या सुट्टीत कुठे जाणार विचारले, तर एकच उत्तर प्रत्येकाच्या तोंडी असायचे आणि ते म्हणजे ‘मामाच्या गावी जाणार’. या आशयाचे एक गाणेही प्रसिद्ध आहे,
‘झुक झुक झुक झुक अगीन गाडी,
धुरांच्या रेषा हवेत काढी,
पळती झाडे पाहू या
मामाच्या गावाला जाऊ या..’
ज्येष्ठांना मात्र उन्हाळयात ब-याच त्रासांना सामोरे जावे लागते. ब-याच व्यक्तींना उन्हाळयात डोळय़ांची आग होणे, डोळे लाल होणे, डोळे दुखणे, चक्कर येणे असे अनेक त्रास होतात. तर अनेक लहान मुलांना या महिन्यात घामोळे आलेले दिसते. शरीर समस्यांच्या दृष्टीने हा महिना थोडा अधिकच त्रासदायक असतो.
वर्षभर अभ्यास केल्यानंतर येणारी ही सुट्टी कंटाळा घालवणारी आणि मनाला विरंगुळा देणारी असते. पुढच्या वर्षी पुन्हा ताजे,टवटवीत होण्याकरिता आपणही या सुट्टीत सहभागी होऊ या.
मे महिन्याची सुट्टी काय असते ते मोठ झाल्यावर अनुभवता येत नसते ;
लपाछपी , गोट्या , भवरे , लगोरी… अशे खेळ आता कोणी खेळत नसते …
काय होते ते दिवस…
आंब्याच्या आधी कैरी झाडावरून पाडून खालेल्ली असते ,,,
पाडताना काकू बघतील हि भीती पण असते ….
गावी जाण्याची तयारी हि फुल जोश मध्ये असते ….
पेपर झाले हि ख़ुशी निकाला दिवसापर्यत तर शाबूत असते ..
खेळखेळताना वेळेच बंधन नसते ….
अभ्यास कर रे रेड्या अशी आईबाबांची तक्रार नसते ….
खेळताना होणारी भांडण हि महत्वाची गोष्ट असते …..
आई ला नाव सांगतो अस बोलून जर गेला …..
तर लपायचं कुठे यात पण एक मज्जा असते….
आता मोठ झाल्यावर कळते …
मे महिन्याची सुट्टी काय असते …
आता सगळे महिने सारखे फक्त आठवड्याची सुट्टी माहित असते … …
मे महिन्याची सुट्टी काय असते …….
ते मोठ झाल्यावर अनुभवता येत नसते …..
योगेश राणे