दहावी-बारावीसाठी मोठ-मोठ्या क्लासेसचे प्रस्थ असलेल्या मुंबईत दहावीचा आणि बारावीचा निकाल यंदा गेल्या वर्षीपेक्षा थोडा कमीच लागला. शिकवण्या आणि तासन्तास अभ्यासामुळे मुलांवरील दडपण वाढत आहे. तसेच विद्यार्थांचा वाढता कल आणि शिकवण्यांमध्ये वाढणारी पटसंख्या यामुळे शिकवण्यांचे रुपांतर शाळेत होत आहे. सर्वस्वी शिकवण्यांवर अवलंबून राहिल्याने विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचा आकडा घसरला आहे का? यावर वाचकांनी पाठवलेली मते…
मूलत: शाळांमध्ये मुलांमध्ये विषयासंबंधीची मूलभूत कौशल्ये व संकल्पना जाणीवपूर्वक विकसित केली गेली तर त्यांचा आत्मविश्वास व विषयांबद्दलची गोडी, पर्यायानं ज्ञान सहजच वाढतं. अध्ययनतंत्र समजावून सांगितलं की, कमी श्रमात व कमी वेळात त्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती व परीक्षेबाबतचा आत्मविश्वास वाढून त्यांना स्वयं-विचार व स्वयं-अध्ययनाची प्रेरणा मिळते. त्यातून त्यांचा सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो. व स्वाभाविकच शाळेचा निकाल उंचावतो हा माझा सत्य व स्वानुभव! परंतु आज पालक मुलांची नैसर्गिक अभिरूची लक्षात न घेता आपल्या अवास्तव अपेक्षांपूर्तीसाठी सुट्टया सुरु झाल्याबरोबर सहा-सात शिकवणी तासन् तास अभ्यासाचा आग्रह व संभवता वर्षभर चालणा-या ‘टेस्ट-सिरीज’चा बोजा त्यांना स्व-अध्ययन-विचार, सुप्तगुण व छंद जोपासण्यासाठी वेळ न देता- लादतात. शिकवण्यांच्या शुल्काचा जेवढा आकडा मोठा तेवढा त्यांना त्या वर्गाच्या यशस्वितेची फाजील खात्री! शिकवणी वर्गातील अध्ययन पद्धती केवळ परीक्षाकेंद्रित पुस्तकी ज्ञान देणारी असते. परिणामत: मुलांची मूळ नैसर्गिक गुणवत्तासुद्धा खालावली व अंतत: चांगल्या शाळांच्या निकालाची अपेक्षित टक्केवारीसुद्धा खालावल्याचं मी स्वत: अनुभवले आहे. क्लासेसमुळे मुंबईच्या निकालाचा आकडा का घसरला हे त्याच उत्तर! – सी. के. बावस्कर, परळ.
ही चिंतेची बाब!
मुंबई विभागातून यंदा तीन लाख ११ हजार ९२८ नियमित विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी दोन लाख ७७ हजार ३५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ८८.९२ इतकी आहे. तीच टक्केवारी मागील वर्षी ८८.९४ होती. त्यामुळे मुंबईत दहावीच्या निकालाचा टक्का घसरला असून ही निश्चितच चिंतेची बाब आहे. १७ नंबरचा फॉर्म भरून ४३ हजार २१२ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. या विद्यार्थ्यांची अभ्यासातील कामगिरी तितकीशी समाधानकारक नसल्यामुळे त्यांचाही या एकूण निकालावर परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि क्लासेसचं म्हणाल तर गरीब घरातील कित्येक विद्यार्थ्यांनी या अगोदरही चांगले गुण मिळवून ‘हुशारी क्लासेसमध्ये नाही तर विद्यार्थ्यांमध्ये असावी लागते’ हे दाखवून दिले आहे. उदाहरणचं द्यायचं झालं तर, बालमोहन शाळेतून प्रथम आलेल्या शुभम धुमाळ याने कोणताही कोचिंग क्लास न लावता शाळेतल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अभ्यास करून ९६.३६ टक्के गुण मिळविले. त्यामुळे दहावीत चांगले गुण मिळविण्यासाठी क्लासेसची आवश्यकता नसली तरी सध्याचे वेगवान जग पाहता पालकवर्गाला आपल्या पाल्याने सर्वाच्या पुढे जावे, असे वाटले तर त्यात नवल ते काय? – उदय वाघवणकर, जोगेश्वरी.
सरकारची धोरणेही कारणीभूत
शाळा-महाविद्यालयीन शिक्षकांचा खालावलेला शैक्षणिक दर्जा, शिक्षकेतर कामे, पहिलीपासून आठवीपर्यंत परीक्षेशिवाय उत्तीर्ण होणे, पाठांतरावर भर, टेस्ट सिरीज, गाइड्स, शिकवण्या यांची सहज उपलब्धता या सर्व कारणांमुळे शिकवण्यांचे रूपांतर शाळेसारखे झाले आहे. शालेय शिक्षकांच्या अप्रत्यक्ष पाठिंब्यामुळे शिकवणीवर्ग ही पालक व बालकांची अपरिहार्य मानसिकता बनली आहे. आज गल्लोगल्ली शिकवणीवर्गाचे पेव आले असून त्यातून भरमसाठ उत्पन्नही मिळू लागले आहे. म्हणूनच तर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने शिकवण्यांच्या शाखांची संख्याही वाढत आहे. तरीही नावाजलेल्यांसह प्रत्येक शिकवणी संस्था चालक दर्जेदार मार्गदर्शन करण्याकडे विशेष लक्ष देतोच असे नाही. शालेय शिक्षकांपेक्षा शिकवणीवर्गातील शिक्षकांवर, शिकवण्यांच्या नोट्सवर अवलंबून राहिल्याने विद्यार्थी स्वत:ची उत्तरे बनवण्यास असमर्थ ठरला आहे. आणि त्याचाच परिणाम मुंबईच्या निकालावर दिसतो आहे. महाराष्ट्राच्या वाढत्या शैक्षणिक अधोगतीस शासनाची धोरणेही कारणीभूत आहेत. पालकही आपल्या सामाजिक प्रतिष्ठेचा विचार करून आपली भंगलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी बालवयापासून मुलांना विशिष्ट दडपणाखाली ठेवतात. आता नि:स्वार्थ गुरुशिष्य परंपरा कालबाह्य झाली असून शैक्षणिक संस्थांना, संस्थाचालकांना व्यावसायिक स्वरूप आले असून त्यांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. यातूनच प्राथमिक शिक्षणापासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत विद्यार्थी व्हेकेशन बॅच, रेग्युलर बॅच, प्रसारमाध्यमांतील मार्गदर्शन, घोकंपट्टीवर आधारित परीक्षा यांच्या चक्रव्यूहात अडकला आहे. त्यामुळे चाकोरीच्या बाहेर विचार करणेही त्यास अवघड होऊन बसले आहे. क्लासेसमध्ये आपापसांत असणारी स्पर्धा, गुणांची चुरस, जाहिरातबाजी यामुळेही विद्यार्थ्यांवरील दडपण वाढते. प्राथमिक शिक्षण सक्तीचे असूनही सर्व शिक्षा अभियानाचा उडालेला फज्जा, शैक्षणिक क्षेत्रातील राजकारण्यांचा हस्तक्षेप व भ्रष्टाचार, पाठ्यपुस्तकातील चुका, प्रचंड दप्तराच्या ओझ्याखाली वैफल्यग्रस्त झालेला विद्यार्थीवर्ग, अपयश आल्यास खचून जाऊन आत्महत्येस प्रवृत्त होणारा विद्यार्थी, बेकारी हे सर्व ढासळलेल्या सामाजिक रचनेचे ज्वलंत उदाहरण असून यामुळे शिक्षणाचे बारा वाजले आहेत. – कमलाकर गुर्जर, कळवा
ताणाला घाबरून बेफिकिरी!
यंदा दहावी-बारावीच्या परीक्षेत मुंबईपेक्षा ग्रामीण भागातील विशेषत: कोकणातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली ही गोष्ट नामांकित शिकवण्यांत शिकवणी देणारे पालक व भरमसाठ शिकवणी शुल्क घेणा-यांना चिंता वाटणारी नक्कीच आहे. शिक्षकांवर शिकवण्याशिवाय असणारी इतर कामे काही शिक्षकांना विद्यार्थ्यांविषयी असणारी अनास्था, बेजबाबदारपणा, विद्यार्थ्यांची वर्गातील भरमसाठ संख्या, ‘पोर्शन’ पूर्ण करण्याची घाई इत्यादी कारणांमुळे सध्या शाळांमधून विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणे शक्य होत नसल्याने शिकवणीवर्गाची आवश्यकता आहेच, पण त्यासाठी पालकांनी भरमसाठ शुल्क घेणा-या नामांकित शिकवणी वर्गाचा अट्टाहास सोडून वर्गात कमी विद्यार्थ्यांची संख्या असणा-या शिकवणी वर्गात मुलांना पाठवावे. आठ-दहा तासांच्या शिकवणीमुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढण्याऐवजी कमी होते. घरच्यांच्या व शिक्षकांच्या सततच्या सांगण्यामुळे त्यांच्यावर प्रचंड ताण येतो. व एक प्रकारची बेफिकिरी येते. शहरांबाहेर ग्रामीण भागात हे सर्व कमी प्रमाणात असते, त्यामुळे मुंबईचा निकालाचा टक्का घसरला असावा. – मनमोहन रोगे, ठाणे.
क्लाससाठी कडक नियमावली करा!
आधीच शिक्षकांची संख्या अपुरी असताना त्यांना अशैक्षणिक कामे देणे व वाढती विद्यार्थी संख्या या शाळांच्या मुख्य समस्या असल्याने गरीब व मध्यमवर्गीय पालकही पदरमोड करून पाल्यास खाजगी क्लासमध्ये घालतात. शासनाचे कुठलेही नियंत्रण नसणारे क्लासचालक याचा गैरफायदा घेऊन पालकांना तर लुबाडतातच, पण विद्यार्थ्यांच्याही मनावरील अभ्यासाचा ताण वाढवतात. शाळांनाही स्वत:च्या शिक्षकांना क्लासमध्ये शिकवण्यापासून रोखता येत नाही. या समस्या मुख्यत: शहरी विद्यार्थ्यांच्या आहेत. त्यावर उपाय म्हणजे क्लासेसच्या कार्यपद्धतीबाबत कडक नियमावली करून ती प्रसारमाध्यमांमार्फत पालकांना कळवावी. त्यातील कुठल्याही नियमाचा भंग होत असल्यास माहितीच्या अधिकारात तक्रार करून तिचा पाठपुरावा करण्यास पालकांना शिकवावे. – डॉ. कृष्णकांत नाबर, माहीम.
इच्छाशक्तीचा अभाव!
आकर्षक जाहिराती, अवाढव्य फी, त्यावर प्रथम क्रमांकाचे फोटो या मायाजालात आजचा विद्यार्थी भरकटलेला आहे. अभ्यासाकरिता किती तास वेळ द्यावा यांचे नियोजन हवे. जोडीला जबरदस्त इच्छाशक्ती असले तर कोणतेही कठीण काम सोपे होऊ शकते. दहावी परीक्षेत किती गुण पडले यांचा विचार करता अकरावी, बारावी अभ्यासक्रमाची तयारी करणे क्रमप्राप्त आहे. इंग्रजी व गणित हा विषय कठीण म्हणून उगाचच बाऊ होतो. त्यावर अभ्यासाने मात करता येते. विद्यार्थी काही कारणांमुळे मागे पडलेले दिसतात. वर्गातील अनुपस्थिती, कठीण प्रश्नाची तयारी न करणे, गणित सोडवण्याचा प्रयत्न कमी करणे, सूत्रे यांची यादी न करता प्रात्यक्षिक व्यवस्थितपणे समजून न घेणे, यासारख्या काही शंका असल्यास शिक्षकांची मदत घेणे जरुरीचे आहे. अभ्यासक्रमांचे वेळापत्रक तयार करून कमीत कमी ५/६ तास अभ्यास केला तर परीक्षेची भीती राहणार नाही. केवळ क्लासेसवर भर न देता स्वत: इच्छाशक्तीच्या बळावर विद्यार्थी मात करू शकतात. भविष्य घडवणे विद्यार्थ्यांच्या हाती आहे. विचार करावयास शिकले पाहिजे. सकारात्मक विचार संयम व वेळेचे नियोजन यामुळे विद्यार्थी यशाला सामोरे जाऊ शकतात! – हरिभाऊ खैरनार, उल्हासनगर.
अधिक गुणप्राप्ती ही गुणवत्ता नव्हे
१० वीच्या वर्गात विद्यार्थी आला रे आला की सर्वप्रथम त्याच्या मनावर बिंबवले जाते ते असे की, तुला किमान ९० टक्के गुण मिळवायचे आहेत, हे लक्षात ठेव. त्यामुळे त्याचे दिवसाचे वेळापत्रक संपूर्णपणे बदलून जाते. त्यात साधा विचार करायलाही त्याला आवश्यक तेवढा वेळ नसतो. सर्वात महत्त्वाचे, महागडया खाजगी शिकवण्यांमध्ये प्रवेश घेतला नाही तर तो मग १०वीचा विद्यार्थी कसला? नित्याच्या शाळेतील १०वीच्या विद्यार्थीसंख्येपेक्षा अधिक संख्येने तुडुंब भरून वाहणारे खासगी शिकवण्यांचे वर्ग हेच दर्शवतात की, विद्यार्थ्यांना शाळेत जे काही शिकवले जाते, ते किमान ९० टक्के गुण प्राप्त करण्यासाठी पुरेसे नाही. परिणामत: शाळा आणि खासगी शिकवण्यावर्गातील तासन् तास अभ्यासाच्या दडपणाचे ओझे कमालीचे वाढल्याने अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये आणि आकलनशक्तीमध्ये होणा-या विपरित परिणामांमुळे त्यांचे जे मानसिक खच्चीकरण होते ते भयानकच नव्हे तर चिंताजनकही ठरते. एवढे होऊनही शाळेत व शिकवणीवर्गामध्ये घोकंपट्टीवर जेवढा जोर दिला जातो, यामुळे स्वतंत्रपणे विचार करण्याची शक्तीच विद्यार्थी गमावून बसतात. मनोरंजनासाठी, खेळांसाठी फिरण्यासाठीच्या वेळेला बाद करण्यात आल्याने मेंदू सतेज राहण्याच्या महत्त्वाच्या प्रक्रियेलाच लक्षणीय बाधा येते, ही चिंताजनक बाब पालक लक्षातच घेत नाहीत. या सर्वाचा विपरीत परिणाम उत्तीर्णाचा आकडा घसरण्यात झाला, तर त्यात आश्चर्य ते कसले? – मधुकर ताटके, गोरेगाव.
खासगी शिकवण्यांचे वाढते पेव!
या वेळेला कोकणात दहावी-बारावीचा टक्का वाढला आणि काही शहरी भागात घसरला, पण एकूणच निकाल चांगला लागला. पण सध्या शहरी भागात फोफावलेल्या खाजगी शिकवण्याचे पेव मात्र ब-याच प्रमाणात वाढले आहे. इतके की जणू त्याच्यात स्पर्धा लागली आहे की, आमच्या विद्यार्थ्यांना किती टक्के गुण मिळाले आणि आम्ही त्याचा अभ्यास कसा करून घेतला, याचा फोटो व गुणांसकट बॅनर लावले जातात. या खाजगी शिकवण्यांनी शिक्षणाचा धंदा बनवला आहे. इतका की शिकवणीच्या नावावर विद्यार्थ्यांकडून सकाळ-संध्याकाळ चार-चार तास अभ्यास करून व सतत परीक्षा घेतल्या जातात व या सगळ्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून बेसुमार फी आकारली जाते. फार वर्षापूर्वी अशा खाजगी शिकवण्या नव्हत्या आणि जीवघेणी स्पर्धाही नव्हती. कित्येक नामवंत लोकांनी रस्त्याच्या दिव्याखाली अभ्यास केला. ती ही एकमेकांची पुस्तके वापरून.. फक्त शाळेत शिकवलेल्या अभ्यासावरच. मग आत्ताच का शिकवण्यांची गरज भासते. ती ही इतकी की, तिला शाळेपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते. मग शाळेचा काहीच उपयोग नाही का? – मयूर ढोलम, जोगेश्वरी.
क्लासेसची आवश्यकता नाही!
नुकताच दहावी व बारावीचा निकाल लागला. आता वर्षानुवर्षे गुणांची टक्केवारी वाढते आणि पास होणा-यांचीही टक्केवारी वाढते आहे. भविष्यात १०० टक्के निकाल लागला तरी आश्चर्य वाटायला नको, कारण खरं तर शिक्षणाचा मूळ स्रेत शाळा आहे. शाळेत व्यवस्थित ग्रहण केले तर क्लासेसची आवश्यकता नाही. शाळेमध्ये सर्वागाने शिकवले जाते. त्यामुळे सामान्यज्ञानात विशेष भर पडते, पण शहरांमध्ये क्लास संस्कृती अधिक पसरत चालली आहे आणि खरं तर ही शिकविण्यापेक्षा आय.एम.पी., व्ही.आय.एम.पी., एम.आय.एम.पी. यावर जास्त भर देतात. त्यांना झापडबंद शिक्षण दिले जाते. त्यातच बहुतांश क्लास सामान्य व्यक्तीकडून चालविले जातात. त्यामानाने शाळेत जसे तज्ज्ञ शिक्षक असतात तसे क्लासला नसतात. कारण क्लास नफा मिळविण्यासाठी चालवले जातात. त्यामुळे तज्ज्ञ शिक्षक नसले तरी क्लासचे काम चालूच असते. बहुतांश मुले क्लासला जात असल्याने शालेय शिक्षकांची जबाबदारी कमी झाली आहे. तरीसुद्धा महाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता इतर राज्यांपेक्षा सरस आहेच हे अमान्य करता येणार नाही. इथे कॉपीवर करडी नजर आहे. इतर राज्यात तसे नाही. – शंकर पानसरे, काळाचौकी
अभ्यासाकडे दुर्लक्ष..!
क्लासमध्ये चमकणा-या आणि भरपूर गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाल्यामुळे आणि यंदापासून दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याच्या दोनच संधी मिळाली आहे. सर्व विषय घेऊन परीक्षेला सलग दोन वेळा बसता येईल आणि त्यातील चांगला निकाल निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना राहील. एटी-केटीच्या सुविधा यंदा उपलब्ध आहे. मात्र बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यापूर्वी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे राहील. अर्थात, क्लासमध्ये शिक्षक कोणत्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजून शिकवतात किंवा शाळा व कॉलेज आणि क्लासमधील अभ्यास किती विद्यार्थी गंभीरतेने करतात व पालकांनाही मुलांच्या शिक्षणाबाबतीत किती काळजी व उत्साह आहे, यावर मुलांच भवितव्य अवलंबून असतं. पण क्लासेसमुळे मुंबईचा आकडा घसरला असे म्हणता येणार नाही. क्लासेसमध्ये किंवा शाळा व कॉलेजमध्ये पदसंख्या वाढल्यामुळे काही विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकतं. त्यामुळे मुंबईचा आकडा घसरला असेल, असे मला वाटते. – प्रवीण पाटील, परळ.
स्पर्धेचा फटका विद्यार्थ्यांच्या मुळाशी
शाळा हे विद्येचे माहेर घर असतं असं म्हटलं जातं, पण आता शाळांपेक्षा शिकवण्यांकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल पाहता शिकवण्याचं रूपांतर शाळेत होत असल्याचं चित्र दिसू लागलंय. दिवसागणिक वाढत जाणारी स्पर्धा, त्यात मोठमोठ्या क्लासेसचे प्रस्थ असलेल्या मुंबई शहरात शिकवण्यांमध्ये चाललेली चढाओढ, तसेच पाल्यावर पालकांकडून व क्लासमुळे येणारा ताण, त्यामुळेच ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ आणि शाळेकडून दिले जाणारे वाढीव गुण, यामुळे विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढेल, अशी अपेक्षा असताना देखील इतर विभाग सोडले तर मुंबईत चित्र विरुद्ध दिसून आलं आहे. त्यामुळे अव्वाच्या सव्वा फी आकारून, सहा-सात तास शिकवणी व टेस्ट घेऊन जर विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण घटणार असेल तर याकडे पालक आणि पाल्याने गांभीर्याने पहायला हवे. अन्यथा या शिकवण्याच्या आपआपसात चाललेल्या स्पर्धेत आणि या स्पर्धेपोटी मुलांवर वाढत जाणा-या या दडपणामुळे विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचा आकडा नेहमी घसरेल यात शंका नाही. – चेतना झांजे, अंबरनाथ
क्लासेसचं फॅड नको
दहावी-बारावी परीक्षांचे निकाल विशेषत: मुंबई विभागाचा निकाल समाधानकारक वाटत नाही. किंबहुना ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ आणि शाळेकडून दिल्या जाणा-या वाढीव गुणांची संधीही विद्यार्थ्यांच्या गुणांच्या टक्केवारीत मदत करू शकली नाही. त्या मानाने कोकण विभागाने या वर्षी ९३.७९ टक्के यश संपादन करून नऊ विभागांतून प्रथम येण्याचा मान मिळून मुंबईला मागे टाकले. सर्वच क्लासेसमधून दर्जेदार शिकवण्याची पद्धत असतेच असं नाही, याचा पालक विचार करतच नाहीत. मात्र आपल्या मुलांना क्लासला टाकले की आपण मोकळे हे धोरण योग्य नाही. क्लासमध्येच मुलाला टाकले तरच तो/ती पास होण्याची शक्यता ही पालकवर्गाने मनात ठाण मांडून घेतली आहे, ती चुकीची आहे, कारण अभ्यास हा मुलांच्या आकलन शक्तीवर सर्वस्वी अवलंबून असते, त्याचा गांभीर्याने विचार न करता क्लासच्या चक्रव्यूहात मुलांना अडकवून वेठीस धरणं व त्याच्या/तिच्या मानसिक व शारीरिक तणावात भर घालणं योग्य नव्हे. क्लासला न जात केवळ शाळेतील शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासावर अनेक विद्यार्थ्यांनी ८० ते ९६ टक्के गुण मिळवले आहेत. शिवाय फावल्या वेळात त्यांनी स्वत:चे छंद, खेळही जोपासले पाहिजेत. – दिलीप अक्षेकर, माहीम.
मुंबईत पाणी तुंबण्यास नक्की जबाबदार कोण?
‘नेमेची येतो पावसाळा’.. आणि हा पाऊस मुसळधार व संततधार असेल शहर आणि उपनगरांतील सखल भागांसह अनेक भागांत पाणी हमखास तुंबतेच. रेल्वेची, रस्ते वाहतुकीची वाट लागते. त्याचा फटका प्रवाशांना बसतो. या सर्व गोष्टींना नक्की जबाबदार तरी कोण? मुंबई महापालिका, रेल्वे की सर्वसामान्यही? नाल्यांमध्ये कचरा टाकणा-या नागरिकांचे काय? पावसाळ्याआधी दोन्ही रेल्वेंच्या हद्दीत आणि शहर व उपनगरांत नालेसफाई पूर्ण झाल्याने यंदा कुठेही पाणी साचणार नाही, असे दावे रेल्वे आणि महापालिका करते. पण पावसाच्या पहिल्या दिवशी सर्व दावे फोल का ठरतात? या सर्व त्रासाला रेल्वे आणि महापालिका कितपत जबाबदार आहे का? पावसाळ्यात मुंबई जलमय होऊ नये यासाठी काय करावे?.. याबाबत वाचकांनी आपली मते सुवाच्य अक्षरात शुक्रवापर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत. शब्दमर्यादा : शंभर शब्द. पाकिटावर ‘वाचकांचे व्यासपीठ’ असा आवर्जून उल्लेख करावा. आपली मते तुम्ही vyasapith@gmail.com या ई-मेल आयडीवरही पाठवू शकता. तसेच ‘प्रहार’च्या संकेतस्थळावर किंवा प्रहारच्या फेसबुक पेजवरही नोंदवू शकता.
प्रहार, वन इंडियाबुल्स सेंटर,
नववा मजला, ज्युपिटर मिल्स कंपाउंड,
लोअर परळ, मुंबई – ४०००१३,
फॅक्स : ०२२-४०९६९९००.
०२२- ६१२३९९६६
Good thinking and analysis…
मूळ ‘व्याध’ ओळखा – कोकणासारख्या खडतर भागातून सर्वाधिक निकाल लागतो परंतु मुंबईसारख्या सर्व सुखसोयींनीयुक्त असणा-या भागाचा निकाल घसरतो म्हणूनच या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. शाळेव्यतिरिक्त डझनभर शिकवण्या लावून मुलांना आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी स्पर्धेत दामटवायचे हे हल्ली पालक आणि क्लास यांचे अंतिम मिशन असते. साहजिकच त्याचा तब्येतीवर ताण पडून दडपण वाढते. वृत्तपत्रांत पानभर जाहिराती करून आता शिकवण्या जणु दुसरी शाळाच बनल्या आहेत. विद्यार्थ्याचा कल लक्षात न घेता केवळ पाठांतर व घोकमपट्टी करायला लावून क्लासेस हजारोंनी फिज उकळतात. पालकही पैसा भरून मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा दोष शाळा व शिकवण्यांना देतात. हे सर्व करताना मात्र मूळ ‘व्याध’ काय आहे याचा शोध कुणीही घेत नाही. राज्य सरकार व शिक्षण विभागाने आठवीपर्यंत पास करणे या नियमामुळे शिक्षणाचा आणि विद्यार्थ्यांचाही दर्जा खालावला आहे. दहावीतही साधी अंकओळख व शुध्द वाचन-लेखन विद्यार्थ्याला येत नसते हे वास्तव आहे. संपर्कमाध्यमांच्या आहारी गेल्यामुळे विद्यार्थी व्यावहारिक बुध्दीमत्ता व चौकस दृष्टिकोन हरवत चालला आहे. केवळ घोकमपट्टी केल्याने पुढील महाविद्यालयीन तसेच बारावीच्या परीक्षेतही ही दर्जात्मक व गुणात्मक घसरण दिसते. यावर उपाय म्हणजे पहिलीचा निकाल ३० ते ५० टक्के इतका कडक लावल्यास अंकगणित, वाचन, लेखन येणारे विद्यार्थी पुढे जातील व वय लहान असल्याने नापास झाले तरी फार दुःख होणार नाही. नावाजलेली प्रथितयश मंडळी कोणत्या क्लासेसना जाऊन मोठी झाली याचाही विचार केला आणि विद्यार्थ्याच्या आवडी-निवडी लक्षात घेतल्या तर दर्जात्मक घसरणीची मूळव्याध दूर होईल.