नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द केल्याची राणा भीमदेवी थाटात घोषणा करणा-या शिवसेनेला काही मिनिटांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच तोंडावर पाडले.
मुंबई- नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द केल्याची राणा भीमदेवी थाटात घोषणा करणा-या शिवसेनेला सोमवारी काही मिनिटांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच तोंडावर पाडले आहे. इतकेच नव्हे तर अधिसूचना रद्द करण्याचा अधिकारच ‘उद्योगी’मंत्री सुभाष देसाई यांना नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला त्यांची जागा दाखवून दिली आहे. अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार आपल्याला नाही हे सुद्धा उद्योगमंत्र्यांना माहीत नव्हते की जाणीवपूर्वक प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करण्यासाठी सुभाष देसाई यांनी तशी घोषणा केली यावर आता चर्चा रंगली आहे. जर शिवसेनेने केलेली घोषणा मुख्यमंत्री पूर्ण होऊ देत नसतील तर शिवसेना सत्ता सोडणार का, असा सवाल आता स्थानिक प्रकल्पग्रस्त विचारीत आहेत.
कोकणाच्या विनाशाला कारणीभूत ठरणारा रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातील नाणार व आजुबाजूच्या १४ गावांच्या जमिनीवर प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी जमिनी संपादन करण्याची अधिसूचना सुभाष देसाई यांच्याकडे असणा-या उद्योग विभागानेच काढली. पर्यावरणाचे परवाने रामदास कदम यांच्याकडे असलेल्या पर्यावरण विभागाने दिले. तरीही शिवसेना नाणार प्रकल्पाला आमचा विरोध असल्याचे सांगून कोकणवासियांची घोर फसवणूक करीत होती. माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेचा फोलपणा अनेकवेळा लोकांच्या लक्षात आणून दिला. जर शिवसेनेला खरोखरच हा प्रकल्प रद्द करायचा असेल तर त्यांनी या अधिसूचना रद्द करावी, असे आव्हान राणे यांनी दिले होते. त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आदी लवाजमा घेऊन शिवसेना नेते नाणारमध्ये सोमवारी आले होते. देसाई यांनी राणा भीमदेवी थाटात नाणार प्रकल्पाच्या जमिनी संपादनाची अधिसूचना रद्द केल्याची, तर हा प्रकल्प कोकणात येणार नसल्याची घोषणा उध्दव ठाकरे यांनी केली. त्यांची घोषणा हवेत विरते न विरते तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या भात्यातील बाण काढून घेतले.
नाणार प्रकल्पग्रस्तांविषयी आपल्याला असलेले प्रेम दाखविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजपा आणि पंतप्रधानांवर यथेच्छ टीका केली. ‘अच्छे दिना’चे स्वप्न दाखविणा-या व्हीलननेच सौदीचा बोळा कोंबला. पण कोकणवर अन्याय करणा-यांची राख करू, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. परंतु हा टाळय़ांचा आवाज हवेत विरण्यापूर्वीच फडणवीस यांनी नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झालेली नाही. ती रद्द करण्याचा अधिकारच मंत्र्यांना नाही, असे सांगत देसाई यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून दिली. याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमिटी स्थापन करण्यात आली आहे. अधिसूचनेबाबत ही समितीच निर्णय घेऊ शकते, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला तोंडावर पाडले आहे. शिवसेनेच्या या नौटंकीवर आता चौफेर टीका होऊ लागली आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना आपले काय अधिकार आहेत, हेच माहीत नाही की, नाणार प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करण्यासाठी त्यांनी तशी घोषणा केली, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
शिवसेनेने जे पेरले तेच उगवले : खा. नारायण राणे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजापूर तालुक्यातील सागवे येथील प्रस्तावित नाणार रिफायनरी संदर्भातील सभेकडे प्रकल्पग्रस्तांनी पाठ फिरविली. यामधून ‘शिवसेनेने पेरले तेच आज उगवले आहे’. भावनेच्या आधारे कोकणी तसेच मराठी माणसांना आतापर्यंत गुंतवून ठेवत शिवसेनेने ना रोजीरोटी दिली, ना विकास केला, ना प्रगती केली. हिंदुत्व व मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढण्याच्या वल्गना शिवसेनेकडून केल्या गेल्या. प्रत्यक्षात मराठी अगर कोकणी माणसाच्या वाटय़ाला काहीच मिळाले नाही. कोकणला उद्ध्वस्त करणारा नाणार येथील रिफायनरी प्रकल्प हीच शिवसेनेची भेट काय? आता कोकणी माणूस जागा झाला असून शिवसेनेने आपला फसवणुकीचा धंदा बंद करावा, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांनी शिवसेनेला दिला आहे. कोकणवासीयांच्या विशेषत: नाणार दशक्रोशीतील जनतेच्या व प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीबद्दल खा. नारायण राणे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सेना, भाजपाकडून कोकणवासीयांचा विश्वासघात- धनंजय मुंडे
कोकणातील बहुचर्चित नाणार प्रकल्पाबाबत सेना – भाजपा या दोघांकडूनही कोकणवासीयांचा विश्वासघात आणि फसवणूक सुरू आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केलेली घोषणाही फार्सच आहे. नाणारमधील भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची कोणतीही कारवाई विभागाने सुरूच केलेली नसताना देसाईंची घोषणा म्हणजे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमोर केलेला देखावा आहे. देसाई यांनी या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली होती का? कॅबिनेट निर्णय झाला आहे का? हा प्रकल्प नाणारमध्ये येणार हे माहीत असताना आजपर्यंत शिवसेना आणि त्यांचे मंत्री गप्प का बसले? अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया मंत्र्यांना माहीत नाही का? त्यामुळे ते विश्वासघात करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दिल्ली मध्ये कोणाची पत आहे आणि कोणाची नाही हे मला माहित नाही पण भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षाची जनतेच्या मनातून पत गेली आहे.
शिवसेनेचा पब्लिसिटी स्टंट- नवाब मलिक
नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा शिवसेनेचा हा पब्लिसिटी स्टंट आहे. अधिसूचना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात न्यावा लागतो. नंतर त्याबाबत निर्णय घेतला जातो. तो अशा पद्धतीने खुल्या मंचावर रद्द करता येत नाही. शिवसेनेने नाणारबाबत जी भूमिका घेतली आहे तीच भूमिका समृद्धी महामार्गाबाबत घेणार का? समृद्धी महामार्गाबाबत शिवसेनेची भूमिका काय हेही स्पष्ट व्हायला हवे. – नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
युतीत मिठाचा खडा?
अनेक मुद्यांवरून शिवसेना गेल्या काही दिवसांपासून भाजपवर टीकास्त्र सोडत आहे. नाणार प्रकल्प शिवसेनेचेच खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्या प्रयत्नाने आणला असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या प्रकल्पाच्या सर्व परवानग्याही शिवसेनेकडे असलेल्या उद्योग आणि पर्यावरण विभागाने दिल्या होत्या. तरीही शिवसेना आपला प्रकल्पा विरोध असल्याचा देखावा निर्माण करीत होती. नाणारला विरोध दाखविण्यासाठी शिवसेनेने सोमवारी जय्यत तयारी केली असतानाच शिवसेनेच्या कार्यक्रमानंतर काही मिनिटांतच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला तोंडघशी पाडले. यावरून युतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्याचे परिणाम येऊ घातलेल्या विधान परिषदेच्या सहा जागांची निवडणूक, एक वर्षावर येऊन ठेपलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. भाजपाकडून शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न सुरू असला तरी शिवसेनेने त्यांना दाद दिलेली नाही. नाणार येथील सभेनंतर या दोन्ही पक्षांतील संबंध अधिकच ताणले जाण्याची शक्यता आहे.
मोदी ‘व्हीलन’ तर शिवसेना ‘साइड व्हीलन’!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्हीलन म्हणतात. मग मागील साडेतीन वर्ष केंद्रात आणि राज्यात त्यांचा जो ‘डर्टी पिक्चर’ सुरू आहे, त्यात शिवसेनेची भूमिका काय आहे? मोदी ‘व्हीलन’ असतील तर उद्धव ठाकरेंना ‘साइड व्हीलन’च म्हणावे लागेल. नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध म्हणजे त्यांच्यात आणि भाजपात झालेल्या एका ‘डील’चा भाग आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, ‘नाणार नाही देणार! ’ मग नाणारच्या तहात काय घेणार? ते उद्धव ठाकरेंनी सांगून टाकावे. मुख्यमंत्र्यांना दिल्लीत कवडीचीही किंमत नसल्याचा आरोप उध्दव ठाकरे करतात. असे असेल तर अशा मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात तुमचे मंत्री कायम तरी कशाला राहतात? सरकारमधून बाहेर पडण्याच्या शिवसेनेच्या इशा-यांची आता डबल सेन्चुरी होत आली आहे. आता तरी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का? – राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेता, विधानसभा
शिवसेनेने कोकणी जनतेला काय दिले?
शिवसेनेच्या भूमिकेवर आमदार नितेश राणे यांनी जोरदार टिका केली आहे. सुभाष देसाई यांनी नोटिफिकेशन रद्द करण्याबाबतचे मत व्यक्त केले आहे. ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे, सरकारचे मत नाही. नाणारमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेवर नितेश राणे यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘नटसम्राट नाणारला आले.. बडबडले आणि निघून गेले! कोकणी जनतेला काय मिळालं..? बाबाजी का टुल्लू!’
शिवसेनेतील लोकांनी नाणार मध्ये जमीनी घेतल्या आहेत असे राणे साहेब एका मुलाखतीत बोलले होते व कागदी पुरावा पण देतो. तो त्यानी आता काढावा हि विनंती.